सातारा :“जिद्द असेल तर वय फक्त एक आकडा ठरतो” हे नांदगाव (ता. सातारा) येथील 65 वर्षीय मंगल आवळे या आजींनी सिद्ध करून दाखवलं आहे. सध्या त्यांची रिक्षा उंडाळे व सवादे जिंती या दुर्गम भागांमध्ये धावते आहे. मुलाकडून रिक्षा चालवायला शिकलेल्या या आजींनी अवघ्या दोन-तीन दिवसांत वाहनावर हुकमत मिळवली आणि गेल्या 15 दिवसांपासून त्या रिक्षा चालवून प्रवाशांची मने जिंकत आहेत.
गर्दी असो वा चढ-उतार, मंगल आजी कुठेही निर्धास्तपणे रिक्षा चालवतात. मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुणाईपुढे त्यांनी प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. उंडाळे परिसरात ‘रिक्षावाल्या आजी’ म्हणूनच त्यांची ओळख बनली आहे. समाज माध्यमांतूनही त्यांच्या या धाडसी निर्णयाचं कौतुक होत आहे.
राज्यातील 10 हजार महिलांना ‘पिंक इ-रिक्षा’; मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्तुत्य उपक्रम
दरम्यान, राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘पिंक इ-रिक्षा योजना’ सुरू केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात नागपूरसह 8 जिल्ह्यांतील 10 हजार महिलांना रिक्षा वितरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेमागे सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि महिलांना रोजगार देण्याचा दुहेरी हेतू असल्याचे सांगितले आहे. महिला व बालविकास विभागाद्वारे राबवली जाणारी ही योजना महिला सबलीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.