
मौजे बीबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
फलटण (प्रतिनिधी) :विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मौजे बीबी येथे सिद्धार्थ तरुण मंडळ, भीमनगर बिबी यांच्या वतीने भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान” या विषयावर झालेले प्रभावी व्याख्यान होय.
या व्याख्यानासाठी ग्रामस्थ, बौद्ध उपासक-उपासिका तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आपल्या व्याख्यानात सोमीनाथ घोरपडे यांनी बाबासाहेबांच्या बहुआयामी कार्याचा सखोल आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची जाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.”
औद्योगिक व आर्थिक धोरणांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्राच्या विकासासाठी बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण दिशा दिली. Reserve Bank of India, Life Insurance Corporation of India यांसारख्या संस्थांच्या उभारणीमागील दूरदृष्टी त्यांनी स्पष्ट केली. खाणी, विमा व पायाभूत उद्योगांच्या राष्ट्रीयीकरणाची संकल्पना मांडून त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाचा पाया मजबूत केला.
जल व ऊर्जा क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, Central Water Commission यांसारख्या संस्थांची पायाभरणी बाबासाहेबांच्या विचारातून झाली. दामोदर व हिराकूड प्रकल्प तसेच १९४८ साली केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या स्थापनेद्वारे राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना साकार झाली.
शेतकरी व कामगारांसाठीच्या लढ्याचा उल्लेख करताना त्यांनी १९३८ मधील खोतीप्रथा विरोधातील आंदोलन, “कसेल त्याची जमीन” ही संकल्पना, तसेच कुळ कायदा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे महत्त्व स्पष्ट केले. कामगार मंत्री म्हणून ८ तासांचा कामाचा दिवस, पगारी रजा, महागाई भत्ता व कामगार हक्कांचे संरक्षण यांसारखे ऐतिहासिक निर्णय बाबासाहेबांनी घेतले, असे त्यांनी सांगितले.
तसेच लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या प्रसंगाचा संदर्भ देत “Annihilation of Caste” या ग्रंथाच्या निर्मितीची पार्श्वभूमीही त्यांनी उलगडली.
सोमीनाथ घोरपडे यांनी आपल्या भाषणात माता रमाई यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत सांगितले की, त्यांच्या त्यागामुळेच बाबासाहेब घडू शकले. महिलांनी माता रमाई, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन नीतिमान जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोमीनाथ घोरपडे यांनी सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका व सिद्धार्थ तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना इथून पुढील काळामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या फोटो सोबत सम्राट अशोकांचा फोटो सन्मानपूर्वक पूजा साहित्य मध्ये लावण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनांमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचार – प्रसार कार्यामध्ये व एकंदरीत भारताच्या जडणघडणीमध्ये सम्राट अशोकाचे योगदान सांगितले.
या जयंती महोत्सवानिमित्त आयु. शशी जगताप यांनी स्व. विलास जगताप यांच्या स्मरणार्थ उपस्थितांना स्नेहपूर्वक अन्नदान केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, बिबी यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमास बाळासाहेब काकडे, गणेश काकडे, राज काकडे, अविनाश काकडे, प्रदीप काकडे, दादा गायकवाड, सूरज सातपुते तसेच सिद्धार्थ तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राज काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी सिद्धार्थ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.








