Saturday, June 13, 2026
Home Blog

कायद्याची पदवी संपादन करून उमेश रामदास काकडे यांची यशस्वी भरारी; सामाजिक कार्याला मिळणार नवे बळ

0
कायद्याची पदवी संपादन करून उमेश रामदास काकडे यांची यशस्वी भरारी; सामाजिक कार्याला मिळणार नवे बळ


फलटण | प्रतिनिधी :- सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून जनजागृती आणि लोकहिताच्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे उमेश रामदास काकडे यांनी नुकतीच एलएल.बी. (Bachelor of Laws) पदवी यशस्वीरीत्या संपादन करून आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रवासात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या यशामुळे सामाजिक कार्यासोबतच न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढण्याची त्यांची क्षमता अधिक बळकट होणार असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
उमेश काकडे हे अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी प्रतिबंध, बालकामगार निर्मूलन अशा विविध सामाजिक विषयांवर त्यांनी पथनाट्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली आहे. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील राहून त्यांनी लोकहितासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
तसेच ते तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. सामाजिक ऐक्य, शिक्षण, संविधानिक मूल्ये आणि न्याय यांचा प्रसार करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या कार्याचा लाभ अनेक नागरिकांना होत आहे.
कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर समाजातील वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार उमेश काकडे यांनी व्यक्त केला आहे. संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून समाजसेवा करण्याची त्यांची भूमिका अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“तुमच्यातील वैचारिक ताकद आता समाजाला न्याय देण्यासाठी आणि वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज झाली आहे. संविधानाच्या आणि कायद्याच्या मार्गाने तुमच्या हातून भविष्यात मोठे सामाजिक कार्य घडो, हीच सदिच्छा. तुमचा संघर्ष आणि यशस्वी प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.
उमेश रामदास काकडे यांना एलएल.बी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या आगामी वकिली व्यवसायासह सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

काल महायुतीच्या बैठकीला उपस्थित, आज एकनाथ शिंदेंच्या भेट, शरद पवार गटाच्या आमदारांच्या मनात काय

0


सातारा :  विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहे. जसंजसं मतदानाची तारीख जवळ येईल तसंतसं महायुतीला पाठिंबा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला विधानपरिषद उमेदवारीवरुन नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तीन आमदार उपस्थित असल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट घेतली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आम्ही सोलापूर विधानपरिषद निवडणूकित भाजपसोबत आहोत. आमच्याकडे संख्याबळ नसल्याने आणि टोकाची कटुता येऊ नये म्हणून मी महायुतीला पाठिंबा दिला आहे.  मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही ही भूमिका घेतली का? या प्रश्नाला उत्तर देताना तो शो झाला आहे असं सांगत या प्रश्नाला बगल दिली. मतदार संघात निधीची गरज लागते त्यामुळे मी भेट घेतल्याची माहिती जानकर यांनी दिली. 

महायुतीच्या कालच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार पैकी तीन आमदार उपस्थित

सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात महायुतीची बैठक काल आयोजीत केली होती. या बैठकीला शरद पवार गटाचे आणदार उपस्थित राहिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीला माढ्याचे शऱद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट सामना असताना देखील राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपला पाठिंबा मिळ आहे. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडले आहेत. सोलापुरात महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार पैकी तीन आमदार उपस्थित आहेत. केवळ मोहोळचे आमदार राजू खरे हे एकमेव शरद पवार गटाचे आमदार या बैठकीला आले नाहीत.

