
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बापू पाटील समाधी व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा कायापालट; नगरसेविका मनिषा मोहन तिकोटे व नगरसेवक विलासकाका क्षीरसागर यांचा पुढाकार
अकलूज | प्रतिनिधी आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक १० च्या कर्तव्यतत्पर नगरसेविका मनिषा मोहन तिकोटे व नगरसेवक विलासकाका क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास व सुशोभीकरणाच्या कामांना वेग देण्यात आला आहे.
प्रभागातील बापू पाटील समाधी व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम, गटर साफसफाई, रंगरंगोटी तसेच परिसरात ब्लॉक बसविण्याच्या (पेव्हर ब्लॉक) कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने मंदिर परिसर आकर्षक, स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यावर विशेष भर दिला जात आहे.
मंदिर व समाधी परिसरातील भिंतींना रंगरंगोटी करून परिसराला नवचैतन्य देण्यात येत असून, पावसाळ्यात चिखल होऊ नये आणि भाविकांना चालताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासोबतच गटारींची साफसफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाईल, याचीही दक्षता घेतली जात आहे.
नगरसेविका मनिषा मोहन तिकोटे यांनी सांगितले की, पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रसन्न वातावरण मिळावे, हा या कामामागील प्रमुख उद्देश आहे. प्रभागातील विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असून नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य दिले जात आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिक आणि भाविकांनी समाधान व्यक्त करत नगरसेविका मनिषा मोहन तिकोटे यांच्या विकासाभिमुख कार्याचे स्वागत केले आहे.










