Home Blog

फलटणमध्ये अतिक्रमणाविरोधी कारवाई; सुपर मार्केट परिसर मोकळा

0
फलटणमध्ये अतिक्रमणाविरोधी कारवाई; सुपर मार्केट परिसर मोकळा


फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात अतिक्रमणाविरोधी मोहीम जोरात सुरू करण्यात आली असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी थेट अॅक्शन मोडमध्ये येत सुपर मार्केट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई केली. शहरातील गजबजलेल्या व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या भागात असलेल्या बेकायदेशीर फेरीवाले, अनधिकृत दुकाने, हातगाड्या तसेच रस्ते, फुटपाथ व पथदिव्यांना अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवण्यात आली.
सुपर मार्केट परिसरात वाढत्या गर्दीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. नागरिकांना पायी चालताना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी नगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभाग, नगररचना विभाग आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली.
 हातगाड्या व तात्पुरती दुकाने हटवली
कारवाईदरम्यान अनेक हातगाड्या, तात्पुरती दुकाने व जाहिरात फलक काढून टाकण्यात आले. काही व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून भविष्यात अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले, “शहर स्वच्छ, सुस्थितीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.” नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
️ नागरिकांची शहरभर मोहीम राबवण्याची मागणी
सुपर मार्केट परिसरातील कारवाईनंतर शहरातील नागरिकांनी संपूर्ण फलटणमध्ये विशेष अतिक्रमण मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, फुटपाथ, सार्वजनिक जागा आणि चौकांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे असल्याने वाहतूक, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काही नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत करत नियमितपणे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. तर काही व्यापाऱ्यांनी अचानक झालेल्या कारवाईमुळे नुकसान झाल्याचे सांगत पुनर्वसन व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
❓ मोहीम सुरूच राहणार का?
नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम टप्प्याटप्याने सुरू ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे ही मोहीम सातत्याने राबवली जाणार की काही दिवसांत थांबणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

रात्र झाली अन् दर घसरले! चांदी 1.93 लाखांनी स्वस्त, सोनं 43 हजारांनी झालं कमी; पहा नवे दर

0
रात्र झाली अन् दर घसरले! चांदी 1.93 लाखांनी स्वस्त, सोनं 43 हजारांनी झालं कमी; पहा नवे दर


Gold Silver Price Fall On 17 Feb Night: सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्यानंतर मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चांदीच्या किंमतीमध्ये घट होऊन चांदी 2.26 लाख रुपये किलोपर्यंत पोहचली असून सोन्या दरांमध्येही विक्रमी घसरण नोंदवण्यात आली आहे. दरांमध्ये झालेले हे बदल मल्टी कमोडिटी मार्केट म्हणजेट एमसीएक्सवर पाहायला मिळत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कितीने पडले सोन्याचे दर?

मंगळवारी रात्री एमसीएक्सवर 5 मार्चच्या वायद्यासाठी चांदीची किंमत 5.58 टक्क्यांनी घसरली. म्हणजेच प्रती किलो 13 हजार 378 रुपयांनी घरसण होऊन चांदी 2 लाख 26 हजार 513 रुपयांवर आली. त्याचप्रमाणे 2 एप्रिलच्या वायद्यासाठी सोन्याच्या किंमतीतही घसरण दिसून येत आहे. 10 ग्राम सोन्याची किंमत बाजारपेठेत 3 हजार 796 रुपयांनी म्हणजेच 2.45 टक्क्यांनी घसरली. सोनं 1 लाख 50 हजार 964 रुपये प्रती तोळ्यावर पोहोचलं आहे. मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली ही सर्वात मोठी पडझड ठरली आहे.

चांदीच्या दरांमध्ये 1.93 लाखांची घसरण तर सोन्याच्या दरांमध्ये…

29 जानेवारी रोजी सोनं आणि चांदीच्या दरांनी विक्रमी स्तर गाठला होता. चांदीने 4 लाख 20 हजार रुपये प्रती किलोपर्यंत उडी घेतली होती. मात्र आता या दरांमध्ये तब्बल 1.93 लाख रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचे सर्वोच्च दर 1 लाख 93 हजारांवर पोहचले होते. हे दर आज 43 हजारांहून अधिकने स्वस्त झाल्याचं दिसत आहे. 

अंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत

17 फेब्रुवारी रोजी अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची स्पॉट प्राइज प्रती औंस 4920 ते 4950 अमेरिकी डॉलर्सदरम्यान होती. तर चांदीचा दर प्रती औंस 74 ते 75 अमेरिकी डॉलर्स इतका होता. मंगळवारी झालेल्या पडझडीमुळे सोनं आणि चांदीचे दर या आठवड्याभरातील सर्वात खालच्या स्तराला पोहोचले आहेत. डॉलर अधिक मजबूत झाल्याने ही पडझड झाल्याचं सांगितलं जात आहे.

ईटीएफमध्येही दिसू शकते पडझड

शेअर बाजाराच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये अचानक पडझड झाल्याने बुधवारी शेअर बाजारामध्ये सोनं-चांदी ईटीएफच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. मंगळवारीही सोनं-चांदीच्या ईटीएफमध्ये घसरण दिसून आली. मंगळवारी सोनं-चांदीच्या ईटीएफचे दर 3 टक्क्यांनी पडले. विक्रमी दरांवरुन पडलेल्या दरांचा विचार केला तर चांदीच्या ईटीएफमध्ये 40 टक्क्यांची पडझड झाली आहे. तर सोन्याच्या ईटीएफमधील घसरण ही 18 टक्क्यांची आहे.

(टीप – सोनं, चांदीमध्ये गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागारांची मदत घ्या. येथील माहिती समान्य आकडेवारीवर अवलंबून असून ‘झी 24 तास’ कोणत्याही प्रकारे कोणालाही प्रोमोट करत नाही.)





Source link

फलटण नगरपरिषदेतील समिती निवडींची रंगत: सत्तासमीकरणांचा कस लागणार

0
फलटण नगरपरिषदेतील समिती निवडींची रंगत: सत्तासमीकरणांचा कस लागणार

फलटण :- फलटण शहराच्या राजकारणात वरवर शांतता दिसत असली, तरी आतल्या गोटात सत्तेच्या हालचालींना वेग आला आहे. फलटण नगरपरिषदेतील सात विषय समित्या आणि सर्वाधिक प्रभावी मानली जाणारी स्थायी समिती यांच्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय नसून सत्तेच्या वाटपाची खरी परीक्षा ठरणार आहे.
२६ फेब्रुवारीची विशेष सभा: ‘खाती कोणाची?’ याचा फैसला
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारी विशेष सभा नगरसेवकांसाठी राजकीय प्रयोगशाळा ठरणार आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असली, तरी सूत्रे मात्र राजकीय समीकरणांच्या हातीच आहेत. सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काढलेली नोटीस ही अधिकृत चौकट असली, तरी पडद्यामागे लॉबिंग, गुप्त भेटीगाठी आणि सूचक सौदेबाजी सुरू असल्याची चर्चा आहे.
समित्या म्हणजे निधी आणि प्रभावाची केंद्रे
सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, नियोजन व विकास, आरोग्य अशा समित्या केवळ नावापुरत्या नसतात; त्या निधी, प्रभाव आणि निर्णयक्षमतेची प्रमुख केंद्रे असतात. त्यामुळे कोणत्या नगरसेवकाकडे कोणती समिती जाते, यावर पुढील वर्षभरातील राजकीय दिशा ठरणार आहे. कागदोपत्री विषय समित्या आणि स्थायी समिती वेगळ्या असल्या, तरी प्रत्यक्षात स्थायी समिती ही नगरपरिषदेचा कणा मानली जाते.
पदसिद्ध सभापतींचा समीकरणांवर प्रभाव
नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतात, तर उपनगराध्यक्ष शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे काही सत्ताकेंद्रे निवडणुकीबाहेरच निश्चित होतात. महिला व बालकल्याण समितीवर महिलांनाच नेतृत्व देण्याची अट स्वागतार्ह असली, तरी तिचाही राजकीय उपयोग कसा केला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
युतीतील अंतर्गत कुरघोडी?
सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादी युती बाहेरून स्थिर दिसत असली, तरी अंतर्गत नाराजी दाटून आल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केला असताना भाजपच्या सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची निवड झाली. हा निर्णय केवळ एका पदापुरता मर्यादित न राहता युतीतील वजनकाट्याचे प्रतीक ठरला. राष्ट्रवादीचे दावेदार राहुल निंबाळकर यांची नाराजी ही वैयक्तिक न मानता पक्षीय अस्वस्थतेचे द्योतक मानली जात आहे.
समतोल राखला तर स्थैर्य, अन्यथा संघर्ष
आता खरा प्रश्न समित्यांचे वाटप कोणाला मिळते यापेक्षा, ते समन्यायी पद्धतीने होते का याचा आहे. जर सत्ताधाऱ्यांनी समतोल साधला, तर युती स्थिर राहील. अन्यथा ‘भागीदार असूनही दुय्यम वागणूक’ अशी भावना उफाळल्यास निर्णयप्रक्रिया विकासाऐवजी संघर्षकेंद्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२६ फेब्रुवारीची सभा ही औपचारिक कार्यक्रम नसेल; ती सत्तेच्या शह-काटशहाची मैफल ठरेल. फलटणकरांनी या प्रक्रियेकडे केवळ राजकीय तमाशा म्हणून नव्हे, तर शहराच्या विकासाचा कस लावणारा क्षण म्हणून पाहणे गरजेचे आहे. कारण समित्या आणि चेहरे बदलले, तरी शहराच्या प्रश्नांची जबाबदारी कायमच राहणार आहे.

