Thursday, June 25, 2026
Home Blog

वाकाव रेल्वे अंडरपासला मंजुरी; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

0
वाकाव रेल्वे अंडरपासला मंजुरी; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

वाकाव रेल्वे अंडरपासला मंजुरी; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

माढा | प्रतिनिधी :- माढा तालुक्यातील वाकाव येथील रेल्वे मार्गावरील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश मिळाले असून, येथे रेल्वे अंडरपास (सबवे) उभारण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

यासंदर्भात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अपर मंडल रेल प्रबंधक यांनी खासदार मोहिते-पाटील यांना पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली आहे. वाकाव येथील रेल्वे किलोमीटर क्रमांक 403/8-9 येथे पादचाऱ्यांसाठी सबवे बांधण्याचे काम PH-16 योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले असून, मार्च 2027 पर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

वाकाव परिसरातील नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता. याची दखल घेत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

या मंजुरीमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत खासदारांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.

फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बबनराव मुळीक यांना ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार

0
फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बबनराव मुळीक यांना ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार

फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बबनराव मुळीक यांना ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार

फलटण : फलटण तालुक्यातील सासकल येथील प्रगतशील शेतकरी श्री. बबनराव मुळीक यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ चा फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री. मुळीक यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत फलोत्पादन क्षेत्रात विविध प्रयोग यशस्वीरीत्या राबविले आहेत. फळबाग व्यवस्थापन, ठिबक सिंचन, पाणी बचत, सेंद्रिय व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून त्यांनी उत्पादनवाढीसोबतच दर्जेदार फळनिर्मिती साध्य केली आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली असून आधुनिक शेतीचे मार्गदर्शनही त्यांनी वेळोवेळी केले आहे.

या पुरस्कारप्राप्तीबद्दल मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या. भाडळी बु. चे चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहनराव डांगे, ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच मोहनराव मुळीक, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश मदने,माजी उपसरपंच संजय बबन चांगण, विकास लक्ष्मण मुळीक आदी मान्यवरांनी श्री. बबनराव मुळीक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या यशाबद्दल श्री. बबनराव मुळीक यांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

फलटणच्या विकासाला नवी झेप; विमानतळ, रेल्वे, बुलेट ट्रेनसह मोठ्या प्रकल्पांची घोषणा – रणजितसिंह नाईक निंबाळकर

0
फलटणच्या विकासाला नवी झेप; विमानतळ, रेल्वे, बुलेट ट्रेनसह मोठ्या प्रकल्पांची घोषणा – रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटणच्या विकासाला नवी झेप; विमानतळ, रेल्वे, बुलेट ट्रेनसह मोठ्या प्रकल्पांची घोषणा – रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण | प्रतिनिधी. फलटण तालुक्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आगामी काळात मार्गी लागणार असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून फलटणला विमानतळ, रेल्वे सेवा, बुलेट ट्रेन थांबा, नवीन जिल्ह्याचा दर्जा तसेच विविध प्रशासकीय कार्यालये मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

निंबाळकर म्हणाले की, पुरंदरच्या धर्तीवर फलटण येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. येत्या १० ते १५ दिवसांत केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत विमानतळ प्रकल्पाबाबत पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

सोलापूर विमानतळाप्रमाणेच फलटण विमानतळावरून मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली यांसारख्या प्रमुख शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्याचा तात्विक प्रस्ताव मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे ३ हजार फूट धावपट्टी असलेल्या या विमानतळाला राष्ट्रीय दर्जाचे स्वरूप देण्याचे नियोजन असून यासाठी अंदाजे २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

फलटण तालुक्याची अनेक वर्षांपासूनची विमानतळाची मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे सांगताना निंबाळकर यांनी २०२९ पर्यंत या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त केला. या विमानतळामुळे फलटणला राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त होईल, असेही त्यांनी नमूद केले.

