Thursday, June 25, 2026
Home Blog Page 2

तांदूळवाडी विहीर दुर्घटना प्रकरण : ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; विधानसभेत आ. उत्तमराव जानकर यांचा सरकारला जाब

0
तांदूळवाडी विहीर दुर्घटना प्रकरण : ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; विधानसभेत आ. उत्तमराव जानकर यांचा सरकारला जाब

तांदूळवाडी विहीर दुर्घटना प्रकरण : ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; विधानसभेत आ. उत्तमराव जानकर यांचा सरकारला जाब

मुंबई/माळशिरस | प्रतिनिधी :- माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडलेल्या भीषण विहीर दुर्घटनेचे पडसाद आता राज्य विधानसभेत उमटले असून, या प्रकरणातील जबाबदार ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार उत्तमराव जानकर यांनी सभागृहात जोरदारपणे लावून धरली. निष्पाप भाविकांचा बळी गेलेल्या या दुर्घटनेमागील निष्काळजीपणा उघडकीस आणत सरकारने दोषींना अभय देऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

तांदूळवाडी परिसरात रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत भाविकांची पिकअप गाडी कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेत महिला व लहान मुलांचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्य हळहळले होते. दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

विधानसभेत बोलताना आ. उत्तमराव जानकर यांनी संबंधित रस्त्यावरील सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, संरक्षक कठडे नसणे, तसेच कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या. या अपघातासाठी केवळ चालकाला जबाबदार धरून चालणार नाही, तर रस्त्याच्या कामात झालेल्या त्रुटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबांना न्याय मिळावा, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत आणि संबंधित विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली. तसेच राज्यातील अशा धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून तत्काळ सुरक्षाविषयक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षा, सार्वजनिक बांधकामांची गुणवत्ता आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तांदूळवाडी दुर्घटनेतील मृतांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.

शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार बायपास मार्गावरील नादुरुस्त पथदिव्यांच्या दुरुस्तीला सुरुवात

0
शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार बायपास मार्गावरील नादुरुस्त पथदिव्यांच्या दुरुस्तीला सुरुवात

शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार बायपास मार्गावरील नादुरुस्त पथदिव्यांच्या दुरुस्तीला सुरुवात

अकलूज | प्रतिनिधी अकलूज शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रतापसिंह चौक ते जयसिंह चौक या बायपास मार्गावरील बंद व नादुरुस्त पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या कामास आज सुरुवात करण्यात आली. मा. शिवतेजसिंह मोहिते-पाटील (गटनेते तथा उपनगराध्यक्ष, नगरपरिषद अकलूज) यांच्या सूचनेनुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.

या मार्गावरील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांकडून याबाबत सातत्याने मागणी होत असल्याने शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी संबंधित विभागाशी पाठपुरावा करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या.

शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक सुविधांमधील त्रुटी तात्काळ दूर करणे यासाठी शिवतेजसिंह मोहिते-पाटील सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे शहरातील विविध विकासकामांना गती मिळत असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पथदिव्यांच्या दुरुस्तीमुळे बायपास मार्ग अधिक प्रकाशमान होणार असून अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांचा व वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

अकलूज शहर अधिक सुरक्षित, प्रकाशमान आणि सुशोभित करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे आणखी एक सकारात्मक पाऊल असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला; टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण

0
शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला; टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण

शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला; टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण

फलटण | प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील टाकळवाडा येथे शेतजमिनीच्या वहिवाटीच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्यावर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ऊस तोडणीच्या कारणावरून झालेल्या या वादात टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अर्जुन आण्णा नाझीरकर (वय ५४, रा. टाकळवाडा, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा आणि त्यांचे भाऊ तात्याराम आण्णा नाझीरकर यांच्यात शेतजमिनीच्या वहिवाटीवरून दीर्घकाळापासून वाद सुरू असून संबंधित दिवाणी दावा न्यायालयात प्रलंबित आहे.

दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तात्याराम नाझीरकर हे वादग्रस्त शेतातील ऊस तोडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अर्जुन नाझीरकर तेथे गेले. त्यांनी ऊस तोडण्यास विरोध केल्यावर “हे शेत माझे आहे, मध्ये पडलास तर जीवे मारेन,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

त्यानंतर त्याच दिवशी दुपारी सुमारे ३.१५ वाजता शेजारील ओढ्याजवळ ऊस कुटी मशीनद्वारे ऊस कुटला जात असताना अर्जुन नाझीरकर यांनी याबाबत जाब विचारला. यावेळी संतोष तात्याराम नाझीरकर यांनी टिकावाच्या दांड्याने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली, तर तात्याराम नाझीरकर यांनी कुऱ्हाडीच्या तुंब्याने डाव्या हाताच्या कोपरावर व उजव्या हातावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनीही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या अर्जुन नाझीरकर यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सागर अभंग करीत आहेत.

जनसामान्यांचा बुलंद आवाज; नगरसेवक सचिन अहिवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
जनसामान्यांचा बुलंद आवाज; नगरसेवक सचिन अहिवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जनसामान्यांचा बुलंद आवाज; नगरसेवक सचिन अहिवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

फलटण | प्रतिनिधी :- सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे, विकासकामांबाबत सातत्याने पाठपुरावा करणारे आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले फलटण नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक आरोग्य विभागाचे सभापती मा. सचिन अहिवळे (सर) यांचा वाढदिवस आज विविध स्तरांतून शुभेच्छांच्या वर्षाव  उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना पदापेक्षा जनसेवेला अधिक महत्त्व देणारे सचिन अहिवळे यांनी आपल्या कार्यातून नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरातील विविध विकासकामे, नागरी सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

राजकारणासोबतच समाजकारणाची बांधिलकी जपत प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नागरिकांशी कायम संपर्क ठेवत त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली विशेष ठरली आहे.

शांत, संयमी, अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सचिन अहिवळे यांनी आपल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून विश्वास संपादन केला आहे. विकासाभिमुख दृष्टीकोन, जनतेप्रती असलेली आत्मीयता आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे त्यांना सर्व स्तरांतून मान-सन्मान मिळत आहे.

वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी नागरिकांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

मा. सचिन अहिवळे (सर) साहस Times तर्फे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिशुभेच्छा!

लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; अपघात नव्हे तर नियोजित हत्येचा धक्कादायक उलगडा

0
लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; अपघात नव्हे तर नियोजित हत्येचा धक्कादायक उलगडा

लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; अपघात नव्हे तर नियोजित हत्येचा धक्कादायक उलगडा

पुणे | प्रतिनिधी :- पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या २४ वर्षीय केतन विशाल अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, सुरुवातीला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात नियोजित हत्या असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणामुळे पुण्यासह व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबातील केतन अग्रवाल यांचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. प्रारंभी हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात या घटनेमागे मोठे षड्यंत्र असल्याचे निष्पन्न झाले.

केतन अग्रवाल यांचे लग्न लवकरच होणार होते. या विवाहासाठी जयपूर येथे तब्बल १७ कोटी रुपये खर्च करून आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगड किल्ल्यावर गेला होता.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतनच्या मृत्यूमागे त्याची होणारी पत्नी आणि तिचा जवळचा मित्र यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. पुढील चौकशीत ही घटना अपघात नसून नियोजित हत्येचा कट असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी ही घटना अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत केतनच्या होणाऱ्या पत्नीसह तिच्या कथित प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या हत्येमागील नेमके कारण आणि कटाचा संपूर्ण तपशील उघड करण्यासाठी चौकशी सुरू आहे.

या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहरासह संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आले असून, केतन अग्रवाल यांच्या मृत्यूचे गूढ उलगडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ऑलिम्पिक दिनानिमित्त फलटणच्या लखन मोरे यांचा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून गौरव

0
ऑलिम्पिक दिनानिमित्त फलटणच्या लखन मोरे यांचा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून गौरव

सॉफ्ट हॉकीच्या माध्यमातून भारतीय संघाचे नेतृत्व; देशाला मिळवून दिलेल्या यशाबद्दल सन्मान

फलटण | प्रतिनिधी :- दरवर्षी २३ जून रोजी जगभरात तसेच भारतात ऑलिम्पिक दिवस उत्साहात साजरा केला जातो. खेळातील कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती, सक्रिय जीवनशैली आणि जागतिक एकता व बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी हा दिवस प्रेरणादायी ठरतो.

