
फलटण प्रतिनिधी :- आगामी काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २०१७ मध्ये विधानपरिषदेचे तत्कालीन सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र २०२५ च्या उंबरठ्यावर चित्र पूर्णपणे बदलले असून, सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
भाजपचे नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागील काही वर्षांत तालुक्यात आपली राजकीय ताकद लक्षणीयरीत्या वाढवली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकांत रामराजे गटाला बसलेले धक्के हे त्याचे ठळक उदाहरण आहे. त्यामुळे येणारी जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
२०१७ च्या निवडणुकीत फलटण तालुक्याने तत्कालीन एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा कौल दिला होता. जिल्हा परिषदेच्या ७ पैकी ६ आणि पंचायत समितीच्या १४ पैकी १२ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवत सलग सहाव्यांदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला होता. केवळ गिरवी गटात काँग्रेसच्या अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचा विजय रोखला होता.
मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार सचिन पाटील यांना निवडून आणत आपली ताकद सिद्ध केली. त्यानंतर फलटण नगरपरिषद निवडणुकीत रामराजे यांचे सुपुत्र श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला, तर समशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्षपदी विराजमान झाले.
विशेष म्हणजे, २०१७ मध्ये रामराजेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अनेक माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे रामराजेंसमोर आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तर दुसरीकडे रणजितसिंह ‘नंबर वन’ स्थान मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक फलटण तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार असून, या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







