
मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक गणेश यादव हा वर्सोवा येथील सागर कुटीर येथे राहत असून रविवारी रात्री गणेश व त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव हे दोघे घरात गरम होत असल्याने उघड्यावर वर्सोवा समुद्रकिनारी झोपण्यासाठी गेले होते. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीनं समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या गणेश व बबलू यांना भरधाव येत गाडी त्यांच्या अंगावरून नेली. यात गणेश यादव हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र बाबलू हा गंभीर जखमी झाला. अपघाता नंतर वाहनचालकांनी गाडी थांबवली. तसेच गाडीतून उतरुन गणेश यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेशने हालचाल केली नसल्याने दोघेही आरोपी कार घेऊन मदत न करता पळून गेले. या घटनेची माहिती वर्सोवा पोलिसांना मितळच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी दोघांनाही उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी गणेशचा मृत्यू झाला असल्याचं जाहीर केलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी निखिल जावळे व शुभं डोंगरे यांना अटक केली आहे. निखिल जावळे हा एका कॅब सर्व्हिसचा संचालक असून शुभम डोंगरे हा त्याच्या व्यवसायात भागीदार आहे, या दोघांना नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींना मंगळवारी अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.





