Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रपंढरपूर आषाढी वारीसाठी सुविधा आणि स्वच्छतेला प्राधान्य — पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा...

पंढरपूर आषाढी वारीसाठी सुविधा आणि स्वच्छतेला प्राधान्य — पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा प्रशासनाला स्पष्ट संदेश

सोलापूर प्रतिनिधी :-  केबीपी महाविद्यालय सभागृह, पंढरपूर  जिल्हा – सोलापूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी शासन पूर्णपणे सज्ज असून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

पंढरपूर येथे केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात आषाढी वारी 2025 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सीईओ कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, पालखी मार्ग व तळांवरील सुविधा, तसेच पंढरपूर शहरात भाविकांच्या राहण्याची योग्य व्यवस्था केली जावी. चंद्रभागा नदीपात्रासाठी स्वतंत्र स्वच्छता यंत्रणा उभारण्यात येणार असून, शहरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.

भाविकांना माहिती देणारे फलक किमान 15 फूट उंचीचे असावेत. होड्यांची नोंदणी, चालकांचे नाव व आसन क्षमतेचे नियमन करावे, तसेच होड्यांमध्ये पुरेशा लाईफ जॅकेट्सची व्यवस्था असावी, असेही त्यांनी सुचवले.

शहरातील पार्किंग जागांवर मुरमीकरण व रोलिंग, अतिक्रमण हटविणे, वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने हटविणे, तसेच वाखरी-पंढरपूर रस्त्याचे काम वेगात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर केला आणि सर्व भाविकांना अडथळ्याविना सेवा मिळावी यासाठी काटेकोर नियोजन केले जात असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments