
महेश रामदासी3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
लोकसभेतील अपयश झटकून महायुती विधानसभेच्या तयारीला लागलीय, तर महाविकास आघाडीनेही पुन्हा मोठे यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात यंदा प्रथमच सहा प्रमुख पक्ष आमने-सामने लढणार असले, तरी युती किंवा आघाडीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री कोण असेल, याचे उत्तर कुणाकडेच नाही. निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याचे धाडस सध्या तरी एकही पक्ष दाखवू शकत नाही.
सप्टेंबरच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर साधारण महिनाभराने मतदान होईल. म्हणजे राजकीय पक्षांकडे आता तयारीसाठी अडीच-तीन महिने उरले आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे आधीच राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आरक्षणाचा प्रश्नही तापला आहे. अशा वातावरणात युती आणि आघाडीने विधानसभेच्या तयारीचा बिगुल फुंकला आहे. महायुतीत भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांसह छोटे घटकपक्ष आणि काही अपक्षांचा समावेश आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह छोट्या घटक पक्षांचा समावेश आहे. या दोन्हीकडे जागावाटपावरुन बरीच घुसळण होईल. त्याचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेत २८८ जागा आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे १६० ते १७० जागांवर भाजप दावा करण्याच्या तयारीत आहे. त्या आधीच शिंदेसेनेच्या नेत्यांनीही, किमान १०० जागा मिळायला हव्यात, अशी जाहीर मागणी केली आहे. जितक्या जागा शिंदेसेनेला, तितक्याच आम्हालाही हव्यात, या मागणीवर अजित पवार गट ठाम आहे. तथापि, प्रत्येकाची जेवढी मागणी आहे तेवढी पूर्ण होणार नाही. शेवटी तुटेपर्यंत न ताणण्याची भाजपची भूमिका असल्यामुळे आधी त्यांनाच तडजोड करुन आपल्या १६० जागांच्या दाव्यावरुन माघार घ्यावी लागेल. त्यानंतर शिंदेसेना आणि अजित पवार गटही अॅडजेस्टमेंट करतील. मात्र, उद्या महायुतीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण, या प्रश्नावर अजून तीनही पक्षांचे एकमत झालेले नाही.
खरे तर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुढे करुनच भाजप-शिवसेना युतीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. पण, यावेळी मात्र युतीत दोन नव्हे, तर तीन मोठे पक्ष आहेत आणि या सर्वांनाच मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे कोणत्या पक्षात कोण इच्छुक आहेत, हे जाणून घेऊ…
देवेंद्र फडणवीस
1. भाजप : भाजपकडून साहजिकच मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचे नाव अग्रस्थानी आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजात त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका भाजपला लोकसभेत बसला. त्यामुळे विधानसभेपूर्वी फडणवीसांचे नाव जाहीर करण्याचा धोका भाजप पत्करणार नाही. त्यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय या पक्षाकडे नाही. त्यामुळे कुणाचेही नाव जाहीर न करता सामूहिक नेतृत्वावर भाजप ही निवडणूक लढवेल.
एकनाथ शिंदे
2. शिवसेना (शिंदे गट) : उद्धव ठाकरेंशी बंड करण्याचे धाडस दाखवल्याची बक्षिसी म्हणून फक्त ४० आमदार असूनही एकनाथ शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केले. आता शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणूक लढवण्याचे भाजपकडून सांगितले जात असले, तरी पुढचे मुख्यमंत्री तेच असतील, हे भाजपला मान्य नाही. शिवाय, युतीत शिंदेसेनेच्या वाट्याला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा येणार असल्याने भाजपपेक्षा त्यांचा मुख्यमंत्रिपदावर दावा असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपला डावलून शिंदेसेना एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करु शकत नाही.
अजित पवार
3. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : चार- पाच वेळा उपमुख्यमंत्रिपदावर अडकून बसलेल्या अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मात्र, युतीच्या जागावाटपात अजित पवार गटाचा तिसरा क्रमांक लागतो. त्यातही लोकसभेचा ट्रेंड पाहता त्यांचे आमदार किती निवडून येतील, हे सांगता येत नाही. अशा स्थितीत ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, हा निकष लावल्यास अजित पवारांचा पक्षही मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव आधीच जाहीर करण्याचे धाडस करु शकत नाही. अर्थात भाजप त्यांना तशी परवानगीही देणार नाही.
एकूणच महायुतीतील तीनही पक्षांनी मोठा भाऊ होण्याची तयारी सुरू केली असली, तरी त्यापैकी एकाही पक्षाकडे मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या पक्षाचा चेहरा जाहीर करण्याचे धाडस नाही. महाविकास आघाडीतही तीच गत आहे.
लोकसभेतील अनपेक्षित यशामुळे आता काँग्रेस सर्वाधिक जागांवर दावा करत आहे. तर, उद्धवसेनाही सर्वांत जास्त जागा आपल्यालाच मिळायला हव्यात, यासाठी हट्ट धरुन आहे. लोकसभेला फक्त १० जागांवर समाधान मानणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाने तर विधानसभेला तडजोड करणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे आघाडीतही जागावाटपावरुन बरीच ताणाताणी होणार, यात शंका नाही. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे संजय राऊत वारंवार सांगत असले, तरी हे ना शरद पवारांच्या पक्षाला मंजूर आहे ना काँग्रेसला. आघाडीतील तिन्ही पक्षात कोण दावेदार आहेत, ते पाहू…
उद्धव ठाकरे
1. शिवसेना (ठाकरे गट) : उद्या जास्त आमदार निवडून आल्याने हा पक्ष मोठा ठरला, तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदासाठी एकमेव नाव राहील. त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा अनुभवही आहे. आजही त्यांना जनतेतून सहानुभूती मिळतेय. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करुन निवडणूक लढवावी, असे राऊतांचे मत आहे. पण, काँग्रेस, राष्ट्रवादीला ते मान्य नाही.
नाना पटोले
2. काँग्रेस : लोकसभेत मुसंडी मारुन काँग्रेसने क्रमांक एकचा मान मिळवला. त्यामुळे विधानसभेतही आपल्या सर्वाधिक जागा येतील, अशी या पक्षाला अपेक्षा आहे. पण, काँग्रेसमध्ये सर्वाधिक माजी मुख्यमंत्री आहेत. उद्या या पक्षाला संधी मिळालीच, तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह अगदी महिला म्हणून विचार केला तर यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड अशी अनेक नावे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने आधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला, तर पक्षाचे जास्त आमदार निवडून आणण्यापेक्षा एकमेकांचे उमेदवार पाडण्यावरच पक्षातील गटांचा भर राहील. कारण काँग्रेसला तशी ‘परंपरा’ आहे. त्यामुळे सत्तेची संधी दिसली, तरी आधीच नेतृत्वाचे नाव जाहीर करण्याचा धोका काँग्रेसचे हायकमांड पत्करणार नाहीत.
सुप्रिया सुळे
3. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) : या पक्षात अजूनही शरद पवार सांगतील तीच पूर्वदिशा आहे. आघाडीच्या जागावाटपात आधी किती जागा मिळतात, हे पवारांसाठी महत्त्वाचे आहे. जागावाटपात तिसरे स्थान मिळाले, तरी लोकसभेसारखा ट्रेंड कायम राहिल्यास कमी जागा लढवून हा पक्ष आघाडीत सर्वाधिक आमदार निवडून आणू शकतो. त्या स्थितीत पक्षाकडून सुप्रिया सुळेंचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले जाऊ शकते. जयंत पाटीलही स्पर्धेत आहेत. पण, निवडणुकीआधी एकाचे नाव जाहीर करुन दुसऱ्या नेत्याला आणि त्यांच्या गटाला नाराज करण्याचा धोका पवार पत्करणार नाहीत.
या सर्व सहा पक्षांकडे मुख्यमंत्रिपदासाठी दिग्गज नेते असले, तरी या निवडणुकीत कुणा एकाचे नाव पुढे करुन जनतेसमोर जाण्याचे धाडस ना महायुतीकडे आहे ना महाविकास आघाडीकडे. अर्थात मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार मतदारांना नसतो. तथापि, निवडणुकीआधी पक्षांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला तर मात्र कुणाला मते द्यायची, हे जनता ठरवू शकते. पण, ही संधीही राजकारणी मंडळी मतदारांना देणार नाहीत. गोड बोलून मतदारांकडून मते घेतली जातील आणि नंतर मुख्यमंत्री ठरवताना मात्र पक्षश्रेष्ठी किंवा हायकमांड जनतेचा कौल अजिबात विचारात न घेता ‘आपल्या सोयी’चाच नेता निवडतील, यात शंका नाही. गेली ६५ वर्षे महाराष्ट्र हेच तर अनुभवत आलाय!
(संपर्कः mahesh.ramdasi@dbcorp.in)