साहस टाइम्स :-पाकिस्तानकडून भारतातील चार राज्यांतील १५ महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भारतीय सैन्याच्या दक्षतेमुळे हा कट उधळून लावण्यात आला. जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. ७ ते ८ मेच्या रात्री अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. भारतीय एअर डिफेन्स सिस्टम आणि इंटिग्रेटेड काउंटर-यूएएस ग्रिडमुळे हे हल्ले निष्क्रिय करण्यात आले.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या प्रयत्नांचे अवशेष विविध ठिकाणी आढळून आले असून, हे पुरावे पाकिस्तानी हस्तक्षेप स्पष्ट करतात. या पार्श्वभूमीवर भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरसह अनेक ठिकाणी जोरदार प्रत्युत्तर दिले. लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली पूर्णतः निष्प्रभ करण्यात आली असून, पाकिस्तानची अनेक रडार सिस्टिम्स उद्ध्वस्त करण्यात आल्याचे समजते.
या कारवाईदरम्यान भारताने हॅरोप ड्रोनचा वापर करून अत्यंत अचूकतेने पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य केले. ही कारवाई भारत सरकारने अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर केली आहे. भारताने पाकिस्तानला त्याच तीव्रतेने आणि पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरही जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये अंधाधुंध गोळीबार आणि तोफांचा मारा केला होता. या हल्ल्यांत १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ३ महिला आणि ५ मुलांचा समावेश आहे. याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, सीमारेषेवर सजगता अधिक वाढवण्यात आली आहे.
या दरम्यान, काल रात्री पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी घुसखोर सीमा ओलांडत असताना बीएसएफच्या जवानांनी गोळीबार करून त्याचा खात्मा केला. तो अंधाराचा फायदा घेऊन भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होता.
भारत सरकार आणि लष्कराच्या या तीव्र आणि निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला असून, देशभरातून लष्कराच्या शौर्याचे कौतुक होत आहे.