रेल्वे प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर असून २०२८ पर्यंत ही रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. यामुळे फलटण, बारामती आणि परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

याशिवाय मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या विस्तारित प्रकल्पाला केंद्र सरकारने तांत्रिक मान्यता दिल्याचा दावा करताना, फलटणमधील शिंदेनगर तसेच पंढरपूर येथे बुलेट ट्रेनला थांबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “मी पूर्वी बुलेट ट्रेन माढा मतदारसंघातून जाईल असे सांगितले तेव्हा अनेकांनी हसले होते; मात्र आता त्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू आहेत,” असेही ते म्हणाले.

तालुक्याच्या प्रशासकीय विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, आरटीओ कार्यालय यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात प्रस्तावित नव्या जिल्ह्यांमध्ये फलटण, बारामती आणि पंढरपूर या जिल्ह्यांचा समावेश होण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुणे-बंगळुरू नवीन महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी मिळाली असून दुसऱ्या टप्प्यात फलटण परिसरातील कामांनाही मंजुरी मिळणार असल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र-राज्य सरकारच्या सहकार्याने फलटणच्या विकासासाठी पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत,” असे सांगत त्यांनी विकासकामांबाबत आशावाद व्यक्त केला.

फलटणमध्ये खाजगी सावकारीचे जाळे वाढल्याची चर्चा; नव्या डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान

0
फलटणमध्ये खाजगी सावकारीचे जाळे वाढल्याची चर्चा; नव्या डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान

फलटण | प्रतिनिधी. फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचे वाढते जाळे चिंतेचा विषय बनत असून, नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर या अवैध व्यवसायाला आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात व्याजाने पैसे देण्याचे व्यवहार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून काही खाजगी सावकारांनी तालुक्यात आपले मजबूत जाळे निर्माण केले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी, शेतमजूर तसेच गरजू नागरिक यांना मोठ्या व्याजदराने कर्ज दिले जात असल्याचे सांगितले जाते. कर्जाची रक्कम किंवा व्याज वेळेत न भरल्यास संबंधित कर्जदारांना मानसिक त्रास, धमक्या आणि विविध प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येत आहेत.

दरम्यान, वाठार निंबाळकर येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर खाजगी सावकारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्जाच्या तणावातून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे ग्रामीण भागातील अवैध सावकारी व्यवहारांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील काही राजकीय व्यक्ती आणि राजकीय पाठबळ असलेल्या घटकांचा या व्यवसायाशी संबंध असल्याच्या चर्चाही स्थानिक स्तरावर रंगू लागल्या आहेत. त्यामुळे अशा व्यवहारांवर कारवाई करताना प्रशासनासमोर अनेक प्रकारची आव्हाने उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्याकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा असून, खाजगी सावकारी, अवैध व्याजव्यवहार आणि कर्जदारांच्या छळाच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत सावकारीच्या वाढत्या विळख्यातून नागरिकांची सुटका करण्याचे मोठे आव्हान सध्या पोलीस प्रशासनासमोर उभे आहे.

विशेष म्हणजे, फलटण तालुक्यातील अनेक सावकारांनी मोठे जाळे उभे केल्याची चर्चा असून, या कथित सावकारांची नावे आणि त्यांच्या व्यवहारांबाबतची माहिती लवकरच जनतेसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बारामतीत उभारले जाणार अजित पवार यांचे भव्य स्मारक; ५० मीटर उंचीच्या टॉवरमधून पाहता येणार विकासाचा आलेख

0
बारामतीत उभारले जाणार अजित पवार यांचे भव्य स्मारक; ५० मीटर उंचीच्या टॉवरमधून पाहता येणार विकासाचा आलेख

बारामतीत उभारले जाणार अजित पवार यांचे भव्य स्मारक; ५० मीटर उंचीच्या टॉवरमधून पाहता येणार विकासाचा आलेख

बारामती | प्रतिनिधी :- बारामती शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बारामती नगरपरिषदेने भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला.

नगराध्यक्ष सचिन सातव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, स्मारक परिसरात सुमारे ५० मीटर उंचीचा टॉवर उभारण्यात येणार असून, त्यावरून बारामती शहराचा सर्वांगीण विकास पाहता येणार आहे. अजित पवार यांच्या कार्याची उंची लक्षात घेता हा स्मारकस्तंभही शहरातील सर्वाधिक उंच ठरणार आहे.

