आंदोलनाला मोठे यश; प्रशासनाच्या निर्णयानंतर उपोषणाची सांगता होण्याची शक्यता
फलटण | प्रतिनिधी फलटण नगरपरिषदेच्या मालकीचा कुरेशीनगर (मंगळवार पेठ) येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. गोरक्षक अक्षय तावरे यांनी कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कत्तलखाना बंद करण्याबाबत आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी अक्षय तावरे यांनी सहकाऱ्यांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. आंदोलनाला दिवसेंदिवस नागरिकांचा तसेच विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढत होता. प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेत अखेर कत्तलखाना बंद करण्याचा निर्णय घेतला.
कत्तलखान्याच्या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून फलटण शहरात वातावरण तापले होते. आंदोलनादरम्यान प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका अक्षय तावरे यांनी घेतली होती.
दरम्यान, कत्तलखाना बंद करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश झाल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या निर्णयामुळे अक्षय तावरे यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
कत्तलखाना बंद करण्याचा आदेश प्रत्यक्षात कधीपासून लागू होणार, त्याची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने केली जाणार आणि संबंधित ठिकाणी पुढील कार्यवाही काय होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जनतेच्या हक्कासाठी लढणारे व्यासपीठ — साहस Times
