Monday, August 17, 2026
Homeफलटणफलटणमध्ये पाणीटंचाई तीव्र; उपाययोजना न झाल्यास उपोषणाचा इशारा

फलटणमध्ये पाणीटंचाई तीव्र; उपाययोजना न झाल्यास उपोषणाचा इशारा

फलटण प्रतिनिधी : शहरातील तेली गल्ली, रंगारी महादेव मंदिर परिसर, केकाड गल्ली आणि ब्राह्मण गल्ली या भागांमध्ये मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नगरसेवक विशाल तेली यांनी फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दि. १५ मे २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात संबंधित भागांमध्ये नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित भागातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा, अन्यथा फलटण नगरपरिषदेसमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक विशाल तेली यांनी दिला आहे.
“पाणीपुरवठा वेळेवर आणि नियमित न झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन स्वतः जबाबदार राहील,” असा स्पष्ट उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागासमोर या समस्येचे तातडीने निराकरण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या पाणी समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments