
५४ वर्षांनंतरही ‘ते’ निळे वादळ तितक्याच जोमात; शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पँथर चळवळीला सलाम
अकलूज : “२९ मे १९७२…! एक ठिणगी पेटली…! आणि जन्म झाला पँथरचा…! पँथर म्हणजे केवळ नाव नाही, तो आहे संघर्षाचा इतिहास…! अन्यायाविरुद्ध उभारलेला आवाज…! शोषितांच्या हक्कासाठी लढलेला लढा…!” अशा जाज्वल्य शब्दांत अकलूज येथील प्रसिद्ध शाहीर आणि पँथर चळवळीचे खंदे शिलेदार शाहीर राजेंद्र कांबळे (खुडूसकर) यांनी दलित पँथरच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टने सध्या आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण केले असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दलित पँथर ही संघटना केवळ एक चळवळ नव्हती, तर ती शोषित, वंचित आणि अन्यायग्रस्त समाजाच्या स्वाभिमानाची गर्जना होती. १९७२ च्या दशकात दलितांवरील अत्याचारांची मालिका वाढत असताना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेली तरुणाई रस्त्यावर उतरली आणि त्यातून “दलित पँथर” या ऐतिहासिक संघटनेचा जन्म झाला. या निळ्या वादळाने तत्कालीन सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला हादरवून सोडले होते.
आपल्या पोस्टमध्ये शाहीर राजेंद्र कांबळे पुढे म्हणतात, “पँथर म्हणजे स्वाभिमान…! पँथर म्हणजे विद्रोह…! पँथर म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची रस्त्यावर उतरलेली ताकद…! जिथे अन्याय दिसला तिथे पँथर उभा राहिला…! जिथे अत्याचार झाला तिथे पँथर गर्जला…!” त्यांच्या या शब्दांमधून पँथर चळवळीचा इतिहास, वेदना आणि संघर्ष यांचे वास्तव अधोरेखित होत आहे.
शाहीर राजेंद्र कांबळे हे स्वतः या चळवळीचे सक्रिय साक्षीदार आणि लढवय्ये राहिले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय आणि समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या डफाच्या ठेक्यावर आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच उपेक्षितांच्या वेदना, अन्यायाविरुद्धचा विद्रोह आणि सामाजिक समतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवला आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अनेकांच्या काळजाला भिडत आहेत.
आजच्या पिढीतही पँथरचा विचार जिवंत असल्याचे सांगताना ते म्हणतात, “आजही त्या निळ्या वादळाची ऊर्जा तरुणांच्या रक्तात धावते…! आजही पँथर म्हणजे न्याय, समता आणि बंधुत्वाची शपथ…! अभिमान आहे त्या चळवळीचा…! अभिमान आहे त्या लढ्याचा…! अभिमान आहे मी पँथर विचारांचा वारसदार असल्याचा…!”
दरम्यान, शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, “जय भीम”, “जय पँथर”च्या घोषणांनी सोशल मीडिया निळामय झाला आहे. पँथर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह नव्या पिढीतील तरुणांकडूनही या पोस्टचे जोरदार स्वागत होत आहे.







