Wednesday, August 26, 2026
Homeसाताराबौध्द धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी संघटित प्रयत्नांची गरज : डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

बौध्द धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी संघटित प्रयत्नांची गरज : डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

बौध्द धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी संघटित प्रयत्नांची गरज : डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर


सातारा, दि.२४ : १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मक्रांती झाली. दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. तदनंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देत, “यापुढे उर्वरित आयुष्य धम्म परिवर्तनासाठी समर्पित करणार आहे,” असा दाखला त्यांनी दिला.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दल प्रमुख डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नगरपंचायत मैदान, पाटण येथे पाटण तालुका महिला व पुरुष कार्यकारिणीच्यावतीने भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आनंदा गुजर होते.
डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणाले, “बाबासाहेबांनी दिलेली धम्मक्रांती देशात उत्साहवर्धक अनुयायी पुढे घेऊन चालले आहेत. अनेक लोक धम्मात येत आहेत. वारंवार शिबिरे झाली पाहिजेत. प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच धम्म चळवळ वाढणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये ७५ जिल्ह्यांत चार राज्य निर्माण झाल्याने धम्मचळवळ गतिमान होत आहे. सत्ताधारी आंबेडकरवाद्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. जगविख्यात महाविहार लढ्यासाठी एक वर्ष झाले तरी यश मिळाले नाही. विविध मोर्चे, आंदोलने झाली. देश संविधानावर विज्ञानवादी आहे. स्वातंत्र्यामध्ये भाग न घेणारे आरएसएस शंभरावा उत्सव प्रयागराजमध्ये करतात. मात्र, त्यांनी भेदाभेद केलेला आढळतो. तिथेही योगी सरकार विरोधात धम्माचे काम सुरू आहे. इप्सित साध्य करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागेल. सन २००० पासून देशात क्रांती सुरू झाली आहे. शिक्षण महत्त्वपूर्ण काम करते. पिढ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी संघटित राहून वाटचाल करावी लागेल. भारतीय बौद्ध महासभेची ताकद वाढत आहे. धम्माची पताका सर्वत्र फडकत आहे. धम्मच राजकीय चित्र बदलू शकतो. शस्त्राने भूभाग जिंकणारा महान राजा सम्राट अशोक शेवटी बुद्धांच्या चरणी लीन झाला. त्यांचीही प्रतिमा महापुरुषांबरोबर कार्यक्रमात असली पाहिजे.”
यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु. जी. बोराडे, ट्रस्टी अरुण पोळ व तालुकाध्यक्ष आनंदा गुजर यांनी मनोगत व्यक्त केले.
वंदना, सूत्रपठण व ध्वजारोहण माजी जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब भोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. धम्म रॅली बोधिसत्व बुद्ध विहारपासून निघाली होती. तिचा मार्ग बाळासाहेब देसाई कॉलेज मैदान – पाटणकर लायब्ररी चौक – मेन रोड – झेंडा चौक – नगरपंचायत असा होता. तालुकाध्यक्षा कमलताई मिलिंद-बापू कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मुंबई कमिटीचे अध्यक्ष भगवान भोळे यांनी स्वागत केले. सचिव घनश्याम कांबळे व सुरेखाताई गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. तालुका कोषाध्यक्ष ॲड. राहुल भोळे यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमास मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर, जिल्हाध्यक्षा संगीताताई मंगेश डावरे, जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष सुनील सपकाळ, राज्य उपाध्यक्ष उत्तम मगरे, मुंबई प्रदेश पर्यटन सचिव शहाजी मगरे, जिल्हा सरचिटणीस नेहाताई विजयकुमार गायकवाड, कराड तालुकाध्यक्ष यशवंत (आप्पा) अडसुळे, माजी केंद्रीय महासचिव नाथा ममता आगाणे (काका), जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, कोषाध्यक्षा प्रतीक्षा कांबळे, संघटक राजाराम पडवळ, महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही. आर. थोरवडे, संस्कार सचिव मिलिंद कांबळे, कराड तालुका कोषाध्यक्ष नंदकुमार भोळे, जिल्हा कोषाध्यक्ष रुपेश सावंत, जिल्हा सरचिटणीस यशपाल बनसोडे, संघटक चंद्रकांत कांबळे, माजी सरचिटणीस उदय भंडारे, मुंबई कमिटीचे माजी अध्यक्ष एन. बी. गायकवाड, जिल्हा संघटक उत्तम पवार, माजी पर्यटन सचिव रामचंद्र कांबळे (मामा), जावली तालुका सचिव बाळकृष्ण उर्फ तात्या गाडे, जिल्हा उपाध्यक्षा अनिता कांबळे, दगडू तांदळे, राजाराम पाटणकर, श्रीधर सवाखंडे, मंगेश डावरे, वर्षा सवाखंडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय व संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments