Thursday, June 25, 2026
Home Blog Page 8

फलटण तालुक्यात दुष्काळाची चाहूल; ५१ गावे टंचाईग्रस्त, ५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

0
फलटण तालुक्यात दुष्काळाची चाहूल; ५१ गावे टंचाईग्रस्त, ५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

फलटण तालुक्यात दुष्काळाची चाहूल; ५१ गावे टंचाईग्रस्त, ५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

फलटण | प्रतिनिधी :-फलटण तालुक्यात यंदा उन्हाळी पाऊस पूर्णपणे दडी मारल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून महसूल प्रशासनाने तालुक्यातील तब्बल ५१ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. यापैकी ५ गावे आणि २७ वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.
विशेष म्हणजे, टंचाईग्रस्त घोषित झालेल्या गावांमध्ये बागायती पट्ट्यातील अनेक गावांचाही समावेश आहे. त्यामुळे पावसाने आणखी ओढ दिल्यास आगामी काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महसूल प्रशासनाने टप्प्याटप्प्याने टंचाई जाहीर केली असून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी ३३ गावे, ३० मार्च रोजी १० गावे आणि ५ जून रोजी आणखी ९ गावांचा टंचाईग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण ५१ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन ६ जूनपासून दुधेबावी, वाघोशी, सासवड, मानेवाडी आणि मिरढे या गावांसह त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या २७ वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी, म्हणजेच सुमारे ९२ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूगर्भातील पाणीपातळी सातत्याने खालावत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार आणखी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी स्पष्ट केले.

एकाच अपघातात तिन्ही सख्या भावंडांचा दुर्दैवी अंत; बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

0
एकाच अपघातात तिन्ही सख्या भावंडांचा दुर्दैवी अंत; बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

 एकाच अपघातात तिन्ही सख्या भावंडांचा दुर्दैवी अंत; बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर                                                           साखरवाडी | प्रतिनिधी :  गुळुंचे गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर सोमेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हळहळला आहे. दि. ६ जून रोजी आयशर टेम्पो आणि इलेक्ट्रिक स्कुटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली होती. या अपघातात मुरुम (ता. फलटण, जि. सातारा) येथील दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला होता.
अपघातानंतर गंभीर अवस्थेतील पवन बोडरे याला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. मंगळवार, दि. ९ जून रोजी रात्री सुमारे १.३० वाजता उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
यापूर्वी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सेजल आणि अक्षरा बोडरे या दोन्ही बहिणींवर रविवारी मुरुम येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर पवनच्या निधनाची बातमी समोर येताच गावावर पुन्हा एकदा शोककळा पसरली.
पवन हा अभ्यासात अत्यंत हुशार आणि सर्वांचा लाडका मुलगा म्हणून ओळखला जात होता. मात्र, नियतीच्या एका क्रूर घावाने तिन्ही भावंडांची स्वप्ने कायमची अधुरी राहिली. या हृदयद्रावक घटनेमुळे बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
एकाच कुटुंबातील तिन्ही सख्या भावंडांचा झालेला मृत्यू ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. :::

