फलटण | ४ जून २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक पुतळ्याचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आटपाडी ते मंत्रालय लॉंग मार्चचा आज फलटणमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आला. हा लढा केवळ पुतळ्याच्या पुनःस्थापनेचा नाही, तर बाबासाहेबांच्या अस्मितेचा आहे, असा निर्धार करत शेकडो भीमसैनिक बुधवारी सकाळी ९:४५ ते १०:०० वाजेच्या सुमारास फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झाले.
या लॉंग मार्चने काल संध्याकाळी कोळकी बुद्ध विहार, फलटण येथे मुक्काम केला होता. शहरातील अनेक सामाजिक संघटना, नागरिक आणि युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐक्य दर्शवले.
या लॉंग मार्चची सुरुवात ३० मे २०२५ रोजी आटपाडीतील सांगोला चौक येथून झाली. कारण प्रशासनाने समाज बांधवांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, पहाटे ३ वाजता जेसीबीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवून चबुतरा उध्वस्त केल्याने भीम अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक समाज बांधवांनी प्रशासनाशी चर्चा करून पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवण्यास तयार असल्याचे सांगूनही असा अनैतिक प्रकार करण्यात आला. यामुळे संतप्त नागरिकांनी संविधानिक मार्गाने २२ दिवसांचा लॉंग मार्च करून मंत्रालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला.
लॉंग मार्चचा मार्ग:
आटपाडी – म्हसवड – गोंदवले – दहिवडी – फलटण – जेजुरी – पुणे – पिंपरी चिंचवड – तळेगाव दाभाडे – सोमाटणे फाटा – लोणावळा – खोपोली – चेंबूर – मुंबई मंत्रालय
या लढ्याचे नेतृत्व शैलेश ऐवळे आणि सनी कदम करीत असून, आबालवृद्ध भीमसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.