Sunday, September 20, 2026
Homeसातारावंचितांचा आवाज कायमचा थांबला – सत्यशोधक बाबा आढाव यांना अखेरचा सलाम

वंचितांचा आवाज कायमचा थांबला – सत्यशोधक बाबा आढाव यांना अखेरचा सलाम


फलटण प्रतिनिधी :  समाजातील अन्यायाविरुद्ध आयुष्यभर रणांगणात लढलेल्या, वंचित-श्रमिक आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या सत्यशोधक विचारांचे प्रवर्तक बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील परिवर्तनाची परंपरा हादरून गेली आहे. गरीब, मजूर, हमाल, उपेक्षित, पीडित आणि श्रमिकांच्या व्यथेशी एकरूप होऊन संघर्ष केलेल्या या महात्म्याचे जाणे म्हणजे समाजातील असंख्य कष्टकऱ्यांचा आधार हरपणे आहे.
असमानतेविरुद्ध अखंड संघर्ष – आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजातील दुर्लक्षित घटकांचे जीवन उंचावण्यासाठी आयुष्य वाहून घेण्याचा त्यांचा संकल्प जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत अविचल राहिला.
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या सत्यशोधक परंपरेचे ते जिवंत प्रतिक होते.
श्रमिकांना हक्क मिळवून देणारे योद्धा कामगारांच्या वेदनेवर फक्त भाषणे नव्हे तर चळवळ उभारून उत्तर मिळवून देणे ही त्यांची जीवनशैली:
हमाल पंचायत चळवळ बाजारपेठांतील हमालांना ओळखपत्र, नोंदणी, न्याय्य वेतन, सुट्टी, सामाजिक सुरक्षा, निवृत्तीवेतन मिळवून देणारी ऐतिहासिक लढाई. मोफत बाजार संकल्पना दानाचा अहंकार नाही आणि गरिबीची लाज नाही, सन्मानपूर्वक गरजूंना वस्तू वितरणाची क्रांतिकारक कल्पना. असंगठित कामगारांना न्याय बांधकाम कामगार, घरकामगार महिला, ग्रामीण श्रमिक, कंत्राटी मजूर यांना शासनाच्या योजनांशी जोडणे, विमा व सामाजिक संरक्षण मिळवून देण्यासाठी आयुष्याचा थरारक संघर्ष.
त्यांची संघर्षशक्ती म्हणजे घोषणा नव्हे प्रत्यक्ष कृती.
तत्त्वांशी तडजोड नाही
धार्मिक अंधश्रद्धा, वर्णव्यवस्था, जातिभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी निर्भिड आवाज उठवला. “माणूस हा माणूस म्हणून समान” हे विचार त्यांनी व्यवहारात उतरणारा आंदोलनाचा मार्ग दाखवला.
साधेपणातून क्रांती –
बाबांचे संपूर्ण आयुष्य विलासी झगमगाटापासून दूर राहिले. खाणे साधे, राहणी साधी पण स्वभाव तेजस्वी, विचार कणखर आणि न्यायासाठी तडफदार.
त्यांचा देह शांत झाला, पण संघर्षांची मशाल हातात घेत उभे राहणाऱ्या पुढील पिढ्यांना त्यांचे कार्य प्रेरणा देत राहील. बाबा आढाव यांनी दाखवलेला मार्ग एकच होता तो म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा, वंचितांसोबत खंबीरपणे उभे राहायचे आणि समाज परिवर्तन तडफदार कृतीतून घडवायचे. महान कार्याची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली.

— आयु. सोमीनाथ घोरपडे
सामाजिक कार्यकर्ता • ज्येष्ठ प्रवचनकार
भारतीय बौद्ध महासभा, फलटण
📞 7387145407

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments