फलटण :- अनेक वर्षांच्या प्रतीक्षा आणि संघर्षानंतर साखरवाडी (तालुका फलटण, जिल्हा सातारा) येथील बौद्ध समाजाने स्वतः पुढाकार घेत भगवान गौतम बुद्ध यांचे मूर्तिस्थान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन केला. “आता सुट्टी नाही!” अशा निर्धारासह ही ऐतिहासिक कृती केली गेली होती. मात्र, या पवित्र कार्यानंतर साखरवाडीत तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तीस्थापनेनंतर बौद्ध समाजातील काही व्यक्तींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, काहींवर मारहाण झाल्याचेही समजते. यामुळे साखरवाडी परिसरात अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण आहे. स्थानिक बौद्ध अनुयायांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत हा उपक्रम राबवला, मात्र तरीही प्रशासनाकडून अतिरेकी पद्धतीने कारवाई करण्यात आली.
या घटनेनंतर बौद्ध समाजाने तीव्र निषेध नोंदवत, मूर्तीस्थापनेला मान्यता द्यावी, अटकेतील व्यक्तींना तत्काळ मुक्त करावे आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.