महिलांसाठी एसटी सवलत योजनेच्या एनसीएमसी कार्ड नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
34
महिलांसाठी एसटी सवलत योजनेच्या एनसीएमसी कार्ड नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण | प्रतिनिधी :-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) महिलांसाठी ५० टक्के प्रवास सवलत योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या एनसीएमसी कार्ड नोंदणी अभियानाचा शुभारंभ शिवसेनेचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक विराज खराडे, शिवसैनिक तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये नगरसेवक विशाल तेली यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत तब्बल ४१० महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
महिलांना सुरक्षित, परवडणारा आणि सशक्त प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
नगरसेवक विशाल तेली यांनी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात सुरुवातीला १९० महिलांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर हा उपक्रम अधिक व्यापक करत त्यांनी घरोघरी जाऊन महिलांना योजनेची माहिती देत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवली. या घरपोच मोहिमेद्वारे आणखी २२० महिलांची नोंदणी करण्यात आली असून एकूण आकडा ४१० वर पोहोचला आहे.
याबाबत बोलताना विशाल तेली यांनी सांगितले की, “प्रभागातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. अनेक महिलांना नोंदणी केंद्रावर येणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन नोंदणी करण्याचा उपक्रम राबवला जात आहे.”
अद्याप ज्या महिलांची नोंदणी झालेली नाही, त्यांनी ८१४९०४९००५ या क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्कानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती विशाल तेली यांनी दिली.
या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक ८ मधील महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या योजनेचा लाभ थेट नागरिकांच्या दारी पोहोचविणाऱ्या या अभिनव मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.