प्रशासकीय भवनाशेजारील जागेत तीन मजली अत्याधुनिक संग्रहालय (म्युझियम) उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयात अजित पवार यांना विविध क्षेत्रांत मिळालेले सन्मान, भेटवस्तू आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण वस्तू जतन केल्या जाणार आहेत.

अजित पवार यांची जनतेशी असलेली जवळीक आणि ‘जनता दरबार’ ही त्यांची विशेष ओळख लक्षात घेऊन त्याची प्रतिकृतीही स्मारकात साकारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जन्मापासूनच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक प्रवासाचा संपूर्ण जीवनपट आधुनिक दृकश्राव्य माध्यमांद्वारे नागरिकांसमोर उलगडण्यात येणार आहे.

बारामतीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळावी आणि अजित पवार यांचे कार्य भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात येत असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

सभेदरम्यान विविध नगरसेवकांनीही काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. स्वच्छता हा अजित पवार यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतचा त्यांचा पुतळा उभारावा, त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करावी तसेच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी राज्य शासनाकडे शिफारस करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

अजित पवार यांचे स्मारक हा बारामतीकरांच्या भावनांशी निगडित विषय असून, या प्रकल्पाला लवकरात लवकर मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सभागृहात दिली.

सुनेत्रा पवारांच्या अचानक पाहणीनंतर बारामती वैद्यकीय महाविद्यालयात मोठी प्रशासकीय उलथापालथ; डीनसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली

0
सुनेत्रा पवारांच्या अचानक पाहणीनंतर बारामती वैद्यकीय महाविद्यालयात मोठी प्रशासकीय उलथापालथ; डीनसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली

सुनेत्रा पवारांच्या अचानक पाहणीनंतर बारामती वैद्यकीय महाविद्यालयात मोठी प्रशासकीय उलथापालथ; डीनसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली

बारामती | प्रतिनिधी :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला दिलेल्या अचानक भेटीनंतर आरोग्य प्रशासनात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. महस्के तसेच प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांची बदली करण्यात आल्याने बारामतीच्या प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान रुग्णसेवा, स्वच्छता, औषध उपलब्धता, विविध विभागांचे कामकाज तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा सविस्तर आढावा घेतला होता. पाहणीवेळी काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्याची चर्चा रंगली होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत आरोग्यसेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यावर त्यांनी भर दिला होता.

विशेष म्हणजे, या पाहणीनंतर अवघ्या काही दिवसांतच डीन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाल्याने या निर्णयाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. प्रशासनातील कार्यक्षमता, जबाबदारी आणि उत्तरदायित्वाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा संदेश या निर्णयातून गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

दरम्यान, महाविद्यालयाच्या नवीन अधिष्ठाता म्हणून डॉ. किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील कामकाज अधिक गतिमान आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बारामतीतील नागरिक, सामाजिक संस्था आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी या बदलांचे स्वागत केले असून आरोग्य व्यवस्थेत अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासन उभे राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

‘पाहणी आणि तातडीचा निर्णय’ ठरला चर्चेचा विषय

विकासकामांसोबतच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तेबाबत सुनेत्रा पवार स्वतः लक्ष घालत असल्याचे या घडामोडींमधून अधोरेखित झाले आहे. केवळ पाहणीपुरते मर्यादित न राहता आवश्यक ठिकाणी त्वरित निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यास प्रशासन मागेपुढे पाहणार नाही, असा संदेश या प्रशासकीय फेरबदलातून गेल्याची चर्चा सध्या बारामतीत रंगत आहे.

रुई परिसरात वन विभागाची धडक कारवाई; विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

0
रुई परिसरात वन विभागाची धडक कारवाई; विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

बारामती | प्रतिनिधी

मौजे रुई गावच्या हद्दीत बारामती-भिगवण मार्गावर वन विभागाने धडक कारवाई करत विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईत कडूनिंब व जांभूळ प्रजातीच्या वृक्षांचे अंदाजे ८ ते ९ टन लाकूड हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांनी दिली.

