
महायुतीचा धर्म पाळत प्रत्येक मत सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
सातारा :- सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून, पक्षाचे एकही मत वाया जाऊ नये यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांनुसार शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीच्या कामात सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील ‘कोयना दौलत’ येथे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासमवेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली.
महायुतीतील समन्वय अधिक मजबूत करत सातारा-सांगली मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी सर्व घटक पक्ष एकजुटीने कार्यरत असल्याचे देसाई यांनी सांगितले. महायुतीचा धर्म पाळत प्रत्येक मताचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात असून आवश्यक रणनीती आखण्यात येत आहे.
राज्यातील सर्व विधान परिषद जागांवर महायुतीला यश मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे उपस्थित होते.










