साताऱ्यात खळबळजनक घटना : भांडणानंतर पत्नीचा खून, मृतदेह कपड्याच्या गाठोड्यात लपवून ठेवला!

0
1
साताऱ्यात खळबळजनक घटना : भांडणानंतर पत्नीचा खून, मृतदेह कपड्याच्या गाठोड्यात लपवून ठेवला!

सातारा :शहराच्या मंगळवार पेठ भागात एका पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचा मृतदेह घरातील कॉटखाली कपड्याच्या गाठोड्यात लपवून ठेवण्यात आला होता. ही घटना शुक्रवारी (ता. २०) उघडकीस आली असून या प्रकरणामुळे संपूर्ण सातारा परिसरात खळबळ माजली आहे.

मयत महिलेचे नाव अंजली राजेंद्र शिंदे (वय २९, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे आहे. याप्रकरणी तिचा भाऊ श्रेयस अनिलकुमार पाटील (वय २०, रा. मेहर देशमुख कॉलनी, करंजे) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी सकाळी अंजली यांच्या मुली शाळेत गेल्यावर त्यांचा मामा श्रेयस त्यांना परत आणण्यासाठी घरी आला. त्यावेळी एका मुलीला कॉटखाली गाठोड्यात काहीतरी असल्याचा संशय आला. ती माहिती मामाला देण्यात आली. त्यानंतर कॉटखाली पाहिल्यावर गाठोड्यात अंजली यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब लक्षात येताच श्रेयस व संशयित आरोपी राजेंद्र भानुदास शिंदे (वय ३२, रा. मंगळवार पेठ, मूळ गाव पानमळेवाडी, पोस्ट वर्ये, ता. सातारा) यांच्यात धक्काबुक्की झाली. यामध्ये आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र शिंदे हा सेंट्रींग मजूर असून त्याला दारूचे व्यसन होते. तो पत्नी अंजली हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत असतो. यापूर्वीही अंजली यांनी पतीविरोधात सातारा तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. १९ जूनच्या रात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा तीव्र वाद झाला होता आणि याची माहिती अंजली यांनी आपल्या माहेरच्या लोकांना दिली होती.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिर्के करत आहेत. मृतदेहाचे नेमके कारण समजण्यासाठी विसेरा राखून ठेवण्यात आला आहे.