समतानगर (विडणी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी!

0
8
समतानगर (विडणी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी!

समतानगर (विडणी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी!

फलटण (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता नगर (विडणी) येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

यावेळी शाखेचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे सर यांनी बाबासाहेबांच्या बहुआयामी कार्यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांनी देशाला काय दिले हे समजून घेणे आणि त्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे.”

घोरपडे यांनी पुढे बाबासाहेबांच्या औद्योगिक आणि आर्थिक धोरणांवर प्रकाश टाकताना सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील औद्योगिकीकरणाचा पुरस्कार करत त्यांनी Reserve Bank of India, Life Insurance Corporation of India यांसारख्या संस्थांच्या उभारणीची दिशा दिली. तसेच खाणी, विमा व पायाभूत उद्योगांच्या राष्ट्रीयीकरणाची संकल्पना मांडून देशाच्या आर्थिक विकासाला बळ दिले.

जल व ऊर्जा क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतून Central Water Commission यांसारख्या संस्थांची पायाभरणी झाली. दामोदर व हिराकूड यांसारख्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, १९४८ साली केंद्रीय विद्युत प्राधिकरण स्थापनेच्या माध्यमातून देशाच्या ‘राष्ट्रीय विद्युत ग्रिड’चा पाया रचला गेला.

शेतकरी आणि कामगार वर्गासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या लढ्याचाही त्यांनी उल्लेख केला. १९३८ मध्ये खोतीप्रथेविरोधात २० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढून अन्यायकारक प्रथा संपवण्याचा मार्ग मोकळा केला. पुढे जमीनदारी नष्ट करून “कसेल त्याची जमीन” ही संकल्पना रुजली. कुळ कायदा, कृषी उत्पन्न बाजार समित्या, तसेच Fertilizer Corporation of India सारख्या संस्थांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला.
कामगार हक्कांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्यावर बोलताना घोरपडे म्हणाले की, १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड येथे २०,००० रेल्वे कामगारांची परिषद भरवून त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना आवाज दिला. कामगार मंत्री म्हणून त्यांनी ८ तासांचा कामाचा दिवस, महागाई भत्ता, पगारी सुट्टी, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई आणि कामगार संघटनांना मान्यता असे ऐतिहासिक निर्णय घेतले.
यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या प्रसंगाचा उल्लेख करत Annihilation of Caste या क्रांतिकारी ग्रंथाच्या निर्मितीची पार्श्वभूमी उलगडून सांगितली.
यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आयु. रवींद्र मठपती सर म्हणाले की, समतानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देत त्यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी समाजातील तत्कालीन जातिव्यवस्था, भेदाभेद आणि मनुवादी मानसिकतेचा परामर्श घेत डॉ. आंबेडकरांनी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. तसेच त्यांच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासाचा उल्लेख करत शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी तसेच देशाच्या जडणघडणीमध्ये डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या मोलाच्या योगदानावरही भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचा धावता आढावा घेतला आणि भीम जयंती साजरी करताना समाजाने घ्यावयाची जबाबदारी अधोरेखित केली. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, शिक्षणातूनच समाजाची प्रगती शक्य आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर यांनी सर्व उपस्थितांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशाच्या जडणघडणीमध्ये असलेले महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मोठ्या प्रयत्नांनी समाजाला या टप्प्यावर आणले आहे. त्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला एकसंध राखण्यामध्ये अलौकिक कार्य केले आहे. त्यामुळे त्याच मार्गावर चालताना आपण सर्वांनी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेचा स्वीकार करून परिवर्तनवादी चळवळ पुढे नेणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी ‘सोनियाची उगवली सकाळ’ व ‘वाट महामानवांची’ ही गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी महासचिव आयु. बाबासाहेब जगताप यांनी महिलांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्यावर मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडण्यामागील भूमिका, त्यावरील विरोध आणि महिलांना समान हक्क व न्याय मिळावा यासाठी त्यांनी दिलेला केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा यावर प्रकाश टाकला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय संविधान निर्मितीत घेतलेले कष्ट आणि समतामूलक संविधानाची भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी समतावादी व विज्ञाननिष्ठ बौद्ध धम्म स्वीकारून अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींपासून दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी ‘आले रे गेले किती’ हे भीमगीत सादर केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मठपती सर, शिक्षिका मोनाली वारे मॅडम तसेच अंगणवाडी सेविका काळोखे मॅडम विद्यार्थ्यांसह उपस्थित होत्या. तसेच न्यू पंचशील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, उपासक-उपासिका तसेच बालक-बालिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आयुनी अश्विनी मोरे यांनी ‘काळीज होतं रमाचं’ व ‘लेक सुभेदारचा’ ही गीते सादर केली. शाळेच्या विद्यार्थिनींनी ‘भीमाची लेक मी’ व ‘भीम सूर्य क्रांतीचा’ या गीतांवर उत्कृष्ट गायन केले. तसेच मोनाली वारे मॅडम यांनी ‘हीच आमुची प्रार्थना’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी भीमकन्या कु. समिधा घोरपडे हिने डॉ. आंबेडकरांना समर्पित कविता सादर केली. निलाक्षी जगताप व तनिष्का जगताप या भगिनींनी प्रेरणादायी विचार व काव्य सादर करून उपस्थितांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक मोरे, आरोही व ईश्वरी लोंढे यांनी भीमगीते सादर केली.

मोनाली वारे मॅडम म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी आणि देशासाठी मोठे योगदान दिले आहे; परंतु विशेषतः महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. “आज आम्ही ज्या स्थानावर उभ्या आहोत, ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे आम्ही सर्व महिला त्यांच्या ऋणी आहोत,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश देण्यात आला. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगोबा माळ (समतानगर) शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. अंगणवाडीच्या सेविका मदतनीस व विद्यार्थीही या जयंती महोत्सवात सहभागी झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांनी केले. यावेळी शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित सर्व उपासक-उपासिका, बालक-बालिका व ग्रामस्थांना जिलेबी व फरसाणाचे वाटप करण्यात आले. यावेळी समता नगर येथील उपासक उपासिका यांनी दर महिन्याच्या 14 तारखेला महामानवांच्या विचारांचे मंथन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.