Monday, September 14, 2026
Homeसातारासांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत तणाव; भाजपला शंभूराज देसाईंचा सूचक इशारा

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत तणाव; भाजपला शंभूराज देसाईंचा सूचक इशारा

कराड | प्रतिनिधी :- सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. भाजपकडून या निवडणुकीत स्वतंत्र शक्तिप्रदर्शनाची भूमिका घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उत्पादन शुल्क व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे.

कराड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देसाई म्हणाले की, “महायुतीतील समन्वयाला जर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल, तर आम्हालाही पुढील राजकीय भूमिका ठरवावी लागेल. आमच्या पक्षातील स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची भावना जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.”

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येत असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना देसाई म्हणाले की, “आमच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली असून स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतील निष्कर्ष पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येतील. त्यानंतर मुंबईत वरिष्ठ पातळीवर पुढील निर्णय घेतले जातील.”

कराड येथे नुकत्याच झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याबाबत विचारले असता देसाई म्हणाले, “पालकमंत्री म्हणून मी अनेकदा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तुम्ही समन्वयासाठी पुढाकार घेत नसाल आणि त्याचवेळी समन्वयाची अपेक्षा करत असाल, तर आम्हालाही आमची भूमिका ठरवावी लागेल.”

महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे संकेत या घडामोडींमधून मिळत असून, आगामी विधान परिषद निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

दरम्यान, १३ जून रोजी कराड येथे झालेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीस भाजपचे आमदार जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अमित कदम, तसेच भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा अधिकच रंगली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments