फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात गेल्या ३० वर्षात केलेल्या विविध विकासकामांमुळे आणि जिरायत पट्टा बागायत प्रकल्पाच्या यशामुळे चांगली कामगिरी साधली होती, मात्र लोकांपर्यंत ती पोहोचवून त्याचे श्रेय घेण्यात कमी पडल्याने यंदा प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. आगामी काळात या बाबींची सुधारणा करुन अधिक यश मिळवू, असे आवाहन करत ते म्हणाले की, “कोणीही खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने काम करा.”
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राजे गटाचे कार्यकर्ता व पदाधिकारी यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
दिपकराव चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात, “आपल्या सर्व सहकार्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि उत्कृष्ट काम केले. लोकांनी भरभरून मतदान केल्यामुळेच आपल्याला ४३ टक्के मते मिळाली. पराभव स्वीकारून, आपण पुन्हा एकविचाराने आपली वाटचाल सुरू ठेवू,” असे म्हटले.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या खोट्या आरोपांचा खंडन करत, “विरोधकांनी लोकांची दिशाभूल केली आणि खोटे बोलून मते घेतली, परंतु हे पराभव नसून विजय आहे. आगामी काळात, आपण लोकांसमोर जाऊन वस्तुस्थिती समजावून देऊन पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करू,” असे ठामपणे सांगितले.
प्रारंभी डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात संवाद मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. यावेळी प्रा. अनिल जगताप, शंभूराज खलाटे, संजय साळुंखे, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांच्या भाषणांनी कार्यक्रमाला अधिक उंची दिली.
समारोपात धनंजय पवार यांनी आभार मानले.