Sunday, June 28, 2026
Home Blog Page 44

बौध्द धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी संघटित प्रयत्नांची गरज : डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

0
बौध्द धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी संघटित प्रयत्नांची गरज : डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

बौध्द धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी संघटित प्रयत्नांची गरज : डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर


सातारा, दि.२४ : १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मक्रांती झाली. दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. तदनंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देत, “यापुढे उर्वरित आयुष्य धम्म परिवर्तनासाठी समर्पित करणार आहे,” असा दाखला त्यांनी दिला.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दल प्रमुख डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नगरपंचायत मैदान, पाटण येथे पाटण तालुका महिला व पुरुष कार्यकारिणीच्यावतीने भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आनंदा गुजर होते.
डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणाले, “बाबासाहेबांनी दिलेली धम्मक्रांती देशात उत्साहवर्धक अनुयायी पुढे घेऊन चालले आहेत. अनेक लोक धम्मात येत आहेत. वारंवार शिबिरे झाली पाहिजेत. प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच धम्म चळवळ वाढणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये ७५ जिल्ह्यांत चार राज्य निर्माण झाल्याने धम्मचळवळ गतिमान होत आहे. सत्ताधारी आंबेडकरवाद्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. जगविख्यात महाविहार लढ्यासाठी एक वर्ष झाले तरी यश मिळाले नाही. विविध मोर्चे, आंदोलने झाली. देश संविधानावर विज्ञानवादी आहे. स्वातंत्र्यामध्ये भाग न घेणारे आरएसएस शंभरावा उत्सव प्रयागराजमध्ये करतात. मात्र, त्यांनी भेदाभेद केलेला आढळतो. तिथेही योगी सरकार विरोधात धम्माचे काम सुरू आहे. इप्सित साध्य करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागेल. सन २००० पासून देशात क्रांती सुरू झाली आहे. शिक्षण महत्त्वपूर्ण काम करते. पिढ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी संघटित राहून वाटचाल करावी लागेल. भारतीय बौद्ध महासभेची ताकद वाढत आहे. धम्माची पताका सर्वत्र फडकत आहे. धम्मच राजकीय चित्र बदलू शकतो. शस्त्राने भूभाग जिंकणारा महान राजा सम्राट अशोक शेवटी बुद्धांच्या चरणी लीन झाला. त्यांचीही प्रतिमा महापुरुषांबरोबर कार्यक्रमात असली पाहिजे.”
यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु. जी. बोराडे, ट्रस्टी अरुण पोळ व तालुकाध्यक्ष आनंदा गुजर यांनी मनोगत व्यक्त केले.
वंदना, सूत्रपठण व ध्वजारोहण माजी जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब भोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. धम्म रॅली बोधिसत्व बुद्ध विहारपासून निघाली होती. तिचा मार्ग बाळासाहेब देसाई कॉलेज मैदान – पाटणकर लायब्ररी चौक – मेन रोड – झेंडा चौक – नगरपंचायत असा होता. तालुकाध्यक्षा कमलताई मिलिंद-बापू कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मुंबई कमिटीचे अध्यक्ष भगवान भोळे यांनी स्वागत केले. सचिव घनश्याम कांबळे व सुरेखाताई गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. तालुका कोषाध्यक्ष ॲड. राहुल भोळे यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमास मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर, जिल्हाध्यक्षा संगीताताई मंगेश डावरे, जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष सुनील सपकाळ, राज्य उपाध्यक्ष उत्तम मगरे, मुंबई प्रदेश पर्यटन सचिव शहाजी मगरे, जिल्हा सरचिटणीस नेहाताई विजयकुमार गायकवाड, कराड तालुकाध्यक्ष यशवंत (आप्पा) अडसुळे, माजी केंद्रीय महासचिव नाथा ममता आगाणे (काका), जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, कोषाध्यक्षा प्रतीक्षा कांबळे, संघटक राजाराम पडवळ, महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही. आर. थोरवडे, संस्कार सचिव मिलिंद कांबळे, कराड तालुका कोषाध्यक्ष नंदकुमार भोळे, जिल्हा कोषाध्यक्ष रुपेश सावंत, जिल्हा सरचिटणीस यशपाल बनसोडे, संघटक चंद्रकांत कांबळे, माजी सरचिटणीस उदय भंडारे, मुंबई कमिटीचे माजी अध्यक्ष एन. बी. गायकवाड, जिल्हा संघटक उत्तम पवार, माजी पर्यटन सचिव रामचंद्र कांबळे (मामा), जावली तालुका सचिव बाळकृष्ण उर्फ तात्या गाडे, जिल्हा उपाध्यक्षा अनिता कांबळे, दगडू तांदळे, राजाराम पाटणकर, श्रीधर सवाखंडे, मंगेश डावरे, वर्षा सवाखंडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय व संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटणमध्ये व्यापाऱ्यांना धमकावण्याची घटना; मध्यस्थी करणाऱ्या पटेल बंधूंना शिवीगाळ, आरोपींवर कारवाईची मागणी