पारवडी येथील वनरक्षक संतोष जराड व हंगामी रोजंदारी मजुरांच्या पथकाने गस्तीदरम्यान टाटा कंपनीचा पांढऱ्या-क्रीम रंगाचा टेम्पो संशयास्पद स्थितीत आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये कडूनिंब व जांभूळ वृक्षांचे विनापरवाना तोडलेले लाकूड वाहतूक परवान्याविना नेले जात असल्याचे उघड झाले.

वन विभागाने तत्काळ कारवाई करत मुद्देमालासह टेम्पो ताब्यात घेतला असून पुढील चौकशीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाईदरम्यान वाहन चालक फरार झाला.

या प्रकरणी वाहन चालक व मालकाविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत कलम ४१, ४२ व ५२(१) अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, वनपाल एस. आर. उंडे व वनरक्षक संतोष जराड करीत आहेत.

वन विभागाच्या या कारवाईमुळे विनापरवाना वृक्षतोड व लाकूड वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अगरवाल प्रकरणांमधून समोर येणारे वास्तव; पुढील पिढीच्या संस्कारांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह

0
अगरवाल प्रकरणांमधून समोर येणारे वास्तव; पुढील पिढीच्या संस्कारांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह

विशेष लेख | प्रतिनिधी :  अलीकडील काळात देशभरात घडलेल्या काही धक्कादायक घटनांनी समाजमन अस्वस्थ झाले आहे. पुण्यातील चर्चित वेदांत अगरवाल प्रकरण असो किंवा मुंबईत समोर आलेले केतन अगरवाल हत्याकांड असो, या दोन्ही घटनांनी केवळ गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केलेला नाही, तर आजच्या पिढीच्या जडणघडणीबाबत गंभीर चिंतन करण्याची वेळ आणली आहे.

समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांच्या मते, वाढत्या भौतिकवादासोबत नैतिक मूल्यांचे होणारे क्षरण ही चिंतेची बाब बनत चालली आहे. अनेक कुटुंबांमध्ये मुलांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली जबाबदारी, शिस्त, सामाजिक भान आणि योग्य-अयोग्य यातील फरक समजावून सांगण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, कोणतीही गंभीर गुन्हेगारी घटना एका दिवसात घडत नाही. त्यामागे कुटुंबीय वातावरण, सामाजिक प्रभाव, मित्रपरिवार, डिजिटल माध्यमांचा वापर, मानसिकता आणि मूल्यव्यवस्था यांचा दीर्घकालीन परिणाम असतो. त्यामुळे अशा घटनांचा विचार करताना केवळ आरोपी किंवा पीडित यांच्यावर लक्ष केंद्रित न करता व्यापक सामाजिक संदर्भ समजून घेणे आवश्यक ठरते.

आजच्या काळात मुलांच्या हातात लहान वयातच स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि विविध प्रकारचे डिजिटल कंटेंट उपलब्ध होत आहेत. अनेकदा पालक आर्थिक गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य देताना मुलांच्या भावनिक, नैतिक आणि सामाजिक विकासाकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. परिणामी, काही तरुणांमध्ये सहानुभूती, संयम, जबाबदारी आणि इतरांच्या जीवनाविषयी आदर या मूल्यांचा अभाव दिसून येत असल्याची चिंता व्यक्त केली जाते.

काही सामाजिक अभ्यासकांच्या मते, “स्वातंत्र्य” आणि “स्वैराचार” यातील सीमारेषा स्पष्ट करणे आजच्या पालकांसमोर मोठे आव्हान आहे. मुलांना निर्णयस्वातंत्र्य देतानाच त्यांच्या कृतींची जबाबदारी समजावून सांगणे, चुकांचे परिणाम स्पष्ट करणे आणि योग्य मार्गदर्शन करणे तितकेच आवश्यक आहे.

