
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आल्याची पाहायला मिळाले. या सुनामीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेले. महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत झाली असून त्यांना ५० चा आकडाही गाठता आलेला नाही. राज्यात कोणाचीही लाट नसताना तसेच महायुती सरकारने कोणतीही भरीव कामगिरी केलेली नसताना महायुतीने एतके प्रचंड यश मिळवल्याने विरोधकांकडून ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शरद पवार यांनी ईव्हीएमबाबतच्या आरोपावर माहितीशिवाय भाष्य करण्यास नकार दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत.