500 च्या नोटा चलनातून काढून टाका! जाहीर सभेत मोदींच्या निकटवर्तीय CM ची मागणी; म्हणाले, ‘देशात…’

0
1
500 च्या नोटा चलनातून काढून टाका! जाहीर सभेत मोदींच्या निकटवर्तीय CM ची मागणी; म्हणाले, ‘देशात…’


Ban Rs 500 Notes: सध्या चलनात असलेल्या उच्च मूल्याच्या नोटा चलनामधून काढून टाकाव्यात अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. राजकीय तसेच दैनंदिन आयुष्यातील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी डिजीटल करन्सीचा विचार गांभीर्याने केला पाहिजे असंही चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच तेलगु देसम पार्टीच्या महानाडू या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

मोदींना सल्ला दिल्याचा उल्लेख

कडपा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना नायडू यांनी 2016 साली नोटबंदीदरम्यान 500 आणि एक हजाराच्या नोटा चलनामधून हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आपण पंतप्रधान मोदींना एक सल्ला दिल्याचंही सांगितलं. देशामध्ये डिजिटल करन्सी सुरु करावी असं आपण त्याचवेळी पंतप्रधान मोदींना सुचवलं होतं असं नायडू म्हणाले. 

अहवाल केलेला सादर

2016 मध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगु देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू हे त्यावेळी निती आयोगाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ, भागिदार आणि मुख्यमंत्र्यांच्या समितीचे प्रमुख होते. चलनी नोटा नसलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा तातडीने पुन्हा रुळावर कसा आणावा यासंदर्भातील सल्ला देण्याचं काम या समितीवर सोपवण्यात आलं होतं. “आम्ही आमचा अहवाल सादर केल्यानंतर मी पंतप्रधान मोदींनी 2 हजाराच्या आणि 500 च्या नाव्या नोटा चलनात आणल्यानंतर उच्च मूल्य असणाऱ्या नोटांवर बंदी घालावी अशी मागणी केली होती. डिजिटल करन्सी चलनात आणावी. त्यामुळे बेकायदेशीर व्यवहार आणि भ्रष्टाचार सहज समोर आणता येईल, असा सल्ला मी दिलेला,” असं नायडू म्हणाले.

भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईत कोणतीही तडजोड नाही

लोकांची खरंच सेवा करायची असेल तर कारभार स्वच्छ हवा, असं सांगतानाच नायडू यांनी उच्च मूल्याच्या नोटांवर बंदी घालणं आवश्यक असल्याचं म्हटलं. असं केलं तरच भ्रष्टाचार संपवता येईल असा युक्तीवाद त्यांनी केला. “आज या मंचावरुन मी पुन्हा त्याच मागणीचा उल्लेख करतो. आता आपल्याकडे डिजिटल चलन आहे तर आपल्याला 500, एक हजार आणि दोन हजारांच्या नोटांची गरज नाही. चलनी नोटांचं वाटप करताना राजकारण होता कामा नये,” असंही नायडू यावेळी म्हणाले. माझ्या या मागणीला पाठिंबा असेल तर टाळ्या वाजून तुमचा पाठिंबा द्या, असं नायडू उपस्थितांना म्हणाला. समर्थकांनी टाळ्यांचा कडकडाट केल्यानंतर त्यांनी, “आपल्या देशातून भ्रष्टाचार संपवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आम्ही यावर नक्कीच काम करु,” असं म्हटलं. तसेच भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईत मी किंवा माझा पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही, असंही नायडू यावेळी म्हणाले.

मोदींची साथ सोडून पुन्हा मोदींबरोबरच

नायडू यांनी एनडीएमधून मार्च 2018 मध्ये एक्झिट घेतली होती. 2024 मध्ये ते पुन्हा एनडीएसोबत आले. आरबीआयने 2023 साली मे महिन्यामध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा हद्दपार केल्या जात असल्याचं जाहीर केलं होतं.





Source link