डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व समाजविषयक अमूल्य विचार

0
10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व समाजविषयक अमूल्य विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व समाजविषयक अमूल्य विचार

फलतण : मंगळवार पेठ, फलटण येथे मूकनायक तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिक्षण व समाजविषयक विचारांचे संकलन करण्यात आले. या माध्यमातून समाजाला प्रेरणा देणारे अनेक मौल्यवान संदेश समोर आले.
डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाला अत्यंत पवित्र आणि परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. “शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे” असे सांगत त्यांनी केवळ पदवी नव्हे तर चारित्र्य, सौजन्य आणि नैतिकता यांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत नागरिक बनतो, आणि समाजाच्या उन्नतीसाठी ते अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रज्ञा, शील, करुणा, विद्या आणि मैत्री या पंचतत्त्वांवर आपले व्यक्तिमत्व घडवण्याचा संदेश दिला. तसेच मुला-मुलींना शिक्षण देणे, अंधश्रद्धा आणि परंपरागत बंधनांपासून मुक्त करणे हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजासाठी दिलेल्या संदेशांमध्ये त्यांनी स्वाभिमानाला भाकरीपेक्षा अधिक महत्त्व देण्याचे आवाहन केले. जातीभेद, वर्गभेद आणि विभागीयतेपासून दूर राहून एकी राखण्यावर त्यांनी भर दिला. “हक्क मागून मिळत नाहीत, त्यासाठी संघर्ष करावा लागतो” या विचारातून त्यांनी समाजाला जागृत राहण्याचा संदेश दिला.
यावेळी स्वच्छता, नैतिकता आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर चालण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्या समाजाचे ऋण फेडणे, एकजूट राखणे आणि पुढील पिढीला शिक्षित करणे हीच खरी त्यांना आदरांजली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
✍️ संकलन: बापू ढावरे (मूकनायक, मंगळवार पेठ, फलटण)