विशेष म्हणजे, समाजातील सर्वच स्तरांमध्ये हा बदल जाणवत आहे. पूर्वी उच्चभ्रू वर्गापुरती मर्यादित वाटणारी काही जीवनशैली आणि मूल्यव्यवस्था आता मध्यमवर्गीय कुटुंबांमध्येही वेगाने पोहोचली आहे. यामुळे परंपरा, सामाजिक बंधने आणि नैतिक शिक्षण याबाबतच्या दृष्टिकोनात मोठा बदल दिसून येत आहे.

तज्ज्ञांचे मत आहे की, मुलांना केवळ शैक्षणिक यश किंवा आर्थिक प्रगतीसाठी तयार करणे पुरेसे नाही. त्यांच्यामध्ये संवेदनशीलता, माणुसकी, सहजीवनाची भावना, कायद्याचा आदर आणि नैतिक जबाबदारी रुजवणे तितकेच महत्त्वाचे आहे. कुटुंब, शाळा, समाज आणि माध्यमे या सर्वांची त्यात महत्त्वाची भूमिका असते.

वेदांत अगरवाल आणि केतन अगरवाल यांच्याशी संबंधित घटना न्यायालयीन प्रक्रियेतून जात असल्या तरी त्या समाजासाठी एक इशारा ठरत आहेत. या घटनांकडे केवळ गुन्हेगारी म्हणून न पाहता, बदलत्या सामाजिक मूल्यव्यवस्थेचा आरसा म्हणून पाहण्याची गरज आहे. पुढील पिढीला योग्य दिशा देण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

प्रभाग क्रमांक १० मध्ये धोकादायक झाडांची पाहणी; नागरिकांच्या समस्या जाणून तत्काळ उपाययोजनांचे निर्देश

0
प्रभाग क्रमांक १० मध्ये धोकादायक झाडांची पाहणी; नागरिकांच्या समस्या जाणून तत्काळ उपाययोजनांचे निर्देश

प्रभाग क्रमांक १० मध्ये धोकादायक झाडांची पाहणी; नागरिकांच्या समस्या जाणून तत्काळ उपाययोजनांचे निर्देश

अकलूज | प्रतिनिधी.  अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील तथा नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १० मधील विविध भागांमध्ये वाढलेल्या धोकादायक झाडांची आणि झाडांच्या फांद्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी कर्तव्यदक्ष नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी झाडांच्या वाढलेल्या फांद्या तसेच काही धोकादायक झाडांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याची दखल घेत नगरसेविका मनिषाताई तिकोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच धोकादायक झाडे हटविण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. रस्ते, स्वच्छता, पथदिवे तसेच इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या अडचणींची नोंद घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या.

नगरसेविका मनिषाताई तिकोटे या सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याने नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसह प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


प्रमोशन प्रक्रियेसंदर्भात शिक्षक संघाची उद्या जिल्हाध्यक्ष प्रियाताई शिंदे यांच्याशी भेट; सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन

0
प्रमोशन प्रक्रियेसंदर्भात शिक्षक संघाची उद्या जिल्हाध्यक्ष प्रियाताई शिंदे यांच्याशी भेट; सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन

प्रमोशन प्रक्रियेसंदर्भात शिक्षक संघाची उद्या जिल्हाध्यक्ष प्रियाताई शिंदे यांच्याशी भेट; सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन

सातारा | प्रतिनिधी. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, आजी-माजी पदाधिकारी तसेच शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या होऊ घातलेल्या पदोन्नती (प्रमोशन) प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवार, दि. २५ जून रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष सौ. प्रियाताई शिंदे यांची भेट घेण्यात येणार आहे.

ही बैठक खटाव-पुसेगाव रस्त्यावर आयोजित करण्यात आली असून, पदोन्नती प्रक्रियेत शिक्षकांच्या विविध मागण्या, अडचणी आणि अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघासोबत सर्व संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे आणि सरचिटणीस समीर बागवान यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षकांच्या प्रश्नांबाबत एकजूट दाखवावी, असे आवाहन केले आहे.

शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी, तसेच संबंधित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.