
माळशिरस | प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची पिकअप गाडी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर ६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील भाविक श्री सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण पिकअप वाहनातून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत जाऊन कोसळली.
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्यास अडचणी निर्माण झाल्या. अपघाताची माहिती मिळताच तांदूळवाडी परिसरातील ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
घटनास्थळी विहिरीतून वाहन आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे रांजणी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रशासनाकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू असून मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.







