
पाचगणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विचार महोत्सव उत्साहात संपन्न
पाचगणी : भारतीय बौद्ध महासभा, पाचगणी शाखा व समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विचार महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. २१ मे १९३८ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाचगणी येथे भेट देऊन ऐतिहासिक मार्गदर्शन केले होते. त्याच पवित्र स्थळी उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शहरातील विविध सामाजिक, राजकीय व बौद्ध संघटनांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. विशेष म्हणजे पाचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच नगरसेवक, महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमात समता सैनिक दलाचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी असिस्टंट स्टाफ ऑफिसर व राज्य संघटक (पुणे विभाग) तसेच सातारा जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
सैनिक शिक्षक मेजर संपत भोसले, मेजर पी. एस. सातपुते तसेच समता फोर्सच्या कंपनी कमांडर अर्चना चव्हाण मॅडम यांनी समता सैनिक दलाच्या कार्यपद्धती, शिस्त, संघटन आणि सामाजिक बांधिलकी याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले.
भारतीय बौद्ध महासभा पाचगणी शाखेचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महासचिव व समता सैनिक दलाचे कंपनी कमांडर महेंद्र सोनवणे, कोषाध्यक्ष सचिन कांबळे, संस्कार सचिव उत्तम कांबळे, सचिव खरात साहेब, छाया परिहार, आशा सोनवणे तसेच अनेक महिला व पुरुष सैनिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
दिवसभर विविध प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. धम्म दिप कला मंच गायन पार्टी सातारा यांनी
भीमगीते गायली, व्याख्याने आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे उपक्रम पार पडले. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जतन व प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमामुळे पाचगणी परिसरात आंबेडकरी विचारांचा जागर निर्माण झाला असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.









