
फलटण | प्रतिनिधी : सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांगली ते दिल्ली सायकलवारीचे फलटण शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. देशात सामाजिक ऐक्य, संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि जनजागृतीचा संदेश घेऊन निघालेल्या या सायकलवारीतील सायकलवीरांचे फलटण शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक पंकज पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी पंकज पवार यांनी सायकलवारीत सहभागी झालेल्या सायकलवीरांचे अभिनंदन करत त्यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक केले. शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलद्वारे करत समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सायकलवीरांना पुढील दिल्लीपर्यंतच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत त्यांचा हा जनजागृतीचा प्रवास यशस्वी होवो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. स्वागत कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सायकलवारीच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, लोकशाही मूल्ये आणि संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.