याच पार्श्वभूमीवर पुणे येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात फलटणच्या सुपुत्र श्री. लखन मोरे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

लखन मोरे यांनी सॉफ्ट हॉकी या खेळाच्या माध्यमातून भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवित देशाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत देशाचा गौरव वाढविला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने त्यांचा सन्मान करून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.

फलटणच्या भूमीतून घडलेला हा खेळाडू आज अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरत असून, त्यांच्या यशामुळे फलटणच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. लखन मोरे यांच्या या सन्मानाबद्दल फलटण शहर व तालुक्यातील क्रीडाप्रेमी, नागरिक आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

फलटणच्या मातीतून उगवलेली ही क्रीडा प्रतिभा भविष्यातही देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

“आपलं सुंदर फलटण… हरित फलटण… मी फलटणकर!”

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; फलटणला अप्पर जिल्हाधिकारी, साखरवाडीत अप्पर तहसीलदार कार्यालयाची मंजुरी

0
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; फलटणला अप्पर जिल्हाधिकारी, साखरवाडीत अप्पर तहसीलदार कार्यालयाची मंजुरी

फलटण | प्रतिनिधी :- माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून महसूल विभागाने फलटण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच साखरवाडी (पिंपळवाडी) येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

संतोष पाटील यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, फलटण येथे नव्याने सुरू होणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय कार्यरत राहणार आहे. या कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात फलटण, माण आणि खटाव या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची महसूल व प्रशासकीय कामे अधिक वेगाने, कार्यक्षमतेने आणि स्थानिक पातळीवर मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

याचबरोबर, फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांनी साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची स्वतंत्र अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात होळ, तरडगाव आणि आदर्की बुद्रुक या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना महसूल विषयक सेवांसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार असून प्रशासन अधिक लोकाभिमुख होणार आहे.

फलटण आणि परिसराच्या प्रशासकीय विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या दोन्ही कार्यालयांच्या मंजुरीसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने यास मान्यता देत अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार व्यक्त केले.

या निर्णयामुळे फलटण, माण, खटाव तसेच साखरवाडी परिसरातील नागरिकांना प्रशासन अधिक जवळून उपलब्ध होणार असून विकास प्रक्रियेला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण येथे डीवायआरटीओ सचिन विधाते यांचा फलटण प्रतिनिधी संघटनेतर्फे सत्कार

0
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण येथे डीवायआरटीओ सचिन विधाते यांचा फलटण प्रतिनिधी संघटनेतर्फे सत्कार

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण येथे डीवायआरटीओ सचिन विधाते यांचा फलटण प्रतिनिधी संघटनेतर्फे सत्कार

फलटण | प्रतिनिधी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण येथे श्री. सचिन विधाते यांची डी.वाय.आर.टी.ओ. (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी) पदावर पदोन्नती होऊन फलटण येथे नियुक्ती झाल्याबद्दल फलटण प्रतिनिधी संघटनेच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी फलटण शहराला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचेही उपस्थितांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. फलटण शहर व परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने, परवाना नूतनीकरण तसेच इतर परिवहनविषयक सेवांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात फलटण प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष, नगरसेवक, भाजप पदाधिकारी व युवा उद्योजक श्री. अमोलजी सस्ते यांनी आरटीओ कार्यालयाच्या कार्यपद्धती, वाहनधारकांसाठी आवश्यक नियम, शासकीय सेवा आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतुकीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

तसेच श्री. सनी पवार यांनी फलटण प्रतिनिधी संघटनेची ओळख करून देत संघटनेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. संघटनेच्या वतीने विविध मागण्या आणि सूचना यांचे निवेदनही सादर करण्यात आले.