महत्वाच्या बातम्या:

सोलापुरात महायुतीची बैठक, शरद पवारांच्या गटाचे तीन आमदार उपस्थित, मोहित पाटील पडले एकाकी

 

 



Source link

फलटणच्या सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेची चौकशी सुरू

0
फलटणच्या सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेची चौकशी सुरू

फलटण | प्रतिनिधी :- फलटण क्रमांक २ येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-२ दिपक सावळा पवार यांच्यावर महाराष्ट्र शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत त्यांच्या कार्यालयातून नोंदणी झालेल्या तब्बल १,५४५ दस्तांच्या व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने महसूल व वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या ११ जून २०२६ रोजीच्या आदेशानुसार, “एक जिल्हा एक नोंदणी” योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या दस्तांची तपासणी सुरू असून अनेक व्यवहारांमध्ये नियमभंग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या सर्व दस्तांची विशेष पथकामार्फत सखोल चौकशी केली जात असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.
प्राथमिक तपासणीत सातारा जिल्ह्यातील फलटण, कराड, खंडाळा, वाई आणि दहिवडी (माण) तालुक्यांमधील ५८ दस्तांमध्ये महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण अधिनियम, १९४७ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेली सक्षम प्राधिकाऱ्यांची प्रमाणपत्रे संबंधित दस्तांशी जोडलेली नसल्याचे आढळून आले आहे.
या प्रकारामुळे भविष्यात न्यायालयीन वाद निर्माण होण्याची शक्यता असून नोंदणी विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते, असे शासनाने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे विभागाची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दिपक पवार यांनी आपल्या शासकीय कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या तरतुदींचा भंग झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे शासनाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांना पदावर कायम ठेवणे प्रशासकीयदृष्ट्या अयोग्य असल्याचे नमूद करत त्यांचे निलंबन करण्यात आले.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत ११ जून २०२६ पासून त्यांचे निलंबन लागू करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत ते कायम राहणार आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय सह जिल्हा निबंधक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे निश्चित करण्यात आले आहे. तसेच सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.
शासनाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष पथकाचा तपास पूर्ण झाल्यानंतर दिपक पवार यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करून दोषारोपपत्रासह प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
निलंबन कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता मिळणार असला तरी आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच या काळात कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, जमीन व दस्त नोंदणी व्यवहारांशी संबंधित या प्रकरणामुळे फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चा रंगली असून उर्वरित दस्तांच्या तपासणीत आणखी कोणत्या अनियमितता समोर येतात, याकडे नागरिकांसह संबंधित विभागाचे लक्ष लागले आहे.

सामाजिक बांधिलकी जपणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व; मोहन तिकोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
सामाजिक बांधिलकी जपणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व; मोहन तिकोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सामाजिक बांधिलकी जपणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व; मोहन तिकोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


अकलूज | प्रतिनिधी. अन्नपूर्णा मंगल कार्यालयाचे मालक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे मोहन तिकोटे यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी आणि शुभेच्छांच्या वर्षावात साजरा होत आहे.
अकलूज शहर आणि परिसरात मोहन तिकोटे हे केवळ उद्योजक म्हणून नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीला तत्पर असणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. गरजू नागरिकांना मदतीचा हात देणे, सामाजिक उपक्रमांना पाठबळ देणे, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसाठी विविध योजना राबविण्यासाठी पुढाकार घेणे, ही त्यांची कार्यशैली राहिली आहे.
अलीकडेच अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित एनसीएमसी स्मार्ट कार्ड आणि एसटी पास विशेष शिबिराला त्यांनी सक्रिय सहकार्य केले. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना शासकीय सुविधांचा लाभ मिळाला. तसेच शहरात झालेल्या  वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मोहन तिकोटे आणि त्यांच्या पत्नी अकलूज नगर परिषदेच्या नगरसेविका मनिषाताई तिकोटे , तसेच त्यांच्या कुटुंबाने तात्काळ पुढाकार घेतला. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन प्रशासनाशी समन्वय साधत मदतकार्य उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मोहन तिकोटे यांची सामाजिक जाणीव, लोकांप्रती असलेली आत्मीयता आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम उपलब्ध राहणारे आणि समाजहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

साहस Times तर्फे मोहन तिकोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिकेची धडक मोहीम; शेवटचे अतिक्रमण हटेपर्यंत कारवाई सुरूच – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर

0
पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिकेची धडक मोहीम; शेवटचे अतिक्रमण हटेपर्यंत कारवाई सुरूच – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर

पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिकेची धडक मोहीम; शेवटचे अतिक्रमण हटेपर्यंत कारवाई सुरूच – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर


फलटण | प्रतिनिधी :-  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी फलटण नगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील शेवटचे अतिक्रमण हटेपर्यंत ही कारवाई अविरत सुरू राहणार असल्याचा निर्धार नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
पालिकेच्या या कठोर आणि नियोजनबद्ध मोहिमेचे शहरातील सुजाण नागरिकांकडून स्वागत केले जात असून, पालखी मार्ग मोकळा करण्याच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
भेदभावाशिवाय समान कारवाई
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईबाबत बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, “कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. अतिक्रमण काढताना गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आमचे स्वतःचे अतिक्रमण आढळले तरी तेही प्रथम प्राधान्याने हटविले जाईल. पालखी मार्ग पूर्णपणे मोकळा करणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क
ही मोहीम नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मुख्याधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले अधिकारी, पालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात शहरातील विविध भागांमधील बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याची कारवाई दररोज सुरू आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही अडथळा येऊ नये आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मलठण-जिंती नाका परिसरातील स्वच्छता व पाणीपुरवठ्याची प्रशासनाकडून पाहणीनगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांचे दौरे; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे निर्देश

0
मलठण-जिंती नाका परिसरातील स्वच्छता व पाणीपुरवठ्याची प्रशासनाकडून पाहणीनगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांचे दौरे; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे निर्देश

मलठण-जिंती नाका परिसरातील स्वच्छता व पाणीपुरवठ्याची प्रशासनाकडून पाहणी
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांचे दौरे; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे निर्देश

फलटण | प्रतिनिधी. फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी निखिल जाधव, आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे, पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर तसेच नगरसेवक रोहित नागटिळे यांनी मलठण आणि जिंती नाका परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे, ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रशासनाला सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे आदेश दिले. तसेच नव्याने मंजूर झालेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या जागा तातडीने स्वच्छ करून दर्जेदार बांधकाम सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला करण्यात आल्या.
यावेळी पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांनी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची स्थिती, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. नागरिकांना नियमित वेळेत आणि योग्य दाबाने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाणीपुरवठा विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेत कचराकुंड्या नियमित साफ करण्यावर भर दिला. नागरिक व व्यापाऱ्यांकडून ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्या जागांची सातत्याने स्वच्छता राखावी तसेच घंटागाडीचे वेळापत्रक नागरिकांच्या सोयीनुसार निश्चित करून कचरा संकलन अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, नगरसेवक रोहित नागटिळे यांनी प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी सांगितले की, गेल्या तीन दशकांपासून प्रलंबित असलेल्या अनेक मूलभूत समस्या आता प्राधान्याने सोडविण्यात येणार आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक ५ च्या विकासाला गती देण्यात येईल आणि नागरिकांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणीमुळे मलठण व जिंती नाका परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले असून नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

रात्रीच्या अचानक पाहणीने प्रशासनात खळबळ; पालखी मार्ग व ‘नमो उद्यान’ कामांना नगराध्यक्षांचे गतीचे निर्देश

0
रात्रीच्या अचानक पाहणीने प्रशासनात खळबळ; पालखी मार्ग व ‘नमो उद्यान’ कामांना नगराध्यक्षांचे गतीचे निर्देश

रात्रीच्या अचानक पाहणीने प्रशासनात खळबळ; पालखी मार्ग व ‘नमो उद्यान’ कामांना नगराध्यक्षांचे गतीचे निर्देश