0
फलटणमध्ये व्यापाऱ्यांना धमकावण्याची घटना; मध्यस्थी करणाऱ्या पटेल बंधूंना शिवीगाळ, आरोपींवर कारवाईची मागणी

फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाडस वाढत असल्याची चिंताजनक घटना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) दुपारी उघडकीस आली. आंबेडकर चौक ते शिवाजी चौक मार्गावरील ‘हिंदुस्तान हार्डवेअर’ समोर भररस्त्यात झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या पटेल बंधू आणि त्यांच्या कामगारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकावण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास दोन इसम भरधाव वेगाने वाहन चालवत असताना ‘कट’ मारण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद काही क्षणांतच हाणामारीत परिवर्तित झाला. दुकानासमोरच गोंधळ सुरू असल्याने व्यवसायावर परिणाम होत होता.
मानवतेच्या भावनेतून ‘हिंदुस्तान हार्डवेअर’चे मालक पटेल बंधू यांनी संबंधित तरुणांना “दुकानाबाहेर भांडण करू नका” अशी विनंती करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या विनंतीचा राग मनात धरून संबंधित तरुणांनी पटेल बंधूंवर धाव घेत त्यांना खालच्या दर्जाची शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, दुकानातील कामगारांनाही जातीवाचक शब्दांनी अपमानित करत धमकावल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दोन दिवसांपूर्वीच शंकर मार्केट परिसरात ‘गाडी हळू चालवा’ असे सांगितल्याच्या कारणावरून कोयते काढण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा भरवस्तीत व्यापाऱ्यांवर धावून जाण्याचा प्रकार समोर आल्याने व्यापारी वर्गात संताप व्यक्त होत आहे.
“मध्यस्थी करणे हा गुन्हा आहे का?” असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः कामगारांना जातीवरून हिणवण्याचा प्रकार गंभीर असून सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिस ठाण्यात व्यापाऱ्यांची गर्दी
घटनेनंतर फलटणमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येत शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी तसेच व्यापाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलली नाहीत तर व्यापारी संघटना तीव्र आंदोलनाचा इशारा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
फलटण शहरात वाढत्या अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने वेळीच प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्गाची मागणी आहे.

शंकर मार्केट हल्ला प्रकरणी जखमी हिरणवाळे बंधूंना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट

0
शंकर मार्केट हल्ला प्रकरणी जखमी हिरणवाळे बंधूंना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट

फलटण : श्रीमंन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शंकर मार्केट परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या हिरणवाळे बंधूंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या हल्ल्यात जखमी झालेले अनिल हिरणवाळे व संतोष हिरणवाळे यांची त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, फलटणचे राजघराणे हिरणवाळे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. “तुमच्यावर ओढवलेले संकट हे केवळ तुमचे वैयक्तिक नसून संपूर्ण फलटणकरांचे आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच संबंधित पोलीस प्रशासनाने आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणीही त्यांनी व्यक्त केली. ऐतिहासिक फलटण शहरात कोणत्याही प्रकारची गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
फलटणची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कोणताही दबाव न मानता पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत आणि शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धम्ममित्र बालसंस्कार वर्गामार्फत सोमवार पेठ फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा जयंती साजरी

0
धम्ममित्र बालसंस्कार वर्गामार्फत सोमवार पेठ फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा जयंती साजरी