या कार्यक्रमास फलटण प्रतिनिधी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद तसेच फलटण शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नव्याने रुजू झालेल्या डीवायआरटीओ श्री. सचिन विधाते यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व सकारात्मक राहिले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

धम्माचा विचार अंगीकारल्यानेच चेहऱ्यावर कायम समाधान दिसू शकते – पारिजातका जगताप

0
धम्माचा विचार अंगीकारल्यानेच चेहऱ्यावर कायम समाधान दिसू शकते – पारिजातका जगताप

धम्माचा विचार अंगीकारल्यानेच चेहऱ्यावर कायम समाधान दिसू शकते – पारिजातका जगताप

फलटण : भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य, प्रबोधनकार आयु. महावीर भालेराव यांच्या सहचारिणी व पंचायत समिती फलटणच्या माजी सदस्या आयुनि कल्पना महावीर भालेराव यांच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित धम्ममय कार्यक्रमात विविध मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी शुभेच्छा देताना आयुनि पारिजातका बाबासाहेब जगताप म्हणाल्या, “आजच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम आयुनि कल्पना महावीर भालेराव यांना मंगलमय शुभेच्छा देते. त्यांच्या चेहऱ्यावर कायम दिसणारे समाधान आणि भालेराव परिवाराने बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी दिलेले योगदान यामुळे हा परिवार धम्मशील कुटुंब म्हणून ओळखला जातो. जीवनात अनेक संकटे, सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात; मात्र प्रत्येक परिस्थितीत ज्यांच्या चेहऱ्यावर शांतता, सुख आणि समाधान दिसते, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे आयुनि कल्पना महावीर भालेराव होय. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हे बुद्धधम्माच्या आचार-विचारांमुळेच शक्य झाले आहे. त्यांच्या उज्ज्वल, निरामय व मंगलमय आयुष्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करते.”

भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेचे माजी पदाधिकारी तथा ज्येष्ठ धम्म उपासक धम्ममित्र आयु. राजेंद्रकुमार गायकवाड शुभेच्छापर भाषण करताना म्हणाले, “आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वजण, भारतीय बौद्ध महासभा व बीबीएम फॅमिलीमधील एकोपा, परस्परांप्रती असलेला जिव्हाळा आणि प्रेम यामुळेच हा धम्मसोहळा घडत आहे. संपूर्ण फलटण तालुक्यात धम्माचा प्रचार-प्रसार करण्यामध्ये आयु. महावीर भालेराव यांच्यासोबत आयुनि कल्पना भालेराव यांचेही मोलाचे योगदान आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभा परिवार व बीबीएम फॅमिलीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो.”

यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे म्हणाले, “या परिवारामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांचा वास आहे. येथील प्रत्येक व्यक्तीचे मन शुद्ध असल्यामुळे या वास्तूमध्ये बुद्धत्वाची अनुभूती येते. वयाची चाळिशी पार करूनही कल्पनाताई सतत माणसे जोडत धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्यांच्या घरी येणारा कोणताही व्यक्ती चहा, नाश्ता किंवा किमान पाणी घेतल्याशिवाय परत जात नाही. अशा या कुटुंबवत्सल, प्रेमळ आणि धम्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

कार्यक्रमात बौद्धाचार्य म्हणून भारतीय बौद्ध महासभा, बुद्रुक तालुका शाखेचे संस्कार उपाध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. बजरंग गायकवाड यांनी धम्मकार्य पार पाडले. त्यांनी आयुनि कल्पना महावीर भालेराव यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले, “माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी महावीर भालेराव आणि त्यांच्या सहचारिणी कल्पना भालेराव यांनी उपस्थित राहून मला आधार दिला आहे. धम्ममार्गाने जीवन जगणारा हा परिवार भविष्यातही अशीच प्रगती करत राहो व त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, हीच मंगल कामना.”

या प्रसंगी भालेराव परिवाराचे नातेवाईक, कुटुंबीय, आयुनि कल्पना भालेराव यांचे माहेरकडील गायकवाड परिवार, महावीर भालेराव यांच्या भगिनी साबळे परिवार, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटणचे माजी सरचिटणीस बाबासाहेब जगताप, माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार व पर्यटन विभागाचे रामचंद्र मोरे, संस्कार सचिव अमोल भोसले, संघटक आनंद जगताप, अमोल काकडे, विजयकुमार जगताप, धम्ममित्र बौद्धाचार्य सतीश कांबळे, माजी कायदेशीर सल्लागार अॅड. चंद्रशेखर मोरे, ज्येष्ठ धम्म उपासक राजेंद्रकुमार गायकवाड, महावितरणचे अभियंता अविनाश अहिवळे, संस्कार उपाध्यक्ष बजरंग गायकवाड तसेच भालेराव परिवाराचे सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

