
“सहकार लुटला, कारखाना-बँक अडचणीत आणली, शिक्षकांचे पैसे थकवले; जवाहर कारखाना जाण्यासही तेच जबाबदार” असा गंभीर आरोप
फलटण : फलटणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य करत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राजे बंधूंवर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी, “फलटणचा खरा नाईक-निंबाळकर मीच आहे. माझ्या नादी लागलात तर रडायचं का रडायचं हेही कळणार नाही,” असा इशारा दिला.
यावेळी त्यांनी राजे बंधूंवर थेट आरोप करत, “फलटणचे खरे ‘मल्ल्या’ तिन्ही राजे बंधूच आहेत. त्यांनी सहकार लुटला आहे. कारखाना, बँक अडचणीत आणली. शाळेतील शिक्षकांचे आणि अकॅडमीचे पैसेही खाल्ले. जवाहर कारखाना बंद पडण्यास आणि जाण्यासही हेच जबाबदार आहेत,” असा गंभीर आरोप केला.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या या वक्तव्यामुळे फलटणच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, या आरोपांवर राजे बंधू किंवा संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