फलटण : धम्ममित्र बालसंस्कार वर्गामार्फत सोमवार पेठ, फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांची जयंती विधायक उपक्रमातून साजरी करण्यात आली. त्याग, सेवा आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणार्थ वाचनालय व परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आयु. चंद्रकांत मोहिते यांच्यासह विद्यार्थ्यांनी त्रिसरण पंचशील, भीमस्मरण, भीम स्तुती आणि बुद्ध पूजेद्वारे केली. धम्ममय वातावरणात उपासिका व उपस्थित नागरिकांनी श्रद्धापूर्वक सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशालजी शिंदे, विक्रम भोसले, प्रदीप खरात व बुवा लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व शाखेचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा परामर्श घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आयु. सोमीनाथ घोरपडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक न्याय आणि लोककल्याणावर आधारित उभी केली. स्त्रियांचा सन्मान, सर्वधर्मसमभाव, शिस्तबद्ध प्रशासन आणि शौर्य यांचा आदर्श त्यांनी घालून दिला. “रयतेचे राज्य” ही त्यांची संकल्पना आजच्या लोकशाही व्यवस्थेलाही दिशा देणारी आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा शिवरायांच्या जीवनातून मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
संत गाडगेबाबांच्या कार्याविषयी बोलताना आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी सांगितले की, गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि मानवसेवा यासाठी कार्य केले. “स्वच्छता हीच खरी पूजा” हा त्यांचा मूलमंत्र होता. गावोगावी कीर्तनांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती, शिक्षण आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा संदेश दिला. स्वतः झाडू हातात घेऊन कृतीतून आदर्श निर्माण करणे हीच त्यांची खरी शिकवण होती.

कार्यक्रमाचा शेवट धम्ममित्र बालसंस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वच्छतेचे महत्त्व आणि महापुरुषांच्या विचारांचे संस्कार रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान आयु. चंद्रकांत मोहिते यांनी केले.विद्यार्थ्यांनी सरणतंय घेऊन कार्यक्रमांची सांगता झाली.

फलटण धोक्याच्या छायेत? वाढती गुन्हेगारी, बेकायदेशीर कारभार आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
फलटण धोक्याच्या छायेत? वाढती गुन्हेगारी, बेकायदेशीर कारभार आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह


फलटण – कधीकाळी शिक्षण, संस्कृती, सहकार आणि सामाजिक सलोखा यासाठी ओळखलं जाणारं शहर. मात्र सध्या वाढत्या गुन्हेगारी, अवैध धंदे आणि असुरक्षिततेच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
“फलटण खरंच सुरक्षित आहे का?” हा प्रश्न आता कुजबुजेत नाही, तर उघडपणे विचारला जात आहे.
 अवैध धंद्यांचं खुलेआम साम्राज्य
शहर आणि परिसरात जुगार, मटका, चक्री यांसारखे अवैध धंदे दिवसाढवळ्या सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. किरकोळ व्यावसायिकांकडून हप्ते वसुली, दमदाटी, शिवीगाळ, मारहाण आणि खंडणीचे प्रकार वाढल्याची चर्चा आहे.
नागरिकांचा सरळ सवाल आहे –
हे सर्व प्रशासनाच्या नजरेतून सुटू शकतं का?
की माहिती असूनही कारवाई टाळली जातेय?
‍ महिला आणि मुली सर्वाधिक असुरक्षित?
शाळा, कॉलेज आणि शिकवणी वर्ग परिसरात मुलींची छेडछाड, अश्लील शेरेबाजी आणि पाठलागाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार आहे.
पालक मुलींना शिक्षणासाठी पाठवताना असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत.
ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नाही, तर समाजाच्या संवेदनशीलतेची कसोटी आहे.
☕ कॅफे, लॉज आणि संशयित हालचाली
काही कॅफे आणि शहरालगतच्या लॉजमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
हे प्रकार गुप्त नसून परिसरातील लोकांनाही माहिती असल्याचं सांगितलं जात आहे.
मग प्रश्न उरतो –
कारवाई का होत नाही?
कायद्याचा धाक कमी झाला आहे का?
 अमली पदार्थांचा वाढता सुळसुळाट
गांजाची विक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आणि अमली पदार्थांचं सेवन वाढल्याच्या तक्रारी आहेत.
जिनिंग, कुंभारभट्टी आणि विमानतळ परिसर ही ठिकाणं चर्चेत आहेत.
याचा परिणाम थेट तरुण पिढीवर होत असून व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
️ चेन स्नॅचिंग आणि हुल्लडबाजी
दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्याचं सांगितलं जात आहे.
रात्री बुलेट मोटारसायकलींचे सायलेंसर काढून होणारी ध्वनीप्रदूषणात्मक हुल्लडबाजी नागरिकांच्या त्रासाचं कारण बनली आहे.
शांत आणि सुरक्षित जीवनाची अपेक्षा असणाऱ्या सामान्य माणसासाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे.
 बेकायदेशीर सावकारकी – मूक पण घातक संकट
फलटण तालुक्यात बेकायदेशीर सावकारकी वाढल्याची वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही.
गरजू शेतकरी, छोटे व्यापारी आणि मजूर वर्ग अवास्तव व्याजदरांच्या विळख्यात अडकत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
धमक्या, मानसिक छळ आणि आर्थिक उद्ध्वस्तता यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडल्याची माहिती आहे.
सावकारकीविरोधी कायदे कागदावरच राहिले आहेत का, असा सवाल उपस्थित केला जातोय.
 पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह?
गुन्हे वाढत असल्याच्या तक्रारी असूनही सातत्यपूर्ण आणि ठोस कारवाई दिसत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
आर्थिक तडजोडीमुळे कारवाई थांबतेय का?
गुन्हेगारांना अभय दिलं जातंय का?
हे थेट आरोप नसले तरी निर्माण झालेला संशय प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे.
️ हे शहर कुणाचं?
फलटण हे कष्टकरी शेतकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, महिलांचं, लघुउद्योजकांचं आणि सामान्य नागरिकांचं शहर आहे.
कायद्याचा धाक आणि सामाजिक विश्वास पुन्हा प्रस्थापित करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
❓ शेवटचा सवाल
फलटणची ओळख काय असावी?
गुन्हेगारीचं केंद्र की सुरक्षित, सुसंस्कृत आणि विश्वासार्ह शहर?
हा लेख कोणाच्या विरोधात नसून शहराच्या भविष्यासाठी व्यक्त केलेली चिंता आहे.
आज आवाज उठवला नाही, तर उद्या उशीर होऊ शकतो.
आता प्रश्न एकच –
प्रशासन जागं होणार का?
की नागरिकांनाच “आम्हाला सुरक्षितता हवी” असं ठामपणे सांगावं लागणार?

बुद्ध विहार व परिसर स्वच्छतेतून कोळकी येथे संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती साजरी

0
बुद्ध विहार व परिसर स्वच्छतेतून कोळकी येथे संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती साजरी


फलटण (कोळकी) : थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कोळकी येथील बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाई महिला ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून जयंती उत्साहात आणि विधायक पद्धतीने साजरी करण्यात आली. विहार व परिसर झाडून स्वच्छ करत तसेच कीर्तनातून मन शुद्ध करण्याचा संदेश देत महिलांनी संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील, भीमस्मरण, भीम स्तुती व बुद्ध पूजेद्वारे झाली. उपस्थित सर्व महिला उपासिकांनी धम्ममय वातावरणात श्रद्धापूर्वक सहभाग नोंदविला. आयु. सुहास रामचंद्र माने यांनी सर्व बौद्ध उपासक-उपासिकांना फलाहार म्हणून केळी व आयुर्वेदिक चहा देऊन सेवा दिली.
यावेळी आयुनी रजनी सुहास माने, वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या प्रमुख आयुनी चित्राताई गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांताताई काकडे, आरती पाटील, विद्या खंदारे, कीर्ती माने, परिमिता कांबळे, बेबीनंदा रामचंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुनी चित्राताई गायकवाड यांनी सांगितले की, संत गाडगेबाबा यांनी समाजातील लोकांना जागृत करून स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवसेवेचा अमूल्य संदेश दिला. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुला-मुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, आजारी व अपंगांना उपचार, तसेच पशुपक्षी व मुक्या प्राण्यांप्रती दया असे अनेक मानवतावादी विषय त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांचे विचार केवळ जयंतीपुरते न ठेवता आचरणात आणणे हीच खरी अभिवादनाची भावना आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि त्यांनी दिलेल्या बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचा संकल्प जसा आपण करतो, तसाच संत गाडगेबाबांच्या स्वच्छता व मानवसेवेच्या कार्यालाही पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. कोळकी विहारातून या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढील काळातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.
संत गाडगेबाबांच्या “स्वच्छता हीच खरी पूजा” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत कोळकी येथील महिलांनी जयंती साजरी करण्याची ही प्रेरणादायी पद्धत समाजासाठी आदर्श ठरली.

फलटणमध्ये बाजारपेठेत दुर्दैवी मारहाण; आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईची नागरिकांची मागणी

0
फलटणमध्ये बाजारपेठेत दुर्दैवी मारहाण; आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईची नागरिकांची मागणी


फलटण, प्रतिनिधी : शहरातील शंकर मार्केट (जुनी मंडई) परिसरात रविवारी (दि. २२) भरदिवसा घडलेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. बाजारपेठेत वाहन हळू चालवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून १० ते १२ जणांच्या टोळीने दोन सख्ख्या भावांवर लोखंडी हत्यारे, दगड, काठ्या व काचेच्या बाटल्यांनी बेछूट हल्ला केला. या हल्ल्यात अनिल हिरणावळे आणि संतोष हिरणावळे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
आठवडी बाजारात घडली घटना
रविवारी फलटण येथे आठवडी बाजार असल्याने शंकर मार्केट परिसरात मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत संबंधित तरुणांनी भरधाव वेगात मोटारसायकली चालवत धाकदपटशा निर्माण केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आवाज करणारे सायलेंसर, बुलेटचा कर्कश आवाज आणि बेफाम वेग यामुळे नागरिक त्रस्त होते. वाहन सावकाश चालवण्यास सांगितल्यावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले.
लोखंडी हत्यारे आणि बाटल्यांनी प्राणघातक मारहाण
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी लोखंडी रॉड, काठ्या आणि काचेच्या बाटल्यांनी डोक्यावर, हातावर आणि चेहऱ्यावर वार केले. भर रस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे काही काळ बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. गंभीर जखमी अवस्थेत दोन्ही भावांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हजारोंचा मोर्चा; पोलिसांना जाब
घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील व्यापारी, विविध संघटना आणि नागरिकांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत फलटण शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई करावी, मुख्य सूत्रधारांसह सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) गुन्हा दाखल करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
मोर्चादरम्यान काही आंदोलकांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्ती, बेकायदेशीर धंदे आणि कथित हप्तेखोरीबाबतही आवाज उठवला. “हा हल्ला केवळ दोन व्यक्तींवर नसून शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवरच आहे,” असे विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
प्रशासनाला इशारा
आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास फलटण शहर बंद ठेवून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक न केल्यास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इरादाही व्यक्त करण्यात आला.
शहरात उघड्यावर शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या टोळ्यांमुळे व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमींची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती नाजूक असताना अशा प्रकारांनी सामान्य माणसाचे जगणे कठीण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
निष्कर्ष
या घटनेमुळे फलटणमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी प्रशासनाने केवळ गुन्हा दाखल करून न थांबता, शहरातील गुन्हेगारीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
#हॅशटॅग्स
#फलटण #शंकरमार्केट #मारहाण #मोक्का #कायदा_सुव्यवस्था #व्यापारीमोर्चा #गुन्हेगारीवाढ

मनाला चटका लावणारी बातमी : कै. चंद्रभागा वामन इंगळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
मनाला चटका लावणारी बातमी : कै. चंद्रभागा वामन इंगळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फलटण : फलटण शहरातील म्युनिसिपल कामगार वसाहत (महात्मा फुले नगर ) येथील मनमिळाऊ, हसतमुख आणि सर्वांना मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या कै. चंद्रभागा वामन इंगळे यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. चंद्रभागा वामन इंगळे या परशुराम वामन इंगळे व विजय वामन इंगळे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबियांसह नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांची अत्ययात्रा आज दुपारी १२.३० वाजता म्युनिसिपल कामगार वसाहत, महात्मा फुले नगर, फलटण येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
कै. चंद्रभागा वामन इंगळे यांच्या साधेपणा, प्रेमळ स्वभाव आणि समाजकार्याची आठवण सर्वांच्या मनात कायम राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

साहस टाईम्स तर्फे विनम्र अभिवादन

विचारांचा दीप आणि कृतीची मशाल : कर्मयोगी संत गाडगेबाबा

0
विचारांचा दीप आणि कृतीची मशाल : कर्मयोगी संत गाडगेबाबा

साहस टाईम्स :- आज 23 फेब्रुवारी 2026 कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा जन्मदिन त्यानिमित्त त्यांच्या विचार व कार्याला विनम्र अभिवादन!

भारतीय संतपरंपरेत अध्यात्म आणि समाजकारण यांचा सुंदर संगम घडवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रसंत गाडगेबाबा. साधी वेशभूषा, हातात झाडू, ओठांवर प्रबोधनपर कीर्तन आणि मनात समाजउद्धाराची तळमळ हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, अस्वच्छता, जातिभेद, दारिद्र्य आणि अशिक्षण यांविरुद्ध झुंज दिली. त्यांच्या विचारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ बोलण्यात नव्हते, तर प्रत्यक्ष कृतीत उतरलेले होते. म्हणूनच आजच्या बदलत्या, वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान काळातही त्यांचे विचार अधिकच महत्त्वाचे वाटतात.

१. स्वच्छतेचा व्यापक अर्थ
गाडगेबाबा ज्या गावात पोहोचत, तेथे प्रथम झाडू हातात घेत. ते म्हणत, “गाव स्वच्छ असेल तर मनही स्वच्छ राहील.” त्यांच्यासाठी स्वच्छता म्हणजे फक्त रस्ते, देवळे किंवा अंगणे झाडणे नव्हते; तर ती विचारांची, आचारांची आणि व्यवहारांचीही शुद्धता होती.
आजही अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणांची अस्वच्छता, कचऱ्याचे ढिगारे आणि बेफिकीर वृत्ती दिसते. शासनाच्या योजना कितीही असल्या, तरी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी स्वीकारली तरच खरी बदलाची सुरुवात होईल. गाडगेबाबांचे जीवन आपल्याला शिकवते की, परिवर्तनाची पहिली पायरी म्हणजे स्वतःपासून सुरुवात करणे.

२. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाविरुद्ध प्रखर भूमिका
गाडगेबाबांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धांना आणि दिखाऊ कर्मकांडांना कठोर शब्दांत विरोध केला. त्यांनी लोकांना पटवून दिले की, देव दगडात नसून माणसात आहे. मंदिरात नारळ फोडण्यापेक्षा एखाद्या गरिबाला अन्न द्या, हेच खरे धर्मकार्य आहे.
आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही अनेक अंधश्रद्धा समाजात पसरलेल्या दिसतात. शिक्षण असूनही अंधविश्वास वाढताना दिसतो. अशा वेळी गाडगेबाबांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचार अधिकच आवश्यक वाटतो.

३. शिक्षणाचा प्रसार आणि समाजोद्धार
गाडगेबाबांनी शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले. त्यांच्या मते शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे. त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी धर्मशाळा, वसतिगृहे आणि शैक्षणिक संस्था उभारल्या.
आजही ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची कमतरता आहे. मुलींचे शिक्षण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची प्रगती, रोजगाराभिमुख शिक्षण यावर अधिक भर देण्याची गरज आहे. गाडगेबाबांच्या विचारांतून आपण हे शिकतो की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे.

४. जातिभेद आणि सामाजिक समतेचा संदेश
गाडगेबाबांनी जात-पात, उंच-नीच भेदभाव यांचा तीव्र निषेध केला. त्यांच्या कीर्तनांतून समतेचा संदेश घुमत असे. सर्व माणसे समान आहेत, हा विचार त्यांनी ठामपणे मांडला.
आजही समाजात विविध स्तरांवर भेदभावाचे प्रकार दिसतात. खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट व्हायची असेल, तर सामाजिक समता आणि परस्पर सन्मान आवश्यक आहे. गाडगेबाबांचा समतावादी दृष्टिकोन आपल्याला अधिक संवेदनशील बनवतो.

५. साधेपणा आणि निस्वार्थ सेवा
गाडगेबाबांचे संपूर्ण जीवन साधेपणाचे प्रतीक होते. त्यांनी कधीही वैभव, कीर्ती किंवा पदाची अपेक्षा ठेवली नाही. समाजासाठी केलेले कार्य हेच त्यांचे खरे समाधान होते.
आजच्या स्पर्धात्मक आणि भौतिकवादी युगात हा साधेपणा दुर्मीळ होत चालला आहे. परंतु त्यांचे जीवन आपल्याला सांगते की, खरी श्रीमंती ही सेवेत आणि माणुसकीत असते.

