पालखी सोहळ्यामुळे वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा – पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आवाहन

0
7
पालखी सोहळ्यामुळे वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा – पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आवाहन

फलटण   : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २६ ते ३० जून दरम्यान सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. यामध्ये लाखो भाविक सहभागी होणार असून, वाहतूक कोंडी व अनुचित प्रकार टाळण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण वाहतूक बदलांची अधिसूचना जारी केली आहे.

पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून पाडेगाव-लोणंद (ता. खंडाळा) मार्गे सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून, पुढे लोणंद, तरडगाव, फलटण, बरड येथे मुक्काम करून ३० जून रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान करेल.

या पार्श्वभूमीवर २५ ते ३० जून दरम्यान निरा-लोणंद-फलटण-पंढरपूर मुख्य रस्ता इतर सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. केवळ पालखीतील वाहनं आणि अत्यावश्यक सेवा (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक) यांना वगळण्यात आलं आहे.

🚧 वाहतूक मार्गात बदल पुढीलप्रमाणे:

  • २५ ते २९ जून: फलटणहून पुणे, निरा, लोणंदकडे जाणारी वाहतूक बारामती वा वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) मार्गे शिरगाव घाटातून वळवली जाईल.
  • २५ ते २८ जून: आदर्की फाटा ते लोणंद रस्ता सामान्य वाहनांसाठी बंद.
  • २५ ते ३० जून: लोणंद ते फलटण मार्ग पूर्णपणे बंद.
  • २८ ते ३० जून: फलटण ते नातेपुते मार्ग बंद.
  • २८ जून: नातेपुतेहून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस-अकलूज-बारामतीमार्गे वळवण्यात येणार.
  • २८ जूनपासून: नातेपुतेहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर-तिकाटणे-दहीवडी मार्गे वळवण्यात येणार.
  • नातेपुते–पुणे वाहतूक दहीगाव-जांब-बारामतीमार्गे वळवण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी वाहनधारक, स्थानिक नागरिक व प्रवाशांना अधिसूचनेतील नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

.