फलटण न्यायालयात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी

0
फलटण न्यायालयात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी

फलटण (प्रतिनिधी) – फलटण येथील न्यायालयाच्या आवारात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख बसविण्यात यावा, अशी मागणी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री. नितीन आर. बोरकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनावर हरिश हणमंत काकडे, आदर्श विरसिंह अहिवळे, शशीकांत अहिवळे, संघराज अहिवळे, अनिकेत अहिवळे, सुजल गायकवाड, संघकारा अहिवळे, सहिल अहिवळे, राज घोडके, संघर्ष अहिवळे, संविधान काकडे, निसर्ग सावंत, प्रणव काकडे, अमर अहिवळे, प्रेम अहिवळे आणि स्वप्नील काकडे यांच्या सह्या आहेत.

संविधानाचीमूल्येजनतेपर्यंत_पोहोचावीत

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संविधान हे देशाच्या शासन व्यवस्थेचे मूलभूत तत्त्वज्ञान व मार्गदर्शक तत्वे निश्चित करणारे सर्वोच्च दस्तऐवज आहे. संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचा समावेश असून, हीच भारतीय लोकशाहीची खरी ओळख आहे.
न्यायालय हे न्यायदानाचे पवित्र स्थान असून येथे दररोज सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, वकील आणि विविध स्तरांतील लोक येत असतात. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख उभारल्यास नागरिकांना संविधानातील मूल्यांची जाणीव होईल व लोकशाही तत्त्वांबद्दल जागरूकता वाढेल, असे मंडळाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

लोकशाहीमूल्यांचे प्रतीक

संविधान उद्देशिका ही देशाच्या एकात्मतेचे आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. न्यायालयाच्या परिसरात तिचा शिलालेख उभारणे म्हणजे न्यायव्यवस्थेप्रती आदर व्यक्त करण्याबरोबरच नागरिकांमध्ये संवैधानिक कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
मागणीवर सकारात्मक विचार करून न्यायालय प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा : इंग्रजी विषयावर श्री. चंद्रकांत सस्ते यांचे विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन

0
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा : इंग्रजी विषयावर श्री. चंद्रकांत सस्ते यांचे विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन


फलटण : कमला निंबकर बालभवन च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या बोर्ड परीक्षेचे मार्गदर्शन सत्र नुकतेच उत्साहात पार पडले. इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ व अनुभवी शिक्षक श्री. चंद्रकांत सस्ते यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
सध्या ते साखरवाडी हायस्कुल साखरवाडी येथे कार्यरत असून यापूर्वी त्यांनी कमला निंबकर बालभवनमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी ते कमला निंबकर बालभवनमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात.
या मार्गदर्शन सत्रात त्यांनी इयत्ता दहावीच्या इंग्रजी बोर्ड पेपरची रचना, प्रश्नपत्रिकेचा आराखडा, गुणांचे विभाजन, तसेच प्रत्येक घटकाची तयारी कशी करावी याबाबत सविस्तर विवेचन केले. वाचन कौशल्य (Reading Skills) अंतर्गत उताऱ्यांवरील प्रश्न सोडवताना योग्य पद्धत, की-वर्ड ओळखण्याची सवय आणि वेळेचे नियोजन यावर त्यांनी भर दिला. लेखन कौशल्य (Writing Skills) विभागात पत्रलेखन, अहवाल लेखन, संवाद लेखन, ई-मेल लेखन यांसारख्या प्रश्नप्रकारांमध्ये अपेक्षित मांडणी, योग्य शब्दसंपदा आणि व्याकरणातील अचूकता याचे बारकावे स्पष्ट केले.
व्याकरण (Grammar) भागातील काळ (Tenses), Active-Passive Voice, Direct-Indirect Speech, तसेच वाक्यरचना यावर त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. साहित्य (Literature) विभागात पाठ्यपुस्तकातील धडे व कविता यांवरील अपेक्षित प्रश्न, उत्तरांची मांडणी, मुद्देसूद लेखन आणि आवश्यक तेथे संदर्भासहित स्पष्टीकरण कसे द्यावे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्तरपत्रिका स्वच्छ, सुबक आणि वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व त्यांनी विशेष अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी यावेळी इंग्रजी विषयातील अडचणी, लेखनातील चुका, व्याकरणातील संभ्रम यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. श्री. चंद्रकांत सस्ते यांनी प्रत्येक प्रश्नाला संयमपूर्वक व मार्गदर्शक स्वरूपात उत्तरे देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे दरवर्षी विद्यार्थी इंग्रजी विषयात उल्लेखनीय यश संपादन करत असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमावेळी कमला निंबकर बालभवनच्या माध्यमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक तथा विद्यमान शिक्षक तथा मानद सल्लागार विश्वास जगदाळे सर यांनी श्री.चंद्रकांत सस्ते यांचे प्रगत शिक्षण संस्थेला 40 वर्षे झाल्याच्या प्रत्यार्थ तयार करण्यात आलेले ‘मातीत रुजलेलं आभाळ गोष्ट प्रगत शिक्षण संस्थेची हे पुस्तक व कप देऊन स्वागत केले व त्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले सर यांनी सरांचा अल्पसा परिचय करून देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी कमला निंबकर बालभवन च्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गीता बोबडे उपस्थित होत्या.

सदर मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीला निश्चितच बळ मिळाले असून इंग्रजी विषयातील भीती दूर होऊन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.

8th Pay Commission: 31 डिसेंबरआधी निवृत्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नाही मिळणार फायदे? मोठी अपडेट समोर!

0
8th Pay Commission: 31 डिसेंबरआधी निवृत्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नाही मिळणार फायदे? मोठी अपडेट समोर!


8th Pay Commission: 31 डिसेंबर 2025 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यांपासून वंचित राहावे लागेल अशी चर्चा सुरु होती.अर्थसंकल्प 2025 मुळे ही चर्चा सुरु झाली. मात्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.  

Add Zee News as a Preferred Source

अर्थ मंत्रालयाने काय म्हटलंय? 

