
महिला दिनी ‘विशेष भेट’! ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेत निवड; आंबेडकरी चळवळीतील प्रभावी आवाज संसदेत
सोलापूर – आंबेडकरी चळवळीत आक्रमक भूमिका, प्रभावी वक्तृत्व आणि शैक्षणिक क्षेत्रातील भक्कम पार्श्वभूमी यामुळे ओळख असलेल्या ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेसाठी निवड झाल्याने राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला राज्यसभेवर पाठविले, ही “महिला दिनाची विशेष भेट” असल्याची भावना ज्योतीताई वाघमारे यांनी व्यक्त केली.
ज्योतीताई वाघमारे यांचा जन्म सोलापूर येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबावर सामाजिक चळवळींचा ठसा असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर आंबेडकरी विचारांचा प्रभाव पडला. त्यांच्या वडिलांनी दलित पँथर चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केले होते. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरणातच ज्योतीताईंचे बालपण घडले.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी इंग्रजी विषयात पीएचडी पूर्ण केली असून मराठी भाषेवरही त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे. महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांनी काही काळ वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले असून त्यांच्या स्पष्ट आणि प्रभावी मांडणीमुळे त्या व्यापक स्तरावर परिचित झाल्या.
राजकीय क्षेत्रातही ज्योतीताईंनी सक्रिय भूमिका बजावली आहे. २०१४ साली त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या आक्रमक, अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद वक्तृत्वामुळे त्या राज्यभर ओळखल्या जाऊ लागल्या. सामाजिक न्याय, महिलांचे प्रश्न आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे.
आंबेडकरी विचारांची पार्श्वभूमी, सामाजिक प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण भूमिका आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभेतील निवड महत्त्वाची मानली जात आहे. आता त्या राष्ट्रीय पातळीवरही आंबेडकरी विचार, सामाजिक न्याय आणि महिलांच्या प्रश्नांवर आपली ठाम भूमिका मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




