फलटण : आज फलटण तालुक्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला. महाराजा मंगल कार्यालयात झालेल्या या आयोजनात, नागरिकांच्या अनेक प्रलंबित तक्रारी आणि समस्यांचा जागेवर निपटारा करण्यात आला.
जनता दरबारात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, महानंदाचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, आणि स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या दरबारात क्रीडा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कृषी विभाग, वन विभाग, आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांसह इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही केली.
यावेळी युवा नेते सचिन सस्ते यांनी माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांनी सुरू केलेली गिरवी ते मुंबई एसटी सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. आमदार सचिन पाटील यांनी नागरिकांना अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले.
या जनता दरबारामुळे नागरिकांच्या समस्या तातडीने सुटल्या आणि शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास वाढला.