फलटण | प्रतिनिधी फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बुधवारी रात्री अचानक फलटण शहरातील सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या विकासकामांची तसेच प्रस्तावित ‘नमो उद्यान’च्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. दिवसभर नगरपरिषदेत पालखी मार्गाच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर रात्रीच त्यांनी कामाच्या ठिकाणी भेट देत प्रगतीचा आढावा घेतल्याने प्रशासकीय यंत्रणेत चांगलीच हालचाल निर्माण झाली.
पालखी मार्गावर उभारण्यात येणाऱ्या पथदिव्यांच्या कामाबाबत नगराध्यक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. स्ट्रीट लाईटसाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी दिव्यांच्या उभारणीदरम्यान सर्व तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देत, दिव्यांचा पाया मजबूत व सुरक्षित असावा यावर त्यांनी विशेष भर दिला. भविष्यात कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी स्वामी विवेकानंद नगर परिसरातील रायगड हॉटेल शेजारी प्रस्तावित ‘नमो उद्यान’च्या जागेचीही त्यांनी पाहणी केली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून या उद्यानासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा साचणे आणि खोल खड्डा असल्याने उद्यान उभारणीस अडथळे निर्माण होत होते. सध्या खड्डा भरून जागा समतल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहराला आधुनिक आणि आकर्षक उद्यान मिळावे यासाठी आवश्यक कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.
पाहणीदरम्यान फिरण्यासाठी बाहेर पडलेले शहरातील काही नामांकित वकील नगराध्यक्षांना भेटले. यावेळी उद्यानासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. संवाद साधताना समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “अनेक वर्षे सत्ता हातात असूनही पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना शहराचा अपेक्षित विकास साधता आला नाही. मात्र, येत्या काही वर्षांत फलटण शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा आमचा निर्धार आहे.”
या पाहणी दौऱ्यावेळी महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन रणजीतसिंह भोसले, ज्येष्ठ नगरसेवक सुदाम (आप्पा) मांढरे, नगरसेवक संदीप चोरमले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, युवा नेते अमोल सस्ते तसेच बांधकाम व्यावसायिक दीपक देशमुख उपस्थित होते.

कडू असलं तरी गुणांनी भरलेलं! कारले खाण्याचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

0
कडू असलं तरी गुणांनी भरलेलं! कारले खाण्याचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

मधुमेह नियंत्रणापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत कारल्याचे अनेक लाभ; रोगप्रतिकारक शक्ती वाढवून पचनक्रिया सुधारण्यासही मदत

आरोग्य प्रतिनिधी : कारल्याचे नाव ऐकताच अनेक जण त्याच्या कडूपणामुळे नाक मुरडतात. मात्र, ही कडू भाजी पोषणमूल्यांचा खजिना मानली जाते. कारल्यामध्ये लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, झिंक, पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी कारले अत्यंत उपयुक्त ठरते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान
कारल्यातील नैसर्गिक औषधी गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी कारले किंवा कारल्याचा रस फायदेशीर मानला जातो.
हृदयाचे आरोग्य जपते
कारल्यामध्ये असलेले पोटॅशियम आणि इतर पोषक घटक शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत असलेले कारले शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. त्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
डोळ्यांसाठी उपयुक्त
कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते आणि दृष्टीसंबंधी समस्या टाळण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारते
उच्च फायबरयुक्त कारले पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. आयुर्वेदातही पचनाच्या तक्रारी कमी करण्यासाठी कारल्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासही ते उपयुक्त ठरते.
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत
कारल्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने ते चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही कारले उपयुक्त मानले जाते.
नियमित आणि योग्य प्रमाणात कारल्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. कडूपणामुळे दूर न राहता या गुणकारी भाजीचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

What’s app समभार

डारिओ अमोदेई यांचा कॉलम: एआयचा वेग इतका जास्त आहे की आपणच मागे पडत आहोत

0
डारिओ अमोदेई यांचा कॉलम:  एआयचा वेग इतका जास्त आहे की आपणच मागे पडत आहोत




‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मधील एका उपकथेत दोन हॉबिट्स आपल्या जंगलाच्या सुरक्षेबद्दल चिंतेत आहेत. ते यासाठी एका ट्री-बीयर्डला विनंती करतात. ट्री-बीयर्ड हा एक बुद्धिमान पण अत्यंत संथ गतीने काम करणारा वृक्ष आहे. अडचण अशी होती की, जिथे एक संपूर्ण सैन्य जंगल कापून नष्ट करत असते, तिथे ट्री-बीयर्डची वेळेची समज खूप संथ असते. त्याला दुसऱ्या एखाद्या वृक्षाला ‘हॅलो’ म्हणायलाच पूर्ण दिवस लागायचा, त्यामुळे त्याला आणि त्याच्या सोबत्यांना इतक्या जलद कारवाईसाठी तयार करणे जवळजवळ अशक्य होते. एआय आणि आपल्या राजकीय संघटनांचे नातेही काहीसे हॉबिट्स आणि ट्री-बीयर्डसारखेच वाटते. एआय अत्यंत वेगाने पुढे जात आहे. अवघ्या चार वर्षांपूर्वीपर्यंत एआय मॉडेल्स एखादी कोडची ओळही जेमतेम अचूक लिहू शकत होते, पण आज प्रमुख एआय कंपन्यांमध्ये बहुतेक कोड तेच लिहीत आहेत. अशाच प्रकारची प्रगती जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, वित्त, कायदा, भाषांतर आणि इतर अनेक क्षेत्रांतही पाहायला मिळाली आहे. एआयच्या स्केलिंग नियमांना आता एका दशकाहून अधिक काळाच्या अनुभवात्मक पुराव्यांचे समर्थन मिळाले आहे. जर हे स्केलिंग नियम केवळ आणखी एक-दोन वर्षे चालू राहिले, तर बहुदा आपण अशा टप्प्यावर पोहोचू, ज्याला मी ‘पॉवरफुल एआय’ म्हटले आहे. याच्या उलट, धोरणे आणि कायदे बनवण्याचा वेग अत्यंत संथ आहे. अनेकदा याची योग्य कारणेही असतात. सरकारांकडे गंभीर आणि व्यापक अधिकार असतात, आणि सामान्यतः असा निर्णय घाईघाईत न घेणेच अधिक चांगले मानले जाते, परंतु वेळेच्या गतीमधील हे असंतुलन त्रासदायक आहे. संसद एखादा निर्णय घ्यायला अनेक वर्षे लावते, तर तितक्या वेळात एआय प्रतिभावंतांनी भरलेल्या एका संपूर्ण देशाच्या क्षमतेपर्यंत पोहोचतो! जेव्हापासून एआय हे एक प्रमुख कमर्शियल टेक्नॉलॉजी म्हणून उदयास आले आहे. आपल्यापैकी जे लोक याला जबाबदारीने चालवू इच्छित होते, ते एका दुविधेत अडकले होते. हे तंत्रज्ञान कोणत्या दिशेने जात आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसत होते. आपल्याला वाटत होते की काही वर्षांतच एआय अशा दुर्मिळ तंत्रज्ञानांपैकी एक बनेल, जे संपूर्ण धोरणात्मक परिदृश्य मुळापासून बदलून टाकेल- अगदी तसेच जसे अणुशस्त्रांनी भू-राजकारण बदलले होते आणि औद्योगिक क्रांतीने आर्थिक प्रश्नांचे स्वरूप पायाभूतपणे बदलून टाकले होते. पण जे लोक त्या वेळी एआयच्या क्षमता पाहत होते, त्यांना हे खूप साधे तंत्रज्ञान वाटत होते बहुतांश धोरणकर्ते आणि कंपन्यांना हे पटवून देणे कठीण होते की, मुक्त-बाजार आधारित दृष्टिकोनाशिवाय इतर कोणतेही धोरण योग्य असू शकते. खरे सांगायचे तर एआयचे व्यापक प्रभाव त्या वेळेपर्यंत समोर आलेही नव्हते आणि ते कोणत्या स्वरूपात समोर येतील, हेही आपल्याला माहीत नव्हते. त्यामुळे योग्य धोरणे आखणे कठीण होते. परंतु या मर्यादा पाहता सुरक्षेवर भर देणाऱ्या संघटनांनी (ज्यात अँथ्रोपिकचाही समावेश आहे) अशा धोरणात्मक उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले आहे, जे भविष्यातील पर्याय सुरक्षित ठेवतील, पुढे जाऊन तीव्र प्रतिक्रिया देण्याची क्षमता विकसित करतील, जगाला पुढे काय येणार आहे