महायुतीत वर्चस्वाचा छुपा संघर्ष: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या आमदारांविरोधात भाजपची तगडी मोर्चेबांधणी, विरोधक नामशेष, आता लक्ष्य मित्रपक्ष! – Chhatrapati Sambhajinagar News

0
2
महायुतीत वर्चस्वाचा छुपा संघर्ष:  छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या आमदारांविरोधात भाजपची तगडी मोर्चेबांधणी, विरोधक नामशेष, आता लक्ष्य मित्रपक्ष! – Chhatrapati Sambhajinagar News




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीचे नेते एकत्र असल्याचे दावे करत असले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तावाटपातून एक वेगळीच राजकीय ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेतील महत्त्वाची पदे वाटताना भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ आखले आहे, ते पाहता मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातच भाजपने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः ज्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे, अशा वैजापूर, कन्नड, सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिमसह छत्रपती संभाजीनगर मध्य या मतदारसंघांमध्ये भाजपने आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पद वाटप केल्याचे दिसून येत आहे. वैजापूर या मतदारसंघांमध्ये भाजप पूर्वी कमकुवत मानली जात होती, मात्र आता याच ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तर कन्नड, सिल्लोड आणि संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात सभापतीपद देऊन भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वबळाची सुप्त तयारी या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की निवडणुकांना स्वबळावर सामोरे जायचे. भविष्यात पक्षाला तशी भूमिका घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छत्रपती संभाजीनगर हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपला सुटावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. भविष्यात स्वबळावर लढायची वेळ आली तर आपली तयारी असावी म्हणून भाजपकडून मतदासंघांची बांधणी सुरू आहे.राजकारणामध्ये असे नेहमी बोलले जाते की आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. भाजप असो की एकनाथ शिंदेंचा पक्ष असो की इतर कोणताही पक्ष असो ते असेच म्हणत असतो. पण त्या दृष्टीने नियोजन केवळ भाजप करते. भविष्यात मध्य आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघात गरज पडली तर स्वबळावर कसे लढता येईल, इथे मुळ सहकारी पक्ष आहेत. म्हणजे इथे होणारी निवडणूक ही सत्ताधारी पक्ष विरुद्ध सहकारी मित्र पक्ष अशीच होते. उदाहरण म्हणून विचार केला तर संभाजीनगर पश्चिममध्ये भाजपचे राजू शिंदे हे उबाठाकडून संजय शिरसाट यांच्याविरोधात लढले. दुसरीकडे वैजापुरात दिनेश परदेशी भाजपमधून उबाठात जात रमेश बोरणारे यांच्याविरोधात लढले. यानंतर पुन्हा ते दोघेही भाजपमध्ये गेले. इथून पुढे विरोधी पक्ष नामशेष करायचा आणि मित्र पक्षांच्याविरोधात निवडणूक लढायची आणि त्यांच्यापेक्षा जास्त ताकद निर्माण करायची हे त्यांचे प्लॅनिंग आहे. याला ते मैत्रीपूर्ण लढत म्हणत मित्रपक्षाच्या उमेदवारांविरोधात आपले उमेदवार उभे करू शकतात. मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली भाजप मित्रपक्षाच्या पाठीत सुरा खुपसू शकतो.

वैजापुरात अविनाश गलांडेंना बळ विशेषतः वैजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे रमेश बोरनारे आमदार असतानाही भाजपने अविनाश गलांडे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी बसवून शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. गलांडे हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे प्रबळ दावेदार होते. त्यांना आता जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ चालवण्याची संधी देऊन भाजपने वैजापुरात समांतर सत्ताकेंद्र निर्माण केले आहे. मध्य मतदारसंघात भाजपचे वर्चस्व शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आमदार असलेल्या मध्य मतदारसंघात भाजपने समीर राजूरकर यांना महापौरपद दिले आहे. त्यासोबतच स्थायी समिती अध्यक्षपद अनिल मकरिये यांच्या सारख्या ज्येष्ठ मनपा सदस्याला देतानाच 3 स्वीकृत नगरसेवकही याच भागातून दिल्याने, भाजपने मध्य मतदारसंघात शिवसेनेच्या प्रभावाला शह देण्याची पूर्ण तयारी केली आहे. यासह मध्य मतदारसंघात ज्योतीताई जैन (महिला व बालकल्याण उपसभापती) आणि रामदास हरणे (शहर सुधार समिती सभापती) यांच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी केली जात आहे. पश्चिम विधानसभेमध्ये अनेकांना बळ पश्चिम मतदारसंघातून दोन वेळा निवडून लढलेले राजू शिंदे यांचा भाजप प्रवेश करुण घेण्यात आला त्यानंतर आता या मतदारसंघातील ग्रामीण भागात सचिन गरड हे अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेला एका मताने निवडून आले. त्यांना अर्थ आणि बांधकाम सभापती करून भाजपने ग्रामीण मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठी रसद पुरवली आहे. तर पश्चिम मतदारसंघातील शालेय समिती सभापती म्हणून 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदारकी लढलेल्या मिलींद दाभाडे यांच्या पत्नी प्रेमलता दाभाडे यांना बळ देण्यात आले आहे. त्यांच्यासह याच मतदारसंघातील शोभाताई बुरांडे यांना महिला व बालकल्याण सभापतीपद तर जालिंदर शेंडगे: गलिच्छ वस्ती सुधार आणि समाजकल्याण सभापतीपद देत बळ देण्यात आले आहे. कन्नड आणि सिल्लोडमध्येही ‘शक्ती प्रदर्शन’ कन्नड मतदारसंघात शिवसेनेच्या संजना जाधव आमदार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे भरत राजपूत यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कन्या मिनाक्षी पवार यांना जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण सभापती देत बळ देण्यात आले आहे. तर त्याचप्रमाणे, सिल्लोडमध्ये अनिता ज्ञानेश्वर मोटे यांना शिक्षण व आरोग्य सभापती पद देऊन भाजपने कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे सोयगाव पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या विजयामुळे शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांना धक्का बसला आहे.सिल्लोडमध्ये पंचायत समितीच्या 18 पैकी 10 जागांवर भाजपने विजय मिळवला, तर शिवसेनेला केवळ 8 जागा जिंकता आल्या.

गंगापूर-फुलंब्रीमध्ये हे गणित भाजपने स्वतःचे आमदार असलेल्या फुलंब्री आणि गंगापूर मतदारसंघांत ‘सेफ’ खेळी केली आहे. फुलंब्रीला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देऊन आपला गड राखला आहे, तर गंगापूरमध्ये महायुतीचा तिसरा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सभापतीपद देऊन सत्तेचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे 1 खासदार, 6 आमदार आणि खुद्द पालकमंत्री असतानाही, जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिवसेनेला बाजूला ठेवण्यात भाजप यशस्वी झाली आहे. विकासकामांचा निधी आणि सरकारी योजनांचे वाटप आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांमार्फत होणार असल्याने, गावपातळीवर भाजपचा प्रभाव वाढणार हे निश्चित आहे. वरवर पाहता ही महायुतीमधील पदवाटपाची प्रक्रिया वाटत असली, तरी त्यामागे शिवसेनेच्या मतदारसंघांत भाजपचे वर्चस्व निर्माण करण्याचा मोठा डाव दडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत जागावाटपावरून आणि अस्तित्वावरून मोठी राजकीय रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा किती खरा, हे येणारा काळच ठरवेल.



Source link