इंधन बचत व सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

0
5
इंधन बचत व सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

इंधन बचत व सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

इंधन बचत व सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन
सातारा, दि. १४ : पश्चिम आशियातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचत, परकीय चलन संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना विविध उपाययोजना अवलंबण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ १५ मे २०२६ रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना घरातून काम करण्यास प्रोत्साहन देणे, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे, खाद्य तेलाचा मर्यादित वापर, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढविणे तसेच परदेश दौरे टाळणे यांसारख्या उपाययोजनांचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने सर्व विभाग प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी शक्य तितक्या प्रमाणात एस.टी. बससह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे निर्देश द्यावेत, असे सांगण्यात आले. तसेच संयुक्त दौऱ्यांसाठी कारपूलिंगचा अवलंब करणे, अनावश्यक वाहन वापर टाळणे आणि इंधन बचतीबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे म्हटले आहे. तसेच शासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पोलीस विभागानेही कठोरपणे पालन करावे, असे निर्देश अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिले.