“मी हार मानणारा नाही! तुमचं नवं नेतृत्व उपयोगाचं नाही” – रामराजे नाईक निंबाळकरांचा थेट इशारा

0
3
“मी हार मानणारा नाही! तुमचं नवं नेतृत्व उपयोगाचं नाही” – रामराजे नाईक निंबाळकरांचा थेट इशारा

कुरवली (फलटण) | “मी हार मानणारा माणूस नाही. मी आता पुन्हा एकदा तालुक्यात फिरणार आहे. जनतेला विचारणार आहे की, आमचं काय चुकलं? चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण नव्या नेतृत्वाचा फायदा या तालुक्याला होणार नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट विरोधकांना इशारा दिला.

ते फलटण तालुक्यातील कुरवली येथील बाणगंगा धरण पाणीपूजन कार्यक्रमात बोलत होते. आपल्याच रोखठोक शैलीत त्यांनी स्पष्ट केलं की, “मी कुठलंही राजकारण न करता लोकांशी संवाद साधणार आहे. आमचं ढीग चुकलं असेल, पण ज्यांचं नेतृत्व आज तयार होतंय, त्यांच्यामुळे तुमचं आणि पुढच्या पिढ्यांचं नुकसान होणार आहे, हे तुम्हीही जाणताय.”

💬 “सगळं मिळालं फुकटात, किंमतच राहिली नाही!

रामराजे म्हणाले, “आमच्यातील काही लोक निघून गेले. सगळं सहज मिळालं की, त्याची किंमत राहत नाही हे उशिरा समजतं. पण आम्ही कुणाकडे राजकीय किंमत मागितली नाही. आमच्यावर पिढ्यानपिढ्या संस्कार आहेत की संधी मिळाली की काम करायचं.”

“माझ्या तोंडात ‘मसाकार’ हा शब्द कमीच असतो. माझे आजोबा जनतेला ‘जनता’ म्हणून पाहायचे. मतांचा अधिकार दिला गेला. मी राजा आहे की नाही, हा मुद्दा वादाचा असू शकतो. पण मी सर्व काही बघतो. विरोधक म्हणतात आम्ही केलं नाही, पण त्यांचं 90 टक्के काम आमच्या पायावर उभं आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.

तालुक्याची घडी कोसळू देणार नाही!

“फेब्रुवारी-मार्चमध्ये काही अडचणी आल्या. त्यामुळे मी थोडा मागे बसलो. पण आता मी स्वतः मैदानात उतरणार आहे. माझ्या वयाचे कार्यकर्ते थकले आहेत, म्हणूनच मला पुढे यावं लागणार आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

“आम्ही शून्यातून राजकारण उभं केलं. आज जी व्यवस्था दिसते, ती कोणीतरी दुसऱ्याने उभी केली, असं मानणं मूर्खपणाचं आहे. तालुक्याची बसवलेली घडी कोसळू देणार नाही,” अशा शब्दांत रामराजेंनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.