याची अधिक चांगली समज देतील- जसे की पारदर्शकता कायदे, चिप निर्यात नियंत्रण आणि एआयच्या श्रम-बाजारावरील प्रभावांशी संबंधित डेटाचे संकलन. मान्य आहे की हे उपाय अपुरे आहेत, पण आतापर्यंत तर हीच पावले अशी वाटत होती, जी प्रत्यक्षात आणणे शक्य होते. तथापि, गेल्या काही महिन्यांत एआयची असाधारण शक्ती आणि त्याच्याशी संबंधित जोखमींचे पुरावे इतके स्पष्ट झाले आहेत की आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. कदाचित याचे सर्वात मोठे प्रतीकात्मक उदाहरण ‘क्लॉड मायथोस प्रिव्ह्यू’ हे आहे. आता आपल्याला माहीत आहे की आघाडीचे एआय मॉडेल्स सायबर सुरक्षेसाठी वास्तविक आणि गंभीर धोका निर्माण करतात, ज्यामुळे वित्तीय क्षेत्र, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय सुरक्षेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते. वास्तविक पाहता, मायथोसने जागतिक सायबर सुरक्षा परिदृश्याला हादरवून सोडले आहे, पण याने हेही सिद्ध केले की, एआय मॉडेल्स आता धोरणात्मक महत्त्वाचे साधन बनले आहेत. आता आपल्याला अशा धोरणात्मक यंत्रणेला सक्रिय करावे लागेल, जी येणाऱ्या काळातील जोखमींचा सामना करू शकेल. हे कौतुकास्पद आहे की आपले अनेक समकालीनही आता त्याच दृष्टिकोनांकडे वळत आहेत, ज्याची वकिली आपण गेल्या काही वर्षांपासून करत होतो. (darioamodei.com वरून साभार) आपल्याला काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल, जसे की सार्वजनिक सुरक्षा आणि एआय नियमन, याच्याशी संबंधित मॅक्रो-इकॉनॉमिक्स व कर धोरणे आणि एआयचे सकारात्मक प्रभाव वाढवणे. वेळ कमी आहे, आपल्याला चपळता दाखवावी लागेल.



Source link

फलटणात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी १४ जून रोजी मुलाखती; इच्छुक शिवसैनिकांना आवाहन

0
फलटणात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी १४ जून रोजी मुलाखती; इच्छुक शिवसैनिकांना आवाहन

फलटणात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी १४ जून रोजी मुलाखती; इच्छुक शिवसैनिकांना आवाहन

फलटण | प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण-कोरेगाव आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघांसाठी शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदांपर्यंतच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्यांसाठी इच्छुक शिवसैनिकांच्या मुलाखतींचे आयोजन रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी फलटण येथील कोळकी परिसरातील अनंत मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासह तळागाळातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार असून, माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील मुलाखती दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत पार पडतील.
या मुलाखती शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख सौ. रेश्माताई जगताप तसेच माढा लोकसभा युवा सेनेचे संपर्कप्रमुख सुजित खुर्द यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिवसेना संघटनेतील विविध पदांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहून मुलाखत प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्वाची निवड करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
यासंदर्भातील माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील यांनी दिली.