राजगृहाच्या निष्ठावंत सैनिकाला डॉ. भीमराव आंबेडकर यांची कृतज्ञ आदरांजली

0
राजगृहाच्या निष्ठावंत सैनिकाला डॉ. भीमराव आंबेडकर यांची कृतज्ञ आदरांजली

राजगृहाच्या निष्ठावंत सैनिकाला डॉ. भीमराव आंबेडकर यांची कृतज्ञ आदरांजली

मुंबई, दि. १० जून २०२६ : आंबेडकरी चळवळ आणि धम्म चळवळीशी अखंड निष्ठा राखणारे समता सैनिक दलाचे मेजर जनरल तथा ज्येष्ठ कार्यकर्ते कालकथित बाबु विष्णू सावंत (गुरुजी) यांना भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आद. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी त्यांच्या गोवंडी येथील लुंबिनीबाग निवासस्थानी जाऊन भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कालकथित बाबु विष्णू सावंत यांचे रविवार, दि. ७ जून रोजी निधन झाले. त्यावेळी डॉ. भीमराव आंबेडकर हे लखनौ येथे पूर्वनियोजित धम्म व सामाजिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र, देशभरातील व्यस्त दौरे आणि सार्वजनिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही त्यांनी आपल्या चळवळीतील या निष्ठावंत सैनिकाला आदरांजली वाहण्याचे कर्तव्य विसरले नाही. लखनौहून परतल्यानंतर दि. ९ जून रोजी पहाटे ३ वाजता मुंबईत दाखल झाल्यानंतरही त्यांनी कोणतीही विश्रांती न घेता दिवसभर न्यायालयीन कामकाज पूर्ण केले आणि दुसऱ्याच दिवशी स्वर्गीय सावंत यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी उपस्थित राहिले.
यावेळी त्यांनी कालकथित बाबु विष्णू सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून आर्थिक मदतही केली. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व असूनही त्यांनी कोणताही मोठेपणा किंवा पदाचा आविर्भाव न बाळगता एका सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग नोंदविला. झोपडपट्टीतील अरुंद गल्लीपर्यंत पोहोचून त्यांनी दिलेला हा आपुलकीचा स्पर्श उपस्थितांच्या मनाला भावून गेला.

कालकथित बाबु विष्णू सावंत यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आंबेडकरी चळवळ, धम्म चळवळ आणि आंबेडकर परिवाराची निस्वार्थ सेवा केली. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करताना डॉ. भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता ही केवळ एका कार्यकर्त्याला वाहिलेली आदरांजली नसून चळवळीतील प्रत्येक निष्ठावंत सैनिकाच्या कार्याचा गौरव असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.

डॉ. भीमराव आंबेडकर हे नेहमीच धम्म चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आले आहेत. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी आत्मीयता, विश्वास आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी अनेकांनी नमूद केले.

कालकथित बाबु विष्णू सावंत यांना वाहिलेली ही आदरांजली म्हणजे निष्ठा, समर्पण आणि चळवळीप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव करणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या कार्याला जागतिक गौरव; गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५

0
महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या कार्याला जागतिक गौरव; गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५

महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या कार्याला जागतिक गौरव; गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५


फलटण | प्रतिनिधी.   ग्रामीण भागातील महिलांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गोविंद फाउंडेशनला प्रतिष्ठेचा नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात आला आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे हा आंतरराष्ट्रीय सन्मान संस्थेला बहाल करण्यात आला.
भारतामधील नेदरलँड्सच्या राजदूत मा. एच. ई. मारिसा जेरार्ड्स (Marisa Gerards) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या गौरवपूर्ण सोहळ्यात गोविंद फाउंडेशनच्या संचालिका सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, अजयसिंहराजे नाईक निंबाळकर, धर्मेंद्र भल्ला तसेच डॉ. शांताराम गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर संस्थेच्या प्रतिनिधींनी भावना व्यक्त करताना सांगितले की, हा सन्मान केवळ गोविंद फाउंडेशनचा नसून संस्थेशी जोडलेल्या सर्व सहकारी, कार्यकर्ते, लाभार्थी महिला, स्वयंसेवक आणि हितचिंतकांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांना आणि उपक्रमांना मिळालेली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील पोचपावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोविंद फाउंडेशनने दुग्ध व्यवसाय क्षेत्रात महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक संधी आणि स्वावलंबनाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या उपक्रमांमुळे अनेक महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.
संस्थेच्या वतीने या यशासाठी सर्वांचे प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या पुरस्कारामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने, व्यापक स्वरूपात आणि समर्पित भावनेने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही सांगण्यात आले.
ग्रामीण विकास, महिला सबलीकरण आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने कार्य करणाऱ्या संस्थांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार असून, गोविंद फाउंडेशनच्या कार्याचा जागतिक स्तरावर झालेला हा सन्मान फलटणसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे

मंदिर इनाम जमीन कायद्याला स्थगिती; पुढील रणनीतीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाची उद्या फलटणमध्ये बैठक

0
मंदिर इनाम जमीन कायद्याला स्थगिती; पुढील रणनीतीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाची उद्या फलटणमध्ये बैठक

मंदिर इनाम जमीन कायद्याला स्थगिती; पुढील रणनीतीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाची उद्या फलटणमध्ये बैठक

फलटण | प्रतिनिधी :- राज्यातील मंदिर इनाम जमिनींच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून महाराष्ट्र मंदिर इनाम जमीन कायद्याला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मंदिर विश्वस्त, पुजारी, सेवेकरी आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा, संघटनात्मक भूमिका आणि मंदिरांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ, फलटण तालुका विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्वामी विवेकानंदनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात होणार आहे. राज्य शासनाने कायद्याला दिलेल्या स्थगितीनंतर निर्माण झालेली परिस्थिती, मंदिरांच्या जमिनींचे संरक्षण, मंदिर व्यवस्थापनासमोरील विविध अडचणी, शासनाकडे करावयाच्या पुढील मागण्या तसेच संघटनात्मक बळकटीकरण यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
मंदिरांच्या हक्कांचे संरक्षण, धार्मिक संस्थांचे अस्तित्व आणि भविष्यातील नियोजन यासाठी या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिर इनाम जमिनींच्या विषयावर पुढील आंदोलनाची दिशा, कायदेशीर बाबी आणि शासनाशी संवाद यावरही विचारविनिमय होणार असल्याची माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने फलटण तालुक्यातील सर्व मंदिर विश्वस्त, पुजारी, व्यवस्थापक, सेवेकरी आणि मंदिराशी संबंधित घटकांना या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे भूमिका निश्चित करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे.

चिखली-कुदळवाडीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची धडक कारवाई; दगडफेकीत १९ जण जखमी

0
चिखली-कुदळवाडीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची धडक कारवाई; दगडफेकीत १९ जण जखमी

पिंपरी | प्रतिनिधी. पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात मंगळवारी (दि. ९) पहाटे मोठी कारवाई केली. कडक पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मशीद, मंदिरासह एकूण ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, कारवाईदरम्यान स्थानिकांनी विरोध करत दगडफेक केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेत १८ पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकासह एकूण १९ जण जखमी झाले.
महापालिकेच्या ‘क’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सुमारे २८ हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा कारवाईत सहभागी होता. सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी चार अग्निशमन वाहने आणि दोन रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
अनधिकृत बांधकामांबाबत शून्य सहनशीलता : आयुक्त
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला. कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिकांचा विरोध, दगडफेक
पालिकेकडून वारंवार याच परिसरात कारवाई केली जात असल्याचा आरोप करत काही स्थानिकांनी कारवाईला विरोध दर्शविला. यावेळी झालेल्या गोंधळात दगडफेक झाली. जखमी झालेल्या पोलीस कर्मचारी व नागरिकांवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अनधिकृत धार्मिक स्थळांवरही कारवाई सुरू राहणार
महापौर रनी लांडगे यांनी सांगितले की, कारवाईदरम्यान काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. शहरातील इतर अनधिकृत धार्मिक स्थळे आणि बांधकामांवरही नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उल्लेखनीय म्हणजे, २०२५ मध्ये याच परिसरातील चार हजारांहून अधिक अनधिकृत गोदामांवर महापालिकेने कारवाई केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी चार अनधिकृत प्रार्थनास्थळांवरही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे सातत्याने याच भागाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे

प्रेमसंबंधासाठी अभियंता पतीचा काटा; पत्नी, प्रियकर आणि साथीदाराचा थरारक कट उघडसाडी खरेदीतून झालेली ओळख ठरली जीवघेणी; कराड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उकलला खुनाचा गुन्हा

0
प्रेमसंबंधासाठी अभियंता पतीचा काटा; पत्नी, प्रियकर आणि साथीदाराचा थरारक कट उघडसाडी खरेदीतून झालेली ओळख ठरली जीवघेणी; कराड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उकलला खुनाचा गुन्हा

कराड | प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने रचलेला थरारक खुनाचा कट कराड शहरात उघडकीस आला आहे. अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या हत्येप्रकरणी पत्नी सारिका मंडले, तिचा कथित प्रियकर प्रथमेश थोरात, त्याचा मित्र आकाश होनसूरे आणि सारिकाचा भाऊ संग्राम चव्हाण यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये सारिका मंडले यांची कार्वे नाका परिसरातील साडी विक्रेता प्रथमेश थोरात याच्याशी ओळख झाली. साड्यांच्या खरेदीदरम्यान झालेली ही ओळख पुढे मोबाईल संपर्क, व्हॉट्सअॅप चॅटिंग आणि नंतर प्रेमसंबंधांपर्यंत पोहोचली. वयाचे अंतर दुर्लक्षित करून दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.
दरम्यान, लक्ष्मण मंडले हे ठाण्यात अभियंता म्हणून कार्यरत होते. ते सुट्टीच्या दिवशी कराडला येत असत. मात्र पती-पत्नीमधील मतभेद वाढत असल्याने सारिका पतीपासून दुरावत गेली. प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याचे तिने प्रियकराला सांगितले आणि त्याला संपविण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
महिनाभरापासून सुरू होते नियोजन
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खुनाचा कट सुमारे महिनाभरापूर्वीच आखण्यात आला होता. प्रथमेश थोरात याने आपला मित्र आकाश होनसूरे याला या कटात सहभागी करून घेतले. खून करण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आल्याचेही समोर आले आहे. अपघाताचा बनाव रचून कारने चिरडून हत्या करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी स्वतंत्र अल्टो कार खरेदी करण्यात आली होती.
लाईव्ह लोकेशनवरून ठेवली हालचालींवर नजर
५ जून रोजी लक्ष्मण मंडले ठाण्याहून कराडकडे रवाना झाले. ही माहिती त्यांनी स्वतः पत्नीला दिली होती. त्यानंतर सारिकाने ती माहिती प्रियकराला पुरवली. पती कुठे पोहोचले याची माहिती मिळवण्यासाठी ती सतत संपर्कात होती. पोलिसांच्या मते, हा संपर्क काळजीपोटी नसून त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी होता.
पहाटे सुमारे ५.२० वाजता लक्ष्मण मंडले कोल्हापूर नाका परिसरात उतरून घराकडे पायी जात असताना दबा धरून बसलेल्या आरोपींनी कारने त्यांना जोरदार धडक दिली. ते वाचण्याची शक्यता राहू नये म्हणून कार पुन्हा रिव्हर्स घेऊन त्यांच्या अंगावरून घालण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून उघड झाला कट
सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा बदलली. संशयाची सुई पत्नी सारिकाकडे वळल्यानंतर पोलिसांनी चौकशीचा फास आवळला आणि संपूर्ण कट उघडकीस आला.
भावाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
या प्रकरणात सारिकाचा भाऊ संग्राम चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. बहिणीचे कथित प्रेमसंबंध असताना भाऊ या कटात कसा सहभागी झाला, याबाबत पोलिस तपास सुरू आहे. कौटुंबिक वाद किंवा इतर काही कारणे सांगून त्याला या कटात सामील करण्यात आले का, याचा शोध घेतला जात आहे.
पोलिस निरीक्षकांचे वक्तव्य
कराड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सांगितले की, हा साधा अपघात नसून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेला खून आहे. आरोपींनी महिनाभरापासून कट रचला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या सहा तासांत मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हेगार कितीही चलाखीने कट रचला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
विश्वासघाताची शोकांतिका
प्रेमसंबंधासाठी रचलेल्या या कटात एका अभियंता पतीचा जीव गेला, तर पत्नी, प्रियकर आणि त्यांचे साथीदार तुरुंगात पोहोचले. एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेने समाजमन हादरले असून विश्वासघाताच्या या कथेला कराडमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त नंदकुमार मोरे यांची राज्यातील परिस्थितीवर टीका ;कायदा-सुव्यवस्था, अंधश्रद्धा आणि लोकशाही मूल्यांबाबत व्यक्त केली चिंता

0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त नंदकुमार मोरे यांची राज्यातील परिस्थितीवर टीका ;कायदा-सुव्यवस्था, अंधश्रद्धा आणि लोकशाही मूल्यांबाबत व्यक्त केली चिंता

फलटण | प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून पक्ष स्थापना दिन साजरा करत आहेत. यानिमित्त फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार मोरे यांनी राज्यातील सध्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, शिक्षणाची आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारांची भूमी असताना आज राज्याची ओळख भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेशी जोडली जात असल्याची खंत वाटते. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला धक्का पोहोचवणाऱ्या प्रवृत्तींना राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा उल्लेख केला. अशा घटनांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही सत्ताधारी नेत्यांच्या वक्तव्यांमुळे लोकशाही मूल्यांचे अवमूल्यन होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी या घटनेतील सर्व पैलूंची निष्पक्ष चौकशी होण्याची गरज व्यक्त केली. तसेच राज्यातील महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी आणि अन्य गंभीर घटनांमध्ये अद्याप न्याय मिळालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा उल्लेख करताना त्यांनी ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे स्मरण केले. अंधश्रद्धाविरोधी कायदा करणाऱ्या महाराष्ट्रातच अंधश्रद्धाविरोधी लढा देणाऱ्यांना न्याय मिळण्यात विलंब होणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी संत कबीर यांच्या विचारांचा दाखला देत समाजाने केवळ बाह्य दिखावा न करता मन शुद्ध करण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजातील ढोंगीपणा, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शेवटी महाराष्ट्राची पुरोगामी ओळख टिकवण्यासाठी संविधानिक मूल्ये, सामाजिक सलोखा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, राज्याला कलंकित करणाऱ्या प्रवृत्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज असल्याचे नंदकुमार मोरे यांनी म्हटले.
– आपलं सुंदर फलटण… हरित फलटण… मी फलटणकर

सांगली-दिल्ली सायकलवारीचे फलटणमध्ये उत्साहात स्वागत; काँग्रेसकडून सायकलवीरांचा गौरव

0
सांगली-दिल्ली सायकलवारीचे फलटणमध्ये उत्साहात स्वागत; काँग्रेसकडून सायकलवीरांचा गौरव

फलटण | प्रतिनिधी   सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांगली ते दिल्ली सायकलवारीचे फलटण शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. देशात सामाजिक ऐक्य, संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि जनजागृतीचा संदेश घेऊन निघालेल्या या सायकलवारीतील सायकलवीरांचे फलटण शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक पंकज पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी पंकज पवार यांनी सायकलवारीत सहभागी झालेल्या सायकलवीरांचे अभिनंदन करत त्यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक केले. शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलद्वारे करत समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सायकलवीरांना पुढील दिल्लीपर्यंतच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत त्यांचा हा जनजागृतीचा प्रवास यशस्वी होवो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. स्वागत कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सायकलवारीच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, लोकशाही मूल्ये आणि संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहात साजरा

0
बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहात साजरा

बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहात साजरा

दुधेबावी (प्रतिनिधी) : बहुजन समाज पक्षाचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष तथा सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आयु. विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांना वंदन करून तसेच दीप, धूप व पुष्प अर्पण करून करण्यात आली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयुष्यमान महावीर भालेराव यांच्या हस्ते बुद्धपूजा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा भिमस्मरण, भीमस्तुती ने झाली.कार्यक्रमात विविध मान्यवरांनी किरतावडे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्याधर किरतावडे हे अत्यंत मनमिळावू, मोकळ्या मनाचे आणि सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत असून समाजातील लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी ते झटत असतात. कोणत्याही पदाचा गर्व न बाळगता ते सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे वावरतात. त्यांची विनम्रता आणि संवेदनशीलता ही त्यांची विशेष ओळख आहे.”

भारतीय बौद्ध महासभेचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “किरतावडे हे बौद्ध धम्माच्या आचार-विचारांनुसार निर्मळ जीवन जगत आहेत. कोणताही कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने पार पडावा यासाठी त्यांचा विशेष आग्रह असतो. झालेल्या चुकांबाबत ते प्रांजळपणे मत व्यक्त करून त्या दुरुस्त करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करतात. त्यांच्या दिलदार आणि मोकळ्या स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत.”

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आमचे बंधू विद्याधर किरतावडे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असून बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांवर त्यांची अपार श्रद्धा आहे. महापुरुषांच्या विचारांनुसार ते आपले जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत आणि त्यांना उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो, ही तथागत चरणी प्रार्थना आहे.”

बौद्धाचार्य आयुष्यमान महावीर भालेराव यांनी किरतावडे यांच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “बुद्धबल, धम्मबल आणि संघबलाच्या आधारे किरतावडे सरांच्या मनातील सर्व सदिच्छा पूर्ण होवोत आणि त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक व्हावे.”
कार्यक्रमाची सांगता सरणतय घेऊन करण्यात आली. यावेळी ॲड. चंद्रशेखर मोरे परिवार, जगताप परिवार, किरतावडे परिवार तसेच भारतीय बौद्ध महासभा परिवार (BBM Family) मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी आयु. विद्याधर किरतावडे यांना वाढदिवसानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.