0
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
सातारा : संभाजीनगर, सातारा येथील राष्ट्रभाषा भवनाच्या प्रमुख सभागृहात सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळातर्फे दिनांक २१ जून २०२६ रोजी सेवापूर्ती, पदोन्नती तसेच मंडळाच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सत्कार समारंभ उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला.

या प्रसंगी सरस्वती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बिबी (ता. फलटण) येथील माजी प्राचार्य मा. मोहन भिसे, श्रीराम खोलेश्वर विद्यालय, मुंजवडी (ता. फलटण) येथील माजी प्राचार्य मा. दीपक मारुती भापकर आणि श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी (ता. फलटण) येथील माजी प्राचार्य मा. विठ्ठल बाबूराव निकाळजे यांचा सपत्नीक संपूर्ण पोशाख, स्नेहवस्त्र, श्रीफळ, पुस्तके आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच लोकमंगल हायस्कूल, एमआयडीसी सातारा येथील प्राचार्य मा. विजय यादव, न्यू इंग्लिश स्कूल, जिहे-कठापूर येथील प्राचार्य मा. अनिल वायदंडे आणि न्यू इंग्लिश स्कूल, जिहे येथील माजी प्राचार्य मा. लक्ष्मण घनवट यांचा शाल, श्रीफळ, स्नेहवस्त्र, पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष मा. ता. का. सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. दयानंद तिवारी (जे.जे.टी. विद्यापीठ, राजस्थान – मुंबई केंद्र) तसेच मा. डॉ. गजानन भोसले (हिंदी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा) उपस्थित होते.

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष नेताजी ननावरे, उपाध्यक्ष शाहनवाज मुजावर व इकबाल मुल्ला, राज्य परीक्षा मंत्री सुधाकर माने, विभागीय परीक्षा मंत्री शिवाजीराव खामकर, अध्यक्षा सौ. सुनंदा शिवदास, कार्यवाह अनंत यादव, सहकार्यवाह सौ. दिपाली पवार, भवन समितीचे सचिव श्रीकांत लावंड, राष्ट्रभाषाप्रेमी शिक्षक, शिक्षकेतर पतसंस्थेचे पदाधिकारी, महादेवी वर्मा सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी तसेच सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील मंडळाचे पदाधिकारी, हिंदी शिक्षक व सत्कारमूर्तींचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गायत्री पवार यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.

प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष नेताजी ननावरे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच राष्ट्रभाषा भवनात कार्यरत विविध संस्थांच्या कार्याचा परिचय करून दिला.यानंतर महाराष्ट्र हिंदी अध्यापक मित्र या त्रैमासिक नियतकालिकाच्या एप्रिल-जून अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतात हिंदी अध्यापक मंडळ व पितामहांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही मंडळाच्या कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. गजानन भोसले यांनी आपल्या भाषणात हिंदी अध्यापक मंडळाचा सत्कार म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा सत्कार असल्याचे नमूद केले. मंडळाच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी पितामहांच्या कार्यातून प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

डॉ. दयानंद तिवारी यांनी महाराष्ट्र ही क्रांती व शांततेची भूमी असल्याचे सांगून हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच पितामह सूर्यवंशी यांचे हिंदीसाठीचे कार्य तपस्वी वृत्तीचे असल्याचे गौरवोद्गार काढले.

अध्यक्षीय भाषणात मा. ता. का. सूर्यवंशी यांनी सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले. सेवाविराम घेतलेल्या शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवावे, तसेच पदोन्नती मिळालेल्या प्राचार्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हिंदी विषयाच्या तासिकांबाबत भविष्यातील आंदोलनासाठी शिक्षकांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सदस्या मिनाक्षी बडिगार यांनी प्रभावीपणे केले. कार्यवाह अनंत यादव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.वंदे मातरम्‌च्या सामूहिक गायनाने समारंभाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक नवनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.