Friday, August 14, 2026
Homeफलटणअहिल्यादेवी होळकरांच्या २३१व्या पुण्यतिथीनिमित्त १२० वृक्षांचे वाटप; चार जिल्हा परिषद शाळांमध्ये संविधान...

अहिल्यादेवी होळकरांच्या २३१व्या पुण्यतिथीनिमित्त १२० वृक्षांचे वाटप; चार जिल्हा परिषद शाळांमध्ये संविधान उद्देशिकेची भेट

कापडगाव येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ; कुसूर, डोंबाळवाडी व काळज येथेही उपक्रम

फलटण : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय मानवअधिकार महिला व बाल संरक्षण परिषदेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण व संविधान जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात कापडगाव येथे करण्यात आली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला अभिवादन करण्यासाठी २३१वी पुण्यतिथी आणि २३१ वृक्षांचे प्रतीकात्मक संकल्प करण्यात आला. अभियानाच्या माध्यमातून कापडगाव, कुसूर, डोंबाळवाडी आणि काळज येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येकी ३० याप्रमाणे एकूण १२० वृक्षांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षलागवड केली.

केवळ वृक्षलागवड करून थांबणे पुरेसे नसून लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी वृक्षांची नियमित काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या हातात संविधानाची उद्देशिका

पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधान, लोकशाही, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने चारही जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रती भेट देण्यात आल्या.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्वतः संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून तिचे महत्त्व जाणून घेतले. लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात संविधानिक मूल्यांची रुजवण होत असल्याचे पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

अहिल्यादेवींच्या विचारांना कृतीची जोड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून लोककल्याण, समाजसेवा आणि जनहिताचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्या विचारांना कृतीची जोड देण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आला.

“एक झाड – एक कुटुंब आणि संविधानाची उद्देशिका – प्रत्येकाच्या हातात” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धन आणि संविधानिक मूल्यांची जनजागृती या दोन्हींचा सुंदर संगम या अभियानातून साधण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय मानवअधिकार महिला व बाल संरक्षण परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रेम मोरे, लेखक व सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ, पुणे जिल्हा उपाध्यक्ष नानासो गोवेकर, साहित्यिक मार्गदर्शक तानाजी जगताप, मार्गदर्शक अरविंद सुळ, कापडगावचे माजी उपसरपंच राम केसकर, युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते सागर सुळ, युवा उद्योजक वैभवराज नरुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासो सुळ, गोरख सुळ, युवा उद्योजक यश पिसाळ, पिसाळ साहेब, सतीश गाढवे साहेब यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांचा वारसा पुढे नेत पर्यावरण संरक्षण आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments