Monday, September 14, 2026
Homeफलटणमोबाईलचे व्यसन की सुदृढ जीवनशैली? निवडा तुमची वाट!मोबाईलच्या अतिरेकामुळे वाढत आहेत शारीरिक...

मोबाईलचे व्यसन की सुदृढ जीवनशैली? निवडा तुमची वाट!मोबाईलच्या अतिरेकामुळे वाढत आहेत शारीरिक व मानसिक समस्या; व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची गरज

शारीरिक व मानसिक समस्या; व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची गरज

फलटण | प्रतिनिधी. मोबाईल हा आजच्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संवाद साधणे, शिक्षण घेणे, बँकिंग व्यवहार करणे, मनोरंजनाचा आनंद घेणे अशा विविध गरजांसाठी मोबाईलचा वापर अत्यावश्यक ठरला आहे. मात्र, या उपयुक्त साधनाचा अतिरेक आता व्यसनाच्या स्वरूपात समोर येत असून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगट त्याच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत.

अलीकडच्या काळात अनेक घरांमध्ये एक चिंताजनक चित्र पाहायला मिळते. लहान मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा जेवण भरवण्यासाठी पालक मोबाईलचा आधार घेतात. परिणामी, अनेक मुले मोबाईलशिवाय जेवण करण्यासही तयार होत नाहीत. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स आणि विविध डिजिटल माध्यमांमध्ये तरुण पिढी अधिकाधिक गुंतत चालली आहे.

तज्ज्ञांच्या मते, मोबाईलच्या अतिवापरामुळे मानेच्या मणक्यांचे विकार, डोळ्यांचे त्रास, मानसिक तणाव, एकाग्रतेचा अभाव, निद्रानाश आणि नैराश्य यांसारख्या समस्या वाढत आहेत. याशिवाय कुटुंबातील प्रत्यक्ष संवाद कमी होत असून सामाजिक नातेसंबंधांवरही त्याचा परिणाम होत आहे. अनेक तरुणांच्या एक्स-रे तपासणीत त्यांच्या हाडांची स्थिती वयस्कर व्यक्तींप्रमाणे दिसून येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

सध्या जगभरात मोबाईल वापराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विकसित देशांमध्ये जवळपास ९७ टक्के लोक मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.

मोबाईलच्या वाढत्या व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही साध्या पण प्रभावी उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. जेवणाच्या वेळी मोबाईलचा वापर टाळणे, पालकांनी स्वतःच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे, तसेच लहान मुलांना किमान पाच वर्षांपर्यंत मोबाईलपासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. यासोबतच नियमित व्यायाम, मैदानी खेळ, धावणे, सायकलिंग किंवा जिममध्ये वर्कआउट यांसारख्या आरोग्यदायी सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.

आज वाढत्या हृदयविकारामागे बदललेली जीवनशैली, कमी झालेली शारीरिक हालचाल आणि मोबाईलचा अतिरेक ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्यामुळे निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी दैनंदिन सवयींमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे.

मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर केल्यास अनेक शारीरिक व मानसिक आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात. पुढील लेखांमध्ये विविध शारीरिक समस्यांवरील सोपे व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे फिजिओथेरपिस्ट डॉ. मोहन पवार यांनी सांगितले.

डॉ. मोहन पवार, फिजिओथेरपिस्ट
मो. ७५५७७११३११

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments