फलटण प्रतिनिधी | साहस Times :- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीसाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. “वारकऱ्यांच्या सेवेसाठी निधी कमी पडू देणार नाही,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
ग्रामविकास मंत्री गोरे यांनी बरड, फलटण, तरडगाव, लोणंद आणि निरा दत्त घाट या पालखी मार्गावरील महत्त्वाच्या मुक्कामी ठिकाणांची पाहणी केली. त्यांच्यासोबत आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाच्या पार्श्वभूमीवर १० हजार क्षमतेचे वारकरी सेवा केंद्र उभारण्याच्या सूचना देताना मंत्री गोरे म्हणाले, “पालखी मार्गावर मोबाइल स्वच्छतागृहांची व्यवस्था जिल्हा परिषदेने करावी. पालखी पुढे सरकल्यावर मागील गावे तत्काळ स्वच्छ करावीत.”
ते पुढे म्हणाले, विद्युत वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, हायमास्क दिवे बसवावेत आणि बेकायदा कनेक्शन रोखण्यासाठी विशेष पथक कार्यरत करावे.
आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके तैनात करावीत, गॅस व केरोसीनचा पुरवठा सुनिश्चित करावा, तर अन्न व औषध प्रशासनाने अन्न व पाण्याची नियमित तपासणी करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
रस्त्यांची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी आणि अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असा खास निर्देश त्यांनी दिला.
पालखी सोहळ्यातील गर्दी लक्षात घेता, पोलीस यंत्रणेला सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, निरीक्षण मनोरे आणि पर्याप्त मनुष्यबळ सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पार्किंग व्यवस्था सुस्थितीत असावी याकडेही त्यांनी कटाक्षाने लक्ष वेधले.