अंबाजोगाई (जि. बीड) प्रतिनिधी | गावातील ध्वनिप्रदूषणाविरोधात प्रशासनाकडे तक्रार देणाऱ्या एका महिला वकिलेला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. गावातील सरपंच आणि त्याच्या किमान दहा कार्यकर्त्यांनी मिळून या महिलेला शेतात रिंगण करून काठ्यांनी व जेसीबीच्या पाईपने अमानुषपणे मारहाण केली. ही महिला बेहोश होईपर्यंत हल्ला सुरू होता.
मायग्रेनच्या त्रासामुळे गावातील लाऊडस्पीकर, पिठाच्या गिरण्या यांचा त्रास होत असल्याने पीडित वकिल महिलेने याबाबत स्थानिक प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या होत्या. त्या तक्रारींचा राग मनात धरून, सरपंच आणि त्याचे समर्थक आक्रमक झाले आणि शेवटी शेतात बोलावून तिला बेदम मारहाण करण्यात आली.
पीडित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रात्रीच उपचार करून घरी पाठवण्यात आले.
या प्रकारामुळे गावात भीतीचं वातावरण आहे. एका शिक्षित, कायदेविषयक ज्ञान असलेल्या महिलेसह असं वागणं म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा घात आहे.
प्रश्न अनुत्तरित:
- गावचा सरपंच कोणत्या पक्षाचा आहे?
- त्याचं राजकीय संरक्षण कोण करतंय?
- पोलिसांनी अद्याप कोणतीही कठोर कारवाई का केली नाही?
- महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न इतका दुय्यम का ठरतोय?
हा प्रकार म्हणजे केवळ एका महिलेविरुद्ध हिंसा नसून, संविधानाच्या तत्वांवर आघात आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि राजकीय नेत्यांनी याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.