कालकथित दयानंद अण्णा मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण उपक्रम

0
127
कालकथित दयानंद अण्णा मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण उपक्रम


फलटण : भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते तालुका शाखेचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष व समाजनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले आयु. रामचंद्र जगन्नाथ मोरे यांचे चुलते कालकथित दयानंद अण्णा मोरे, रा. समतानगर, विडणी यांचे दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आकस्मिक निधन झाले. दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत भावपूर्ण वातावरणात अस्थी संकलन व पुण्यनोमोदन कार्यक्रम पार पडला. कुटुंबीय, नातेवाईक, बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत कालकथित दयानंद अण्णा मोरे यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.

निसर्ग व पर्यावरण रक्षणाचा विचार अंगीकरून प्रदूषण टाळण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांचा पर्यावरण रक्षणाचा विचार अंगीकारून कालकथित दयानंद अण्णा मोरे यांच्या अस्थीचे विसर्जन पाण्यामध्ये न करता त्या अस्थी एका खड्ड्यांमध्ये अर्पण करून त्यावरती आम्रवृक्षाचे रोप कुटुंबीयांच्या वतीने लावून पर्यावरण रक्षणाचा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे.

तालुका शाखेचे संस्कार सचिव आ. अमोल भोसले यांनी आपल्या मनोगतातून अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. ते म्हणाले “तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या बौद्ध धम्मातील तत्त्वांचा विचार अंगीकारल्याशिवाय आपले जीवन परिपूर्ण, शांत आणि कल्याणकारी होऊ शकत नाही.”भोसले यांनी पुढे स्पष्ट केले की धम्म हा फक्त वाचनाचा किंवा ऐकण्याचा विषय नसून तो प्रत्यक्ष जीवनात आचरला पाहिजे.
प्रत्येकाने स्वतःमध्ये खालील मूल्ये विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत प्रज्ञा, करुणा, मैत्रीभाव, अहिंसा, समता त्यांनी आवाहन करताना ठामपणे सांगितले “धम्म आपल्या वर्तनात, बोलण्यात आणि विचारांत दिसला पाहिजे. बुद्धांच्या तत्त्वांवर चाललो तरच समाजात परिवर्तन घडेल आणि खरा कल्याणमार्ग उजळेल.”प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून कुटुंबात, समाजात आणि कार्यक्षेत्रात धम्म आचरणाचा दीप प्रज्वलित करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.शेवटी त्यांनी सर्व उपस्थितांना बुद्ध, धम्म आणि संघाच्या मार्गावर दृढ राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात ज्येष्ठ प्रवचनकार आ. सोमीनाथ घोरपडे यांनी अत्यंत मार्मिक व तत्त्वज्ञानिक प्रवचन दिले.आपल्या प्रभावी शैलीत बोलताना त्यांनी चार आर्य सत्य व बौद्ध धम्मातील पंचस्कंध यावर विस्तृत भाष्य केले.त्यांनी स्पष्ट केले की, दुःख आहे, दुःखसमुदय (दुःखाची कारणे आहेत), दुःखनिरोध (दुःख संपवणे शक्य आहे), दुःखनिरोध गामिनी प्रतिपदा (दुःखमुक्तीचा मार्ग आहे) हीच चार आर्य सत्ये मानवजातीच्या कल्याणाचा आधार आहेत.
पंचस्कंधांविषयी त्यांनी सांगितले की रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांचा आसक्तीमुक्त विवेकपूर्वक विचार केल्यावरच खरे समाधान आणि समरस जीवन शक्य होते.प्रवचनादरम्यान त्यांनी किसा गौतमी यांची जीवन कहाणी सांगत अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण दिले.आपल्या दुःखात हरवलेल्या मातेला बुद्धांनी अनित्यतेचा संदेश देत
“मृत्यू अपरिहार्य आहे. स्वीकार आणि समजुतीतूनच शांती प्राप्त होते”हा जीवनमूल्यांचा संदेश दिला, यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. घोरपडे सरांनी शेवटी आवाहन केले “दुःखापासून पळून न जाता धम्माला आचरणात आणले तरच दुःखमुक्ती शक्य आहे. धम्म हा श्रद्धा नव्हे तर अनुभव, आचरण आणि जाणीव आहे.”उपस्थित सर्वांनी अत्यंत मनोभावे आणि ध्यानपूर्वक प्रवचन ऐकले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सचिव आयु बाबासाहेब जगताप यांनी उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला.मोरे कुटुंबीयांच्या कृतिशील कार्याचे कौतुक करत त्यांनी सांगितले “समाजासाठी दिलेल्या योगदानाच्या दृष्टीने मोरे कुटुंब आदर्श ठरत आहे. अशा कुटुंबांकडून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने समाजहितासाठी सतत योगदान देण्याचा संकल्प करावा.”जगताप सरांनी पुढे समाजातील चुकीच्या धारणा आणि अंधानुकरणावर भाष्य करत सांगितले “समाज अंधश्रद्धांच्या गर्तेतून बाहेर आला पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला बौद्ध धम्मच विवेक, प्रज्ञा आणि सत्याचा मार्ग दाखवतो. विचार, वर्तन आणि दैनंदिन आचरण हे धम्मावर आधारित झाले पाहिजे. तेव्हाच खरा बदल घडेल.”यावेळी त्यांनी सर्व उपस्थितांना दृढ आवाहन केले की विवेकशीलपणा अंगीकारा, समतावादी आचरण जोपासा, विज्ञाननिष्ठ आणि धम्मनिष्ठ जीवन पद्धती स्वीकारा“बुद्धांच्या तत्त्वांवर चालणे ही केवळ परंपरा नाही. ती प्रगती, शांतता आणि मानवतावादाकडे जाणारी वाट आहे,” असा ठाम संदेश देत त्यांनी उपस्थितांना धम्माचरणाची प्रेरणा दिली.

कार्यक्रमात अस्थि संकलन व पुण्यनुमोदन विधी अत्यंत शिस्तबद्ध व धम्मपरंपरेनुसार पार पडले.
या विधीचे संचलन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे अध्यक्ष आ. महावीर भालेराव यांनी केले.
विधी दरम्यान त्यांनी उपस्थितांना धम्मपदेश देत सांगितले की “जीवन हा अनित्यतेचा प्रवाह आहे. जन्म-जरा-व्याधी-मरण या सत्यांना समजून घेतल्यावरच प्रज्ञा आणि समत्व प्राप्त होते. विरहातही धम्म स्मरण आणि कृतज्ञता हीच खऱ्या पुण्यनुमोदनेची भावना आहे.”भालेराव सरांनी पुढे स्पष्ट केले की दुःखाचे कारण अज्ञान व आसक्तीत आहे, जागरूकता, प्रज्ञा आणि करुणा हेच धम्माचे मूळ, जीवनाचं मूल्य धम्माचरणातूनच अधिक उजळतं. ते म्हणाले “मृत्यू हा शेवट नसून, अनित्यतेच्या सत्याला स्वीकारत धम्ममार्गावर दृढ राहण्याची आठवण आहे. कालकथितांच्या स्मृतींना सर्वोत्तम आदरांजली म्हणजे सद्गुणांचा स्वीकार होय. अंत:करण भरून टाकणाऱ्या या धम्मपदेशाने उपस्थितांना शांततेचा, दुःखमुक्तीचा आणि धम्मनिष्ठ आचरणाचा संदेश दिला.
कालकथित दयानंद अण्णा मोरें च्या समाजकार्य, माणुसकीची भूमिका आणि पर्यावरणप्रेमाचा सन्मान ठेवत आज समता नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.समाजातील पुढील पिढ्यांना हरित वारसा मिळावा आणि पर्यावरण संवर्धनाचे भान दृढ व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी कालकथित दयानंद अण्णा मोरें च्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या लोकसंग्रह वृत्ती, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेमाला कृतज्ञ अभिवादन केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव आयु.चंद्रकांत मोहिते, संघटक आयु.विजयकुमार जगताप, तालुका शाखेच्या संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयु.बजरंग गायकवाड, तालुका शाखेचे प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु.रामचंद्र जगन्नाथ मोरे,
कुटुंबातील सदस्य दर्शना रोनीत वाघमारे(मुलगी), आयु.नरेंद्र दयानंद मोरे(मुलगा), मयुरी नरेंद्र मोरे (सुनबाई), दीपेश दयानंद मोरे(मुलगा), चिराग दयानंद मोरे(मुलगा), सविता दयानंद मोरे (पत्नी), समता नगर येथील बौद्ध उपासक उपासिका, ग्रामस्थ, मोरे कुटुंबातील सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.