राज्यातील वाचाळवीरांना अजित पवार यांचा इशारा – “महाराष्ट्राला अस्थिरता परवडणारी नाही!”

0
2
राज्यातील वाचाळवीरांना अजित पवार यांचा इशारा – “महाराष्ट्राला अस्थिरता परवडणारी नाही!”

सातारा | सुसंस्कृत महाराष्ट्राच्या भूमीवर द्वेषपूर्ण वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. “अशी वक्तव्ये केवळ एका बाजूने नव्हे, तर दोन्हीकडून होत आहेत आणि ती महाराष्ट्राला परवडणारी नाहीत,” असे स्पष्ट करत त्यांनी वाचाळ राजकीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराडच्या प्रीती संगमावर त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. “राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

“यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेनेच महाराष्ट्राचे भलं”

अजित पवार पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही समाजात जातीय भेदभाव केला नाही. यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतरच्या नेतृत्वानेही जातीय सलोखा टिकवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी हाच विचार महत्त्वाचा आहे.”

ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत मी राजकारणात आहे, तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे विचार सोडणार नाही.” तसेच, दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी संयम बाळगावा आणि महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.