फलटण :संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे यंदा दि. २८ जून २०२५ रोजी फलटणमध्ये आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आळंदीतून प्रस्थान झालेल्या या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटण नगरपालिकेने युद्धपातळीवर तयारी केली असून, वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक विभागाकडून नियोजनबद्ध कामे सुरू आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी निखील मोरे यांनी दिली.
रस्ते, पाणी, स्वच्छता… सर्व सेवा सज्ज!
फलटण शहरातील रस्त्यांची डागडुजी, पावसामुळे खराब झालेल्या पुलांची दुरुस्ती, पालखी मार्ग स्वच्छता, आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन हे सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. पालखी मार्गावरील दगड-माती उचलण्याचे काम वेगाने सुरू असून, स्वच्छतेसाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे.
वारकऱ्यांसाठी विशेष पाणी सुविधा
प्रत्येक प्रमुख चौकात पाणपोई तर पालिकेच्या जलपुरवठा केंद्रावर एकाच वेळी ८ टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एक १० हजार लिटरचा टँकर अवघ्या ७–८ मिनिटांत भरून निघतो, असे मोरे यांनी स्पष्ट केले.
पालखी तळ सज्ज, मंडप आणि सेवा केंद्र उभारणी
पालखी तळावर पावसाचा त्रास होऊ नये यासाठी डांबरीकरण व मुरुमाची भर करण्यात आली असून, लाईटसाठी ८ सॅटेलाईट पॉइंट, जनरेटर, शौचालय व स्नानगृह यांसह संपूर्ण सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. दर्शन बारीची रचना पूर्ण झाली असून, यावर्षी प्रथमच यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये “जर्मन मंडप” माध्यमातून वारकरी सेवा केंद्र उभे राहिले आहे.
आरोग्य सेवा केंद्र आणि सुरक्षा व्यवस्था
या केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या वतीने १५० डॉक्टर, २० फिजिओथेरपिस्ट, तात्पुरते हॉस्पिटल, हिरकणी कक्ष अशा सुविधा उपलब्ध आहेत. गर्दी नियंत्रणासाठी नगरपालिकेची फिरती पथके आणि पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सुखद अनुभव मिळावा यासाठी फलटण नगर परिषद कटीबद्ध आहे, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.