
सातारा प्रतिनिधी :कोरेगाव तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जात असून जिल्ह्यातील सर्वात खालच्या पातळीचे राजकारण कोरेगावमध्ये सुरू असल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. तसेच कोरेगावमध्ये राजाभाऊ बर्गे यांना ताकद देत संपूर्ण कार्यकारणीमध्ये बदल करण्यात येणार असून उद्योगमंत्री उदय सामंत आणि आपण स्वतः कोरेगावात विशेष लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यूमध्ये आयोजित कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार राहुल शेवाळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, संपर्कप्रमुख शरद कणसे, रेश्माताई जगताप, राजाभाऊ बर्गे, पैलवान चंद्रहार पाटील, विजय जगदाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच कोरेगाव मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आमदार भाजपच्या वळचणीला गेल्याचा आरोप करत अनेक कार्यकर्त्यांनी आपली व्यथा मांडली. शिवसेनेच्या बीएलओ नियुक्तीनंतर मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकीचे फोन येत असल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच पोलिस यंत्रणा पूर्णपणे आमदारांच्या बाजूने काम करत असून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, वारंवार तारखांना बोलावून दिवसभर पोलिस ठाण्यात बसवणे, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांतील कामे मुद्दाम रखडवणे असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांसमोर मांडल्या.
वादात अडकत नसलेल्या शिवसैनिकांना जाणीवपूर्वक इतर कार्यकर्त्यांमार्फत वाद निर्माण करून केसेसमध्ये अडकवले जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. विजय जगदाळे यांना पक्षपद दिल्यानंतर त्यांच्या पत्नीची शासकीय नोकरीत विविध ठिकाणी बदली करून त्रास दिला जात असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या सर्व तक्रारींबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच महिन्यातून एकदा आढावा बैठक घेतली जाणार असून पहिली बैठक कोरेगावमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“कोणत्याही शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री,” असा इशारा दोन्ही मंत्र्यांनी नाव न घेता आमदार महेश शिंदे यांना दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.








