फलटण (प्रतिनिधी) :गुढीपाडव्याच्या ऐतिहासिक शुभमुहूर्तावर सन १९१७ साली श्रीमंत मालोजीराजे फलटण संस्थांच्या गादीवर अधिपती म्हणून विराजमान झाले आणि त्यांनी घेतलेला स्त्रियांना समान संधी देण्याचा निर्णय हा भारतीय संस्थानांच्या इतिहासातील पहिला ठरला. अशा क्रांतिकारी विचारांचे व्रत घेऊन समाजहितासाठी झटणाऱ्या मालोजीराजेंच्या कार्याचा उल्लेख करत, “स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्यात मालोजीराजेंचा विचार स्पष्टपणे दिसतो,” असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
स्वर्गीय तात्यासाहेब कोरे (सावकार) यांना प्रथम मरणोत्तर श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार डॉ. विनय कोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेचे शिरीष देशपांडे, माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे, युवराज श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत विश्वजीतराजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रामराजे पुढे म्हणाले, “तात्यासाहेब कोरे यांचे विचार व कार्य समाजोन्मुख होते. त्यांनी सत्तेपासून दूर राहून सहकाराच्या माध्यमातून वारणा खोऱ्यात सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्रांती घडवली. त्यांचे कार्य पुढील पिढीने जाणावे म्हणून त्यांच्यावर आधारित माहितीची पुस्तके आमच्या संस्थेला द्यावीत, अशी विनंती मी विनय कोरे यांना करतो.”
विनायक कोरे यांनी सांगितले, “फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे केवळ राजकारणात नव्हे तर समाजकारणात अग्रस्थानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुटुंब व जाधव घराण्याशी त्यांचे पिढ्यानपिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. रामराजे यांनी माझ्या मतदारसंघातील जलप्रश्न सोडवण्यासाठी भरीव भूमिका घेतली. कृष्णा खोरे महामंडळाची फलटणसाठी घोषणा देखील त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शक्य झाली.”
या वेळी स्मृती पुरस्काराची ५१ हजार रुपयांची देणगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सुपूर्त करत, ती सामाजिक कार्यासाठी वापरण्याचे आवाहन विनय कोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना श्रीमंत संजीवराजे यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रा. प्रभाकर पवार यांनी मानले.