डॉ. आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यातील परस्पर आदराचे नाते
ऐतिहासिक उल्लेखांनुसार, गाडगेबाबा आणि बाबासाहेब यांच्यात परस्पर सन्मानाचे नाते होते. गाडगेबाबांनी बाबासाहेबांच्या कार्याचे कौतुक केले होते. समाजातील दलित आणि वंचित घटकांसाठी बाबासाहेब करत असलेले कार्य त्यांना महत्त्वाचे वाटत असे.
बाबासाहेबांनीही गाडगेबाबांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याची दखल घेतली होती. लोकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन स्वच्छता, समता आणि सेवा यांचा संदेश देणारा संत म्हणून त्यांनी गाडगेबाबांकडे पाहिले.

गाडगे महाराज आणि बाबासाहेबांची भेट
14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, “डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे.”
डॉ. बाबासाहेब म्हणाले, “बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.” या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

६. आजच्या काळातील प्रेरणा
आज सोशल मीडियावर विचार मांडणे सोपे झाले आहे; परंतु प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवणे कठीण आहे. गाडगेबाबांनी शब्दांपेक्षा कृतीवर भर दिला.
त्यांचे विचार पुढील क्षेत्रांत विशेष उपयुक्त ठरू शकतात :
पर्यावरण संवर्धन
स्वच्छता आणि सार्वजनिक जबाबदारी
अंधश्रद्धा निर्मूलन
शिक्षणाचा प्रसार
सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव
जर प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात लहान-लहान उपक्रम सुरू केले, तर मोठे परिवर्तन शक्य आहे.
राष्ट्रसंत गाडगेबाबांचे विचार केवळ स्मरणरूपाने जपणे पुरेसे नाही; ते आपल्या आचरणात उतरवणे गरजेचे आहे. स्वच्छता, समता, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निस्वार्थ सेवा हीच त्यांची खरी शिकवण आहे.
आपण प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्या विचारांची अंमलबजावणी केली, तर समाज अधिक सुजाण, समतावादी आणि सुसंस्कृत बनेल. हीच त्यांना दिलेली खरी त्यांच्या जयंती दिनी आदरांजली ठरेल.

आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौद्ध महासभा शाखा – सातारा जिल्हा पूर्व
मो. 9284658690

सोमंथळीपूलदुर्घटना : करंज ओढ्यावरच्या नव्या पुलाचा स्लॅब कोसळला, ठेकेदारावर कारवाईची मागणी

0
सोमंथळीपूलदुर्घटना : करंज ओढ्यावरच्या नव्या पुलाचा स्लॅब कोसळला, ठेकेदारावर कारवाईची मागणी

फलटण – सोमंथळी येथील करंज ओढ्यावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट पुलाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असताना मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाच्या वरच्या मजल्यावरील (स्लॅब) काम सुरू असतानाच तो अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित ठेकेदाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सोमंथळीतील करंज ओढ्यावरचा पूल अनेक वर्षांपासून रखडलेला होता. टिकाऊ व दर्जेदार पूल व्हावा यासाठी ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध माध्यमांतूनही या संदर्भात वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर या पुलासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि कामास सुरुवात झाली. मात्र कामाच्या सुरुवातीलाच स्लॅब कोसळल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काम सुरू असतानाच पुलाचा भाग कोसळत असेल, तर पुढील बांधकाम किती सुरक्षित असेल, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. “बांधकामाच्या टप्प्यातच पूल ढासळत असेल, तर पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?” अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच उर्वरित काम दर्जेदार साहित्य व तांत्रिक देखरेखीखाली नव्याने करावे, अशी ठाम मागणी सोमंथळी व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेऊन दुसऱ्या सक्षम ठेकेदाराकडे देण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.
सोमंथळीचे पोपट गोफणे यांनी सांगितले, “नवीन पुलाच्या वरच्या स्लॅबचे काम सुरू असताना तो कोसळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून काम दुसऱ्या ठेकेदाराकडे द्यावे.”