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत महत्वाची माहिती दिली. आठवा वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्तिवेतन याबाबत शिफारशी करण्यासाठी नेमल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प 2025 च्या भाग-IV ने सध्याच्या नियमांची वैधता कायम ठेवली. त्यात नागरी किंवा संरक्षण निवृत्तिवेतनात कोणताही बदल केलेला नाही. सेवानिवृत्तीची तारीख काहीही असो, सर्व कर्मचाऱ्यांना समान लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. हे विधेयक केवळ सध्याच्या निवृत्तिवेतन नियमांना दुजोरा देतय असून त्यात कोणताही भेदभाव नाही. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन आयोगाच्या शिफारशींनुसार लाभ मिळतील,  असे सरकारने म्हटलंय. हे नियम केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 2021 आणि इतर संबंधित आदेशांनुसार चालतात जे स्वतंत्रपणे लागू होतात, असेही स्पष्ट करण्यात आलय.

आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया

आठवा वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचना, भत्ते आणि निवृत्तिवेतन याबाबत सविस्तर शिफारशी करणार आहे. यासाठी सरकारने एक वेबसाइट सुरू केलीय. ज्याद्वारे वेतन, भत्ते आणि निवृत्तिवेतन याबाबत अभिप्राय मागवले जात आहेत. हे अभिप्राय मायगॉव पोर्टलवर उपलब्ध असलेल्या प्रश्नावलीद्वारेही गोळा केले जातात. ही प्रक्रिया पारदर्शक असून कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आयोगाच्या अहवालाची तयारी केली जाईल, असे यात म्हटलंय. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक न्याय्य आणि अद्ययावत वेतन प्रणाली मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.

आपले मत नोंदवता येणार

सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी अभिप्राय गोळा करण्याची प्रक्रिया 16 मार्चपर्यंत सुरू ठेवलीय. इच्छुक व्यक्ती वेबसाइट किंवा मायगॉव पोर्टलद्वारे आपले मत नोंदवू शकतात. या प्रक्रियेत सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार आहे. ज्यामुळे आयोगाच्या शिफारशी अधिक सर्वसमावेशक होतील, असे म्हटले जात आहे. यात वेतन वाढ, भत्त्यांच्या प्रकारात बदल आणि निवृत्तिवेतनाच्या सुधारणा याबाबत सूचना अपेक्षित आहेत.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांची जपणूक

31 डिसेंबर 2025 पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या लाभांपासून वगळले जाणार नाही. निवृत्तिवेतनातील सुधारणा आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर सामान्य आदेशांनुसार लागू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थ विधेयक 2025 मुळे कोणताही भेदभाव होणार नाही, कारण ते केवळ नियमांना दुजोरा देते. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही आर्थिक स्थिरता मिळेल आणि त्यांच्या हक्कांची जपणूक होईल, असे स्पष्ट करण्यात आलंय.





Source link

Satara Crime News: ‘व्हॅलेंटाईन डे’ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

0


Satara Crime News सातारा: शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’ ला घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानेच ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. (Satara Crime News)

नेमकं काय घडलं? (Satara Crime News)
14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडल्याचा आरोप आहे.

शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल- (Satara Crime News)
घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणी व कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

साताऱ्यात व्हॅलेंटाईन डेला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस…

0


Satara Crime News सातारा: शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’ ला घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानेच ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. (Satara Crime News)

नेमकं काय घडलं? (Satara Crime News)

14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडल्याचा आरोप आहे.

शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल- (Satara Crime News)

घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणी व कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील अंबरनाथमधीलही धक्कादायक घटना- (Thane Ambernath Crime News)

अंबरनाथमध्ये आठवडाभरापूर्वी महालक्ष्मी नगर येथील एका खासगी रुग्णालयात सहा वर्षीय मुलावर चुकीचे उपचार झाल्याने त्याचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. महिला डॉक्टरवर सध्या उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. संबंधित डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी याबाबत तक्रारी करत असून तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे संबंधित महिला डॉक्टरने सांगितले आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

धक्कादायक! नांदेडमध्ये 16 वर्षीय मुलाचा खून, पूर्व वैमानस्यतून घटना घडल्याचा पोलिसांचा संशय

आणखी वाचा



Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: डेटिंगची अर्थव्यवस्था ‘सोल्जर पेमेंट’पासून ‘ब्यूटी टॅक्स’पर्यंत पोहोचली

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  डेटिंगची अर्थव्यवस्था ‘सोल्जर पेमेंट’पासून ‘ब्यूटी टॅक्स’पर्यंत पोहोचली




डेटिंगचे बिल कोणी भरावे, हा वाद स्वतः डेटिंगइतकाच जुना आहे. 1980 च्या दशकात जेव्हा मी अविवाहित तरुण होतो तेव्हा मित्रांमधील या वादाच्या केंद्रस्थानी मी असायचो. माझे सहकारी त्यांच्या रोमँटिक भेटींच्या खर्चासाठी माझ्याकडून पैसे उधार घ्यायचे. मी क्वचितच नकार द्यायचो, पण ‘सोल्जर पेमेंट’ची सूचना देण्याची संधीही सोडायचो नाही-म्हणजेच प्रत्येकाने स्वतःच्या खाण्याचा खर्च स्वतः देणे. माझ्या या सूचनेला लगेच विरोध व्हायचा. ‘अशा विचाराने तुझे कधीच लग्न होणार नाही’ असा इशारा ते मला द्यायचे. महिन्याच्या शेवटी आम्ही एका प्रिंटिंग प्रेसच्या तुटलेल्या बाकांवर बसून ‘कटिंग चहा’ प्यायचो. कारण आम्हाला तेव्हा तेवढेच परवडायचे. तेव्हा ते मला प्रेमसंबंधांचे ‘ज्ञान’ द्यायचे. त्यामागचे लॉजिक साधे असायचे. मुख्यतः पुरुषच कमावते असतात आणि भविष्यात घर चालवणारे असतात. डेटचे बिल भरून पुरुष आपली क्षमता सिद्ध करतो की तो आता लग्नासाठी तयार आहे, असा त्यांचा तर्क असे. आता 2026 मध्ये येऊ. परिस्थिती खूप बदलली आहे तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूळ अपेक्षा तिथेच अडकलेल्या आहेत. आज महिला अधिक शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. अनेक महिला (सर्व नाही) पारंपरिक कौटुंबिक दबावातून मुक्त होऊन स्वतःच्या हिमतीवर काम करत आहेत. तरीही पहिल्या डेटचे बिल पुरुषानेच भरावे हा रिवाज कायम आहे. विशेष म्हणजे पुरुषाच्या ‘घर चालवणाऱ्या’ दर्जाची बरोबरी आता महिलांच्या ‘ब्यूटी टॅक्स’शी केली जाऊ लागली आहे. ‘ब्यूटी टॅक्स’ म्हणजे समाजाच्या आधुनिक सौंदर्य मानकांना पूर्ण करण्यासाठी महिला जो खर्च करतात तो वेगाने वाढत आहे. प्रोफेशनल मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरपासून नियमित वॅक्सिंग आणि हेअर स्टायलिंगपर्यंत स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी येणारा हा ‘रनिंग कॉस्ट’ हे एक कारण सांगितले जाते की, पुरुषाने बिल का भरावे? या दृष्टिकोनातून पाहिले तर महिला हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचा आर्थिक वाटा खर्च करून झालेला असतो. अलीकडील सर्वेक्षणांनुसार हा विचार आणि पारंपरिक पुरुषी शिष्टाचार मिळून हे ठरवतात की डेटिंग आजही बऱ्याच अंशी लिंग-आधारित पॅटर्नवरच चालते. यामागचे मानसशास्त्र मनोरंजक आहे. एका सर्वेक्षणानुसार, 30% महिला पुरुषांनी बिल भरण्याला ‘इन्टेंशनल डेटिंग’चा संकेत मानतात. त्यांच्यासाठी हे पैशाचे प्रदर्शन नसून पुरुषाने त्यांची निवड केली आहे आणि तो नात्यात गुंतवणूक करण्यास तयार आहे, असा संदेश असतो. दुसरीकडे, 17% महिलांचा असा तर्क आहे की जर नात्यात गांभीर्य असेल तर बिल वाटून घेणे हा उत्तम मार्ग आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे 67% पुरुष अजूनही असे मानतात की सामाजिक शिष्टाचारानुसार पहिल्या भेटीचा खर्च त्यांनीच केला पाहिजे, मग त्यांचे उत्पन्न समोरच्या महिलेपेक्षा कमी का असेना. यावरून मला माझ्या आयुष्यातील एक वैयक्तिक किस्सा आठवला. एका छोट्या काळात माझे उत्पन्न माझ्या पत्नीपेक्षा 250 रुपयांनी कमी होते. मला घरी जेवण करणे आणि काटकसर आवडायची, ज्याचा माझ्या कमाईशी काही संबंध नव्हता. पण पत्नीला महिन्यातून किमान एकदा बाहेर जाणे आवडायचे. सवयीनुसार त्या रात्री मी साधी खिचडी किंवा दही-भात ऑर्डर करायचो. सुरुवातीला तिला वाटले की माझे हे साधे जेवण म्हणजे बाहेर येण्याला माझा मूक विरोध आहे. मात्र, कालांतराने तिला समजले की ही सहजपणे माझी आवड आहे. तिने अशा जेवणाचे पैसे देण्यात कधीही खंत मानली नाही आणि मलाही कधी न्यूनगंड वाटला नाही. डेटिंगचा मूळ उद्देश हा आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीला हे जाणवून द्यावे की तुम्ही त्यांची ‘निवड’ केली आहे. तुम्ही त्यांच्या वेळेचा आणि उपस्थितीचा आदर करता. मग ते ‘सोल्जर पेमेंट’ असो किंवा पारंपरिक ट्रीट-त्यातून एकमेकांबद्दलची गुंतवणूक आणि आदर दिसला पाहिजे, तो वादाचा मुद्दा ठरू नये.



Source link

सातारा जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष तीव्र; भाजप विरुद्ध शिंदे गट आमनेसामने

0
सातारा जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष तीव्र; भाजप विरुद्ध शिंदे गट आमनेसामने

फलटण :- सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढला असून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत थेट सामना रंगला आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने अध्यक्षपदावर ठाम दावा केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास बहुमत निश्चित असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या गटाचा होणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना–राष्ट्रवादीची एकजूट, ‘प्लॅन बी’ची गरज नाही
राज्याचे पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. “आमचा ए प्लॅन तयार आहे. आम्हाला प्लॅन बीची गरज नाही,” असे ते म्हणाले. भाजपकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी (20) आणि शिवसेना (15) एकत्र आल्यास त्यांची एकूण संख्या 35 होते, जी बहुमतासाठी पुरेशी आहे. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी या दोन्ही पक्षांत हालचाली वेगात सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
‘अध्यक्ष भाजपचाच’ – जयकुमार गोरेंचा ठाम दावा
दुसरीकडे भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, “जागा कमी आल्या म्हणून आम्ही अध्यक्षपद सोडणार नाही. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार.” वरिष्ठ नेतृत्व त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असून आम्हीही आमच्या पद्धतीने काम करत आहोत, असे ते म्हणाले.
साताऱ्यात भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे नैतिकदृष्ट्या अध्यक्षपदाचा हक्क भाजपकडेच असल्याचा दावा गोरेंनी केला आहे.
सातारा जिल्हा परिषद : पक्षीय बलाबल
भाजप – 27
राष्ट्रवादी काँग्रेस – 20
शिवसेना (शिंदे गट) – 15
शिवसेना (ठाकरे गट) – 0
काँग्रेस – 1
इतर – 2
पुढची चाल कोणाची?
महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणावामुळे स्थानिक राजकारण तापले आहे. मैत्री कायम ठेवून सत्ता वाटपाचा तोडगा निघणार की राष्ट्रवादीसोबतची आघाडी निर्णायक ठरणार, यावर आता वरिष्ठ पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
साताऱ्यातील हा सत्तासंग्राम पुढील काही दिवसांत अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपदासाठी आकडेमोड, राजकीय डावपेच आणि वरिष्ठ नेत्यांची हस्तक्षेपाची शक्यता यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरची ही लढत राज्याच्या राजकारणातही महत्त्वाची ठरणार आहे.