जनतेच्या कराच्या पैशातून उत्सव करून श्रेय लाटू नका; नागपंचमीचा कार्यक्रम स्वखर्चातून घेण्याचे खुले आव्हान
फलटण : महिलांच्या पारंपरिक नागपंचमी उत्सवाच्या आयोजनावरून फलटण नगरपरिषदेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संग्राम अहिवळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जनतेच्या करातून जमा झालेल्या निधीचा वापर करून कार्यक्रम आयोजित करायचा आणि त्याचे राजकीय श्रेय सत्ताधाऱ्यांनी घ्यायचे, हा प्रकार योग्य नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागपंचमी उत्सवासाठी नगरपरिषदेने नेमका किती निधी खर्च केला, याचा सविस्तर हिशोब अधिकृतपणे मागणार असल्याचेही अहिवळे यांनी स्पष्ट केले.
संग्राम अहिवळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना सवाल उपस्थित करताना, एखादा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून मोठ्या स्वरूपात आयोजित केला तर त्याचे जनतेला निश्चितच कौतुक वाटेल, असे म्हटले आहे. मात्र, नगरपरिषदेच्या तिजोरीतील म्हणजेच जनतेच्या कराच्या पैशातून कार्यक्रम आयोजित करून तो स्वतःच्या खर्चातून केल्याचे चित्र निर्माण करणे आणि त्याचे श्रेय घेणे चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली.
पूर्वीच्या कार्यक्रमांच्या खर्चावरूनही प्रश्न
यापूर्वी माळजाई मंदिर परिसरातील क्रिकेट सामन्याच्या स्क्रीनिंगच्या खर्चावरूनही आपण प्रश्न उपस्थित केले होते, असे अहिवळे यांनी नमूद केले. तसेच बांधकाम कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शासकीय भांडी वाटप कार्यक्रमांमध्येही सत्ताधारी भाजपकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
महापुरुषांच्या जयंतीसाठी प्रत्येकी ५ लाखांची मागणी
नागपंचमी उत्सवासाठी नगरपरिषदेच्या निधीतून खर्च केला जात असेल, तर त्याच न्यायाने समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या जयंती उत्सवांसाठीही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अहिवळे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवांसाठी नगरपरिषदेने प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आपण प्रशासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘नागपंचमीचा उत्सव स्वखर्चातून करून दाखवा’
उत्सवाच्या आयोजनातून होणाऱ्या राजकारणावरही अहिवळे यांनी जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांमध्ये स्वतःच्या बळावर कार्यक्रम घेण्याची क्षमता नसल्याने इतरांच्या पारंपरिक कार्यक्रमांवर राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“उद्याचा नागपंचमी उत्सव स्वखर्चातून पार पाडून दाखवा,” असे खुले आव्हानही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे. कार्यक्रम महिलांसाठी असताना पुरुष नगरसेवकांकडून पत्रकार परिषदा घेऊन त्याचा गाजावाजा का केला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरकारी निधीतून राजकीय प्रसिद्धीचा आरोप
नगरपरिषदेच्या निधीतून कार्यक्रम आयोजित करून त्यावर सत्ताधाऱ्यांची नावे व फोटो असलेले बॅनर लावणे आणि त्यातून राजकीय प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संग्राम अहिवळे यांनी केला आहे. जनतेच्या पैशांचा वापर करताना पारदर्शकता आणि समानता राखली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
नागपंचमी उत्सवासाठी झालेल्या खर्चाचा अधिकृत तपशील, निधीचा स्रोत आणि खर्चाचे स्वरूप याबाबत माहिती मिळाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नागपंचमी उत्सवाच्या खर्चाचा हिशोब आणि महापुरुषांच्या जयंती उत्सवांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या निधीची मागणी यामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आता सामाजिक कार्यकर्ते संग्राम अहिवळे यांच्या आरोपांवर फलटण नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधारी भाजपकडून काय भूमिका मांडली जाते, तसेच नागपंचमी उत्सवासाठी प्रत्यक्षात किती खर्च झाला याचा तपशील सार्वजनिक केला जातो का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
