
मौजे राजाळे येथे भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
फलटण : मौजे राजाळे येथे भीम गीतांचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून परिसरात प्रबोधनाचा उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला.
यावेळी माजी सनदी अधिकारी श्री. विश्वासराव भोसले यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी महामानवांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाज परिवर्तनासाठी त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. तसेच राजाळे येथील जयंती महोत्सव समितीतील महिला पदाधिकाऱ्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास माजी सनदी अधिकारी श्री. विश्वासराव भोसले, राजाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. शरद निंबाळकर, माजी सरपंच सौ. सविता अर्जुन शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य श्री. दिलीप भालेराव, श्री. अर्जुन शेंडगे सर, तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) चे सोमीनाथ घोरपडे सर, फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे सर, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड सर, संघटक आनंद जगताप सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव महिला समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ प्रबोधनात्मक बौद्ध धम्म गीतांच्या माध्यमातून ज्वलंत व जिवंत ठेवणाऱ्या “जलसा परिवर्तनाचा” या उपक्रमांतर्गत सम्राट समाज प्रबोधन गायन पार्टी यांनी प्रभावी सादरीकरण केले. या गायन पार्टीचे प्रबोधनकार वैभव गायकवाड व अनिकेत जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांद्वारे गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, तसेच माता रमाई यांच्या विचारांचा जागर घडवला. त्यांच्या सादरीकरणातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देत समाजप्रबोधनाची प्रभावी चळवळ उभी करण्यात आली.
या कार्यक्रमामुळे भीम जयंती केवळ उत्सव न राहता विचारांची आणि प्रबोधनाची जाणीव जागवणारा उपक्रम ठरली.








