अवकाळी पावसाचा तडाखा: मदतीसाठी सरकार कटिबद्ध – ना. मकरंद पाटील

0
1
अवकाळी पावसाचा तडाखा: मदतीसाठी सरकार कटिबद्ध – ना. मकरंद पाटील

फलटण | साहस Times प्रतिनिधी :-  संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले असून अनेक ठिकाणी रस्ते, शेती, घरे आणि पालखी मार्गांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील यांनी फलटण तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली.

यावेळी ते म्हणाले, “ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे, अशा सर्व ठिकाणी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्राप्त होताच शासन स्तरावर तातडीची मदत पुरवली जाणार आहे.”

फलटण येथील पाहणी दरम्यान आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, फलटणचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी विशेषतः पालखी मार्गाच्या दुरवस्थेचा उल्लेख केला. ते म्हणाले, “फलटण शहरासह तालुक्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, नगरपरिषद, प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यासह मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन मार्ग दुरुस्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. पालखी सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी शासन